गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 6

एकवेळ मला काही झालं तरी चालेल पण घरातल्या इतर कोणालाच काहीही त्रास होऊ नये,असं उगीच आपलं आपल्या मनाला वाटत असतं. यामागे लॉजिक काय?
तर त्यांना आपल्याला काही होतंय हे पटकन समजणार नाही😎
खरंतर अगदी सहज गप्पांच्या ओघात घरातल्यांच्या शारीरिक,मानसिक स्वस्थतेबद्दल आपल्याला रोजच्या रोज विचारून खात्री करून घेता येईल. 
याउलट होतं काय की अतिकाळजीपोटी अनेकदा आपल्या नकळत त्यांना नुसत्या काळजी घेण्याविषयी सूचनाच दिल्या जातात,जाब विचारले जातात आणि तेही झाडाझडती घेतल्याच्या अविर्भावात. उदा. स्वच्छतेबद्दल, कुठे जाण्या-येण्याबद्दल.
ऐकणाऱ्याला कधीकधी त्या इतक्या त्रासदायक होतात आणि वैतागल्यासारखं होतं कारण आता वर्ष झालं त्यांनाही त्या ऐकून ऐकून😊
तुम्हाला वाटेल इतकं कानीकपाळी ओरडलं तरी कोणी ऐकतंय का?😠
पण एखादी गोष्ट वारंवार सांगितली की तिचं महत्त्व ऐकणाऱ्याकडून सहजच कमी होतं आणि कधी राग म्हणून किंवा बंडखोरीने सांगितले गेलेय त्यापेक्षा एकदम विरुद्ध वागण्याची प्रवृत्ती होते. त्यांच्या मनात सूचनांचा राग असतोच वर परिस्थितीवरचाही राग असतो.
ना मनासारखे बाहेर जाऊन खेळता येत,ना कोणाला भेटता येत. 
साधारण पंधरा वर्षापर्यंतची मुलं आणि साठी-सत्तरीच्या पुढची मंडळी यांना आता घरात अक्षरशः कोंडल्यासारखं झालं आहे.
एकतर इतरवेळी जास्तीतजास्त वेळ घराबाहेर असणारे मेंबर्स आता पूर्णवेळ घरातच आहेत. 
त्यामुळे कुठेकुठे एकमेकांच्या स्वभावाशी अतिसहवासातून घर्षण तयार होतेय. 
सगळ्यांनाच शांतता हवी, प्रायव्हसी हवी, आपल्या कामाच्या वापरासाठी फोन हवेत,लॅपटॉप हवेत. जागेची मुबलक उपलब्धता सगळ्यांकडे असेल असे नाही. म्हणून
मुलांनी शाळेच्या वेळेनंतरही दंगा,मस्ती करायची नाही कारण इतरांचं ऑफिस घरून सुरू आहे.
आजी-आबांच्या बेडरूममध्ये टीव्ही असेल तर मुलांचा मोर्चा थेट त्यांच्या वेळ आणि एकांतावर येतो. त्यांना तर ना दुपारी आराम मिळतोय ना सकाळ- संध्याकाळचा व्यायाम होतोय.
एकमेकांवर आरडाओरडा आणि रोजच्या नवीन तक्रारी यांनी सगळ्यांच वैतागायला झालंय. मुलांना वेगळी रूम असेल तर त्यांच्या
वाढलेल्या स्क्रिनटाईमचीही काळजी आहेच. 
बदलांकडे संधी म्हणून बघितलेल्या कुटुंबांचे अनुभव मात्र वेगळे आहेत.
त्यांनी गेले वर्षभर मिळालेल्या एकत्र वेळेचा चांगला उपयोग करून घेतलाय. अभ्यासाच्या,कामाच्या,एकत्र खेळायच्या इतकेच काय व्यायामाच्या वेळाही एकमेकांच्या संमतीने चपखल अनुरूप करून घेतल्या आहेत.
स्वभावात पुरेशी लवचिकता असेल तर इतर लोकंही पटकन तडजोड स्वीकारतात. कुटुंबात एकमेकांमध्ये समन्वय, सुसंवाद आणि संघटितपणा प्रयत्न आणि पेशन्सने आणावा लागतो.
आज पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने त्यांच्या काळातले सुट्टीतले अनेक बैठे खेळ मुलांना शिकवले. त्यातून मुलांना खेळण्यासाठी नावीन्य मिळाले म्हणून मुलं खुश आणि मोठ्यांनाही आपले लहानपण पुन्हा अनुभवल्याचा आनंद. शिवाय यात आजी-आजोबाही सहभागी झाले. सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका झाला. 
घराचे गोकुळ व्हायला अशीही फक्त इच्छाशक्तीच तर लागते😊 
आपल्यालाही असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला काय हरकत आहे?
दिवसभरातल्या वेळात आपल्याला मिळालेल्या छोट्या-मोठ्या मोकळ्या वेळेच्या संधी अनेक कल्पक उपायांनी भरता येतील. सगळ्यांच्या मनावरचा ताण त्यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या परिस्थितीबद्दल, अडचणींबद्दल तुम्ही मुलांशी जाणीवपूर्वक बोलता आहात ना?
कितीही लहान वयाचे मूल असेल तरी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांच्या शंकांना,प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. तुम्ही सुखरूप रहाल आणि त्यांच्या सोबत आहात ही जाणीव वेळोवेळी त्यांना करून द्यायला हवी. काही झालेच तर वेळेत त्यावर उपाय करता येतात, हा विश्वास त्यांना द्या. कारण तुम्हाला काही झाले तर? या दडपणाचे न पेलवणारे ओझे त्यांच्या चिमुकल्या मनावर असू शकते.
तीच खात्री वृद्धांनाही द्यायला हवी. काही झाले तर आपल्याला आपली माणसं पुन्हा दिसणार का, या कहाण्यांचा न पेलवणारा ताण त्यांच्याही मनावर असू शकतो.
एकत्र मिळालेला वेळ लहानमोठ्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडण्यात,तक्रारी करण्यात घालवला तर एकमेकांशी असलेल्या नात्यात सहज प्रेमाचा,
आणि सहजाणिवेचा हळूवार धागा नव्याने गुंफण्याची आयुष्याने दिलेली सुंदर संधी तुम्ही गमवाल आणि हाती उरेल फक्त आणि फक्त एकटेपणाचा ताण.
थोड्या जाणत्या,जबाबदार वयाच्या मुलांना समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवण्याची ही सुंदर संधी आहे. 
त्यांना सोबत घेऊन आपल्या परिसरात असलेल्या वृद्ध व्यक्तींना योग्य काळजी घेऊन मदत करणे,जीवनावश्यक गोष्टी,औषधे आणून देणे, त्यांना बरे नसेल तर डबा देणे, विचारपूस करणे यासारख्या आपल्या अनेक छोट्या मोठ्या वागण्याकडे आपली मुले बारकाईने बघत आहेत.
संस्कार शिकवून कधीच येत नसतात ते मोठ्यांच्या उदाहरणातून मुलं अचूकपणे उचलतात.
मोठ्यांचं एकमेकांशी बोलणं आणि वागणं यातून त्यांच्या जाणिवा एकतर घडत आहेत किंवा बिघडत आहेत,याचं भान या परिस्थितीत अधिक बाळगायला हवंय.
कोणतेही संकट कायमस्वरूपी टिकत नाही.
आयुष्य खूप सुंदर आणि जगण्यायोग्य आहे.
कळत्या मुलांशी या गोष्टी जाणीवपूर्वक बोलण्याची गरज आहे. 
आपले कुटुंब,समाज आणि निसर्ग यांची आज काळजी घेतली तर उद्याच्या संकटांची काळजी नसते. मानसिकदृष्ट्या सक्षम आणि निरोगी राहणे ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही.
ती आर्थिक बचतीसारखी जाणीवपूर्वक करावी लागते. 
ज्यावेळी सर्वकाही सुरळीत सुरू असते तो काळ स्वतःला मानसिक,भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा असतो. 
संकटांचा सामना कसा करायचा असतो,
त्यासाठी लागणारे शारीरिक मानसिक बळ आपल्या आतच असते फक्त ते वापरायचे की नाही,कसे वापरायचे असते हे आजच्या आपल्या वागण्यातून मुलांना समजते आहे, म्हणून सावध!
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 6


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा