मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

रागाचे करायचे तरी काय?


                                                      
                                         
आपल्या प्रत्येकात काही स्वभाववैशिष्ट्ये जन्मत:च असतात. तर काही वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण आत्मसात करत असतो. त्यानुसार आपला स्वभाव घडतो. त्यानुसार आपण आजूबाजूच्या जगातील घडामोडींना प्रतिसाद देत असतो. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आपले वाटणे,आपल्या भावना त्या समोरच्या व्यक्तीकडून सहज स्वीकारल्या गेल्या नाहीत किंवा कोणी वारंवार नाकारल्या तर एखाद्या व्यक्तीच्या मनात सगळ्या परिस्थितीला,व्यक्तीला विरोध करण्याची किंवा नाकारण्याची भावना तयार होते आणि मग पुढे त्यातूनच राग,आक्रमक भाव,जन्माला येऊ शकतात. आजकाल लहान मुले खूप जास्त आक्रमक,रागीट झाली आहेत,असे पालकांचे म्हणणे आहे. नकळत्या वयात असे व्यक्त होणे मुलं शिकतात तरी कुठून?
कोणी काहीही न शिकवता मुले अनेक गोष्टी शिकत असतात. घरातल्या व्यक्तींपैकी कोणीही आक्रमकपणे व्यक्त होत असेल तर न कळत्या वयातले मुलही त्या प्रतिक्रियेकडे सगळ्यात आधी आकर्षित होते. कारण आक्रमक व्यक्तीच्या वागण्यात आणि बोलण्यात वापरलेली शारीरिक उर्जा त्याचे लक्ष वेधून घेते. लहान मूल रांगतांना, नव्याने चालताना अडखळून पडले, आणि त्याला काही लागले तर जवळ असलेल्या मोठ्या व्यक्तीची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते...ज्यामुळे लागले त्या वस्तूला हाताने ”हात रे...” करण्याची. असे म्हणून हाताने मारण्याचा अविर्भाव मोठ्यांकडून केला जातो किंवा प्रत्यक्ष वस्तूला मारले सुद्धा जाते. आपल्याला काही लागले,आपण अडखळून पडलो ते आपण चालताना नीट चाललो नाही म्हणून. वस्तू काही आपल्या मार्गात आलेली नाही, तर आपण तिच्या मार्गात आलेले  आहोत, ही साधी वस्तुस्थिती मुलांना नीट समजत नाही. कधी कधी तर मुलांना त्या वस्तूला “हात रे...” करायला लावतो आपण !  
आपण खाली पडण्याची’ जबाबदारी ही आपल्या स्वतःची नाही तर दुसऱ्याच कोणाची आहे याचा संस्कार त्यांच्या मनावर रुजतो आहे,हे लक्षातही येत नाही आपल्या. लहानपणी मुलांचे विश्व निर्जीव वस्तू, प्राणी,पक्षी,निसर्ग यांनी व्यापलेले असते. मग पुढे त्यांच्या आयुष्यात घराशिवाय इतर व्यक्ती,परिस्थिती येतात. “आपल्या वागण्यासाठी आपण जबाबदार नसून दुसराच कोणी आहे” या धारणेची ही छोटीशी सुरवात इतक्या लहान वयात, मोठ्यांच्याही अगदी नकळत मनावर बिंबवली जाते..
त्याऐवजी अशा प्रसंगात लहानग्याला कुठे लागले आहे,याची दखल घेऊन मग त्याचे लक्ष वस्तूवरून ”आपण नीट चालूया हं..नीट नाही चाललो की आपण पडतो आणि आपल्याला लागतं ना मग? असे बाळाच्या ‘वागण्याकडे’ वळवता येईल,कारण असे करणे जास्त सोपे आहे.
                                           



आपल्या आजूबाजूला काय चाललेले आहे याचे भान लहान मुलांमध्ये असते. मोठ्यांचे आक्रमक वागणे,बोलणे तसेच खोटे बोलणे त्यांना समजते. अर्थ समजत नसला तरी त्यामागचा भाव त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतो. एकदा एका लहानग्याने आपल्या वडिलांसाठी बाहेरून काठी आणून दारापाठीमागे लपवून ठेवली होती. त्याबद्दल त्याला विचारल्यावर तो म्हणाला होता की “बाबा, तू आईला मारलं ना, तर तुला मारण्यासाठी आणली आहे!” वडिलांना खूप आश्चर्य वाटले, त्यांच्या घरात तर असे काही घडत नव्हते मग हा छोटा असे का म्हणाला असेल, याचे त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी लक्ष ठेवले तर आई बघत असलेल्या मराठी सिरीयल मध्ये नवरा बायकोला मारझोड करतोय असा प्रसंग वारंवार दाखवला जाई..आजूबाजूला खेळणाऱ्या आपल्या लहान  मुलाचे लक्ष आपण बघतोय त्या सीरिअलकडे असू शकेल हे त्या आईच्या कधीच लक्षात आले नव्हते.

“आम्ही तर घरात कोणीच असे वागत नाही, आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत.. तरीही आमचा मुलगा किंवा मुलगी इतकी रागीट कशी?” असे प्रश्न पडणाऱ्या पालकांच्या प्रश्नाचे उत्तर अशा प्रसंगात आहे. संध्याकाळी न चुकता हे काळ्या-पांढऱ्या टोकाच्या भावनांनी भडक रंगात रंगवलेले मालिकेतले कुटुंब मूल सातत्याने बघत,ऐकत असेल तर ते तुमचे गुण आत्मसात करेल की सीरिअलमधल्या माणसांचे? स्क्रीनवर चाललेले नाटक आहे,आभासी आहे,खोटे आहे याची ‘समज’ मोठ्यांना तरी असते का? त्यानुसार घरातले स्वयंपाक, जेवणाचे, मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक सुद्धा बदलले जाते. ‘आम्ही कोणीच असे नाहीत आणि आमचे मूल असे का वागते?..’ याचे उत्तर मोबईल, टी.व्ही, इंटरनेट,गेम्स यात आहे का हे जरूर शोधावे.
डोळ्यासमोर वारंवार दिसत असलेली आक्रमक दृश्ये मुलांना उत्तेजित करतात आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांना कोणाचा राग आला तर तो या अशा ‘बघितलेल्या’ मार्गांनी व्यक्त करण्याची शक्यता जास्तीत जास्त असते.आजकाल आपल्या जवळपास अशा अनेक घटना आपण घडतांना बघतो. कोणत्याही गोष्टीचे कारण कधीच वरवर असू शकत नाही. ते एखाद्या प्रसंगात,अनुभवात रुजलेले असते, हे लक्षात घ्यावे.
मुलांच्या छोट्या,रंगीबेरंगी कपड्यांची मोठ्यांना हौस असते. त्यांच्यासाठी आपल्याला आवडणारे कपडे खरेदी करून आपल्या इच्छेनुसार त्यांना घालण्याची मोठ्यांना सवय लागलेली असते. पुढे कधीतरी खरेदीला गेल्यावर अचानकपणे मुलं आपण निवडलेल्या कपड्यांना नाक मुरडतात आणि त्यांना आवडलेल्या ड्रेससाठी हट्ट धरून बसतात. मुलांच्या स्वतंत्र मतांची ती सुरवात असते. हळूहळू जवळपास सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे वेगळे म्हणणे पालकांना जाणवायला लागते. हा बदल अत्यंत संयमाने आणि धोरणीपणे स्वीकारावा,हाताळावा लागतो. कारण आधी मनासारखे घडण्याचा हट्ट येतो आणि तसे झाले नाही तर मुलं आलेला राग वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करतात. पालकांनी हे नीट हाताळले नाही तर वरवर छोटी वाटणारी घटना त्यांच्या  मनात नकारात्मक भाव रुजवून जाते.
पालकांचं आणखी एक वाक्य आपल्या ओळखीचं आहे, “रोज घरी मार खाऊन येतो हा मुलांचा..तरी बरं, सगळे याच्याइतकेच आहेत. आता तर मीच त्याला सांगून ठेवलंय कोणी एक मारली ना तर तू चांगल्या दोन दे लगावून! पण जर पुन्हा मार खाऊन घरी रडत आलास ना तर याद राख...”
आजकालच्या जगात ‘जशास तसे’च वागायला हवे! असेसुद्धा बहुतेकांना वाटते. सहावीतल्या देवांगची आई पण काही वेगळी नव्हती, तिने आपल्या मुलालासुद्धा हेच सांगितले.   
पण एकदा शाळेकडून बोलावणे आल्यावर शाळेतल्या मुलांशी मारामाऱ्या करणाऱ्या देवांगच्या तक्रारी ऐकून आई चिडली,त्यावेळी टीचरसमोर देवांग आईला म्हणाला, “तूच तर म्हणालीस ना की कोणाचा मार खाल्लास तर याद राख म्हणून?” 
मुलं कशावरूनतरी वाद घालत असतात. उलट बोलत असतात. पालकांना हे कसे थांबवावे कळत नाही. मग धाक दाखवला जातो, “आवाज खाली कर आधी, कोणाशी बोलते/बोलतो आहेस तू?” यातला टोन आणि कधीकधी तर वाक्यदेखील मुलं मोठ्यांच्या अनुकरणातून उचलतात. कारण त्यांना आक्रमक वागण्याचे फायदे तत्काळ मिळतात हे त्यातून दिसते. कशासाठीतरी हट्ट करतांना रडून गोंधळ घालणारी लहान मुले बघाल तर लक्षात येईल, डोळ्यातून येणाऱ्या पाण्यापेक्षा ‘रडण्याचा मोठा आवाज’ हे त्यांचे हुकमी अस्त्र असते. कडेवरून खाली ठेवल्यावर संताप करून रडणारं बाळ तुम्हीदेखील बघितलं असेल. त्याला काय होतंय म्हणून मोठ्यांनी घाबऱ्याघुबऱ्या बघावं तर उचलून जवळ घेतल्यावर ते क्षणात शांत होतं, मजेत खेळतं. आपल्यातल्या शक्तीचा अंदाज मुलांना इतक्या लहान वयात होतो.
थोडी कळत्या वयाची मुलं निर्जीव वस्तूंवर आपला राग काढतात. हातातल्या वस्तू फेकून देणं, जोरजोरात आपटणं. असं करून त्यांना समजतं की वस्तू काही पुन्हा उलटून आपल्याला मारू शकत नाहीत आणि दुसरा फायदा म्हणजे असे वागल्यावर आपले म्हणणे मोठी माणसे लगेच मान्य करतात. घरापेक्षा बाहेर,अनोळखी लोकांसमोर असे वागलो की आपले म्हणणे ताबडतोब मान्य होते,हे अनुभवातून त्यांना समजते.
राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे पण आपल्याला राग आल्यानंतर आपण त्याच्या किती प्रमाणात आहारी जातो..त्यात वाहवत जाऊन स्वतःला किंवा इतरांना नुकसान करणारी कृती करून बसतो. हे आपल्या हातात असतं. रागाला आपण किंवा आपल्या जवळचे इतर लोकं कसा प्रतिसाद देतात त्यावर पुढच्या वेळी पुन्हा ते हत्यार वापरायचं की नाही हे ठरतं.
राग येणे ही एक स्वाभाविक भावना आहे. राग आला त्याआधी घडलेल्या प्रसंगाबद्दल मुलांशी ते चांगल्या मनस्थितीत असतांना बोलले पाहिजे,ज्यातून त्यांच्या मनातल्या विचारांची दिशा समजेल. ‘मला राग आला’असे म्हणून त्या भावनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हेदेखील मुलांना समजावे.  ‘तुझ्यामुळे मला राग आला’,’अमुक अमुक घडले’ म्हणून मला राग आला असे म्हणणे म्हणजे आपल्या भावनांची जबाबदारी दुसऱ्याच कोणावर तरी टाकण्यासारखे आहे. ‘राग कंट्रोल करता यायला हवा’ असे सगळ्यांना वाटते. कंट्रोल करणे म्हणजे निचरा होणे नाही. ते दाबून टाकणे झाले, अशा दबलेल्या,दडपलेल्या भावना अतिरेक झाला की त्या अनिर्बंधपणे,अनैसर्गिकपणे बाहेर पडतात. कोणतीही भावना ही उर्जा( energy) असते. तिचे नियमन करता येणे शक्य आहे. रागामध्ये आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ आपण वाया घालवायचा आहे का याचीही निवड व्यक्तीच्या हातात असते.
आपल्या कोणाच्याही आयुष्याला रिटेक नाही. मुलांच्या वाढीला तर नाहीच नाही. म्हणून समोर असलेला क्षण तो आपला, असे समजून या क्षणापासून सजग राहण्याचा प्रयत्न करूया आणि पालकत्वाच्या शाळेतील हे पहिले-वहिले धडे मनापासून शिकूया!

© डॉ. अंजली/अनन्या औटी.
mindmatteraa@gmail.com
 (फोटो :गुगल)


 




शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

माणुसकीच्या प्रवासाची गोष्ट!



ती कुठून आली आहे,कोणालाही माहीत नव्हतं. त्या भागात अचानक ती दिसायला लागली. वय झालेलं. अंगावरच्या कपड्यांची शुद्ध नाही. शनीच्या मंदिराबाहेर अनेक भिकारी बसत. ही त्यांच्यातलीच एक होऊन गेली. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांचा या रेषेपलीकडे असलेल्या लोकांबरोबर काहीही संबंध नसतो. रस्त्यावरच्या दुर्लक्षित, बेवारस प्राण्यांप्रमाणे त्यांच्यादृष्टीने हे जीव. मानवी आयुष्य असलेल्या काहीजणांच्या आयुष्याचा रस्ता हा असा इतका खडतर का? या प्रश्नाला उत्तर नाही. तिथे बसणाऱ्या नेहमीच्या लोकांना ती आपली स्पर्धक वाटली. आणि आजूबाजूने वाहणाऱ्या गर्दीला आपली नजरही वळवावीशी वाटू नये, अशी त्यांच्या माणुसकीला अनोळखी असलेली एक अडगळ वाटली केवळ.
आपल्या सगळ्यांसारखं घर,माणसं,नातेवाईक असलेली एक स्त्री जगण्याच्या सृरक्षित,सुशिक्षित आणि समृद्ध परिघाबाहेर कशी काय जाऊन पोहोचली? नेमके काय घडले आणि तिच्या आयुष्याची वाट तिथे जाऊन पोहोचली? याची उत्तरं शोधायला गेलो तर हातात येतं माणसाच्या जगण्यातलं असं प्रखर सत्य, ज्यात स्वार्थाशिवाय कशाचेच महत्त्व नाही.
होय,ती तिथूनच आली होती, भरल्या घराचा उंबरठा ओलांडून!
‘आपले’, ‘सख्खे’ आणि ‘परके’ हे केवळ शब्द आहेत. त्यामागचे अनुभव त्या भावनांना जन्म देतात. आपल्याला अनुभव कसे यावेत हे आपल्या हातात नसते पण त्यातले ‘आपण काय घ्यावे’ आणि ‘कसे वागावे’ हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. माणसांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर महत्वाची असते ती केवळ ‘वेळ.’ त्यावेळेत स्वतःसाठी योग्य निवड करणे हे मात्र फक्त आणि फक्त त्याच्याच हातात असते. आपण केलेली निवड आकार देत असते आपल्या आयुष्याला. तिच्या परिणामांवरून मग ठरते की ती योग्य होती की अयोग्य.
दुर्दैवाने तिच्या आयुष्यात असलेल्या ‘सख्ख्या’ नात्यांची सोबत मागेच सुटून गेली. मात्तृत्वाचे सुख नशिबात नव्हते आणि सर्वांसमक्ष जोडलेले जीवाचे नातेदेखील एका वळणावर अचानक तिच्यापासून दुरावले. तिच्या सांत्वनासाठी जमलेल्या नातेवाईकांच्या घोळक्यात माणुसकीच्या संवेदना जीवंत असलेला एकही नव्हता. कोणाला किती जवळ करायचं,विश्वास ठेवायचा, याची तिची निवड चुकली. भोळ्या चेहऱ्यांना आणि फसव्या बोलण्यावागण्याला ती फसली. आणि एक दिवस असा उगवला की त्ती नेसत्या वस्त्रानिशी रस्त्यावर आली. असं वागून त्या जवळच्या म्हणवणाऱ्या लोकांनी काय मिळवलं? या प्रश्नालाही उत्तर नसते.
आता तिच्यापुढे प्रश्न होता, जगायचं कसं? मुलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष. तिच्यापरीने तिने तो केलाही. याआधीच्या आयुष्यात ऐश्वर्य,श्रीमंती,पैसा आपल्यासोबत काय घेऊन येतो,याचा अनुभव तिचा घेऊन झाला होता. आता साधेपणाचं जगणं तिने स्वीकारलं. ओळखीच्या लोक,जागा,वस्तू यांचे  मानसिक पाश मागे सोडून ती मनाने दूर निघून आली. त्याबरोबर तिथेच सोडून दिलं मनातलं वाईट वाटणं, खेद,खंत,पश्चाताप. लोकं जे वागले ती त्यांची करणी होती, ती त्यांच्याच सोबत ठेवायला हवी. आपण त्यांचा विचार केला तर ती आपल्याही सोबत येईल, याची सुज्ञ समज तिच्या मनात होती. निर्लेप मनाने आणि शरीराने ती पुन्हा नव्याने जन्म झाल्यासारखी शून्यापासून परत पुढे निघाली.
पण आता आयुष्याच्या उमेदीचा काळ नव्हता, उतरणीचा होता. तिच्याकडे शिक्षण नव्हतं पण दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे तिचा साधा आणि सरळ स्वभाव आणि दुसरा तिचा प्रामाणिकपणा. तिच्या सभ्य दिसण्यावर विश्वास ठेऊन तिला काम मिळाले. तिला स्वतःपुरता निवाराही मिळाला,पण आजूबाजूची वस्ती चांगली नव्हती. तिथे नको त्या लोकांना आणि त्यांच्या त्रासांना तिला तोंड द्यावे लागले. पण त्यांच्यापासून शक्यतो अलिप्त राहायचे धोरण तिने ठेवले. काही वर्ष सुरळीत गेली. मग आलेल्या डोळ्यांच्या आजारपणात कामही गेलं आणि पैसे नाहीत म्हणून राहण्याची जागाही. ती पुन्हा रस्त्यावर. डोळ्यांनी अगदीच अस्पष्ट  दिसायला लागले. आता एके ठिकाणी राहणे भाग होते.
एकाकी रस्त्यावर असलेल्या तिला कोणीतरी त्या भागातल्या एका शनीच्या मंदिराबाहेर असलेल्या एका ओट्यापर्यंत सोडले. तिथेच तिला भिकारी समजून लोकांनी पैसे द्यायला सुरवात केली. ती निमूट राहिली. इथे एक आणखीनच वेगळे जग तिला सामोरे आले. या जगातल्या लोकांना कोणताही विधिनिषेध नव्हता. जगण्याचे काहीही नियम नव्हते. इथे जो इतरांपेक्षा वरचढ तो श्रेष्ठ. आलेल्या पैशांमध्ये त्यांचा वाटा आधी. तिच्यासमोर असलेल्या पैशांमधून येत-जाता कोणीही अलगद पैसे उचलून नेई. तिला ते समजे पण कोणाला प्रतिकार करण्याचा तिचा स्वभाव नव्हताच आणि आपल्यासाठी काही बाजूला ठेवण्याची आता तिला गरजही वाटत नव्हती. आजूबाजूच्या लोकांना तिनेच स्वतःहून आपल्याजवळ दिवसभरात जमलेले पैसे दिले. आपल्याजवळ आल्या-गेल्या प्रत्येकाला ती म्हणे, “ बाळा, आधी तू घे, तृप्त हो आणि मग तुला मला द्यावंसं वाटलं तरच माझ्यासाठी ठेव.”  कोणी सहजपणे तिला काही खायला आणून दिले तर ती खात असे. अंगावरची साडी कधीच फाटून आता धुडकं झाली होती. कित्येक दिवसात अंघोळ न केल्यामुळे धूळ आणि अस्वच्छतेचे तिच्या अंगावर थर जमा झाले होते. तिची ‘सभ्य’ओळख कधीच संपूर्ण पुसली गेली. आता ती सुद्धा होती फक्त एक जीव. श्वास जोपर्यंत आहेत तोपर्यंत जगणारा.  
                                                


देह मळला,थकला. त्याची तिला फिकीरही नव्हती. पण स्वतःशी असलेलं नातं मात्र ती विसरली नाही. तोंडी पाठ असलेली एक प्रार्थना ती सतत म्हणे. काय होतं त्या प्रार्थनेत? स्वत:साठी केलेलं एखादं मागणं? नाही, तर त्यात होती विश्वप्रार्थना..”देवा सगळ्याचं भलं कर. सगळ्यांना सुखात ठेव.”
एके दिवशी तिची विचारपूस करत कोणी तिच्या अगदी जवळ आलेलं तिला जाणवलं. अस्पष्ट नजरेला नुसतीच आकृती दिसली. “आजी तुला काही त्रास आहे का? मी डॉक्टर आहे आणि तुम्हाला औषधं द्यायला आलोय.” तिला आठवलं तिच्या शेजारी बसणाऱ्या कमलाची दाढ खूप दुखत असे, तिने त्यांना तसं सांगितलं. डॉक्टर म्हणाले की, “कमलाला गोळ्या देतो, आजी तुलाही काही दुखत असेल तर सांग, तुलाही फुकट गोळ्या देतो मी..”
असे म्हणणारा आणि आपल्याआधी दुसऱ्याचा विचार करणाऱ्या आजीबद्दल कुतूहल जागं झालेला सहृदय, होता एका वेगळ्या वाटेचा प्रवासी. काही वेडी माणसं रूढ वाटेनं जात नाहीत, अंत:प्रेरणेनं जगण्याची इतरांपेक्षा वेगळी वाट निवडतात, जगाच्या दृष्टीने ते ‘वेड’च असतं,एकदाच मिळतो माणसाचा जन्म, जास्तीतजास्त सुखं उपभोगायची, तर हे कुठलं खूळ? कारण सुखासुखी आपलं आयुष्य असं इतरांसाठी वाहून घेणं,त्यांना समजत नाही.  





तर ह्या माणसाला ध्यास आहे उतारवयात भीक मागण्याची वेळ आलेल्या माणसांना पुन्हा माणुसकीच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा. पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनावणे, आपली ओळखच ते ‘मी भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर” अशी करून देतात.आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ ते या कामासाठी देतात. या लोकांवर उपचार करतांना ते हळूच त्यांच्याशी भावनिक संवाद साधून त्यांच्या अशा जगण्यामागचं खरं कारण शोधतात. भीक मागणारे सगळेच खरे गरजू असतील असे नाही, त्यातले केवळ १० टक्के लोक, अगदीच नाईलाजाने या मार्गाला लागलेले असतात. काही मात्र सहज आणि विनाकष्ट उपलब्ध होणारा पैसा, म्हणूनदेखील या मार्गाला लागलेले असतात. कसेही असो, पण उतारवयातील या लोकांचं प्रबोधन करून त्यांना भीक मागण्यापासून डॉक्टर परावृत्त करतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, काम मिळवून देण्याची जबाबदारी देखील ते घेतात. त्यांना करता येऊ शकतील अशी कितीतरी लहानमोठी कामे डॉक्टरांनी आजवर त्यांना मिळवून दिलेली आहेत.
भीक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देऊ नका, कारण असे केल्याने मागण्याची वृत्ती वाढते,तुम्हाला शक्य असेल तर त्यांना एखादे काम देऊन मग त्याचा मोबदला द्या, असे डॉक्टर सर्वाना आवर्जून सांगतात.
अर्थात ते एकटे या कामात नाहीत,त्यांच्यासोबत समविचारी लोकांचे एक कुटुंब आहे. या प्रवासात सगळ्यात महत्वाची,मोलाची आणि खंबीर साथ त्यांना आहे त्यांच्या पत्नीची, डॉ.मनीषा सोनावणे यांची.
आपल्या या आजीचा स्वीकार त्यांनी कुटुंबाचा एक सदस्य म्हणून केला आहे. तिची कहाणी ऐकल्यानंतर डॉक्टर तिला आपल्यासोबतच घेऊन आले. आजीचा संपूर्ण कायापालट झाल्यावर दिसणारी आजी बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले. आज आजीच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन तिला दिसायलादेखील लागले आहे.
अजूनही आजी तीच विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणते. पण आता तिच्या डोक्यावर एक सुरक्षित छत आहे, मायेने काळजी घेणारी लोकं आहेत आणि आपल्याला शक्य होईल ते काम करून सन्मानाने आपले उरलेले दिवस घालवण्याचा विश्वास जपणारी कुटुंबाची समर्थ सोबत आहे.
                              


तिला खात्री आहे आपला हा ‘नातू’ आपल्याला कधीही अंतर देणार नाही. समाधानी तर ती त्या परिस्थितीत पण होती पण आज तिच्याकडे ‘आपलं माणूस’ भेटल्याची कृतार्थ तृप्ती आहे.
तिच्या आयुष्यात विसाव्याच्या या प्रेमळ क्षणांचा शिडकावा करणारे डॉक्टर आपल्यातलेच एक आहेत. आपल्या हातातल्या मानवतेच्या इवल्याशा पणतीचा उजेड इतरांना देण्यासाठी अखंड धडपडणारे. प्रकाशाचा अर्थ शोधायचा नसतो जगतांना, जाणीव ठेवायची त्याच्या कर्तुत्वाची. कारण हे प्रकाशाचे कण आपल्याला स्पर्शून पुढे जातांना काहीही मागत नाहीत आपल्याला,उलट खूप काही देऊन पुढे जात असतात त्यासाठी फक्त मनाचे डोळे उघडे ठेवायचे असतात. कोणी सांगावे त्याने आपल्यासुद्धा मनाचा गाभारा कधीतरी लख्ख उजळेल आणि त्यात आपलेही रूप स्वच्छ दिसू शकेल, आजीसारखेच! आणि आपल्या अगदी आजूबाजूला दिसतील डॉक्टरांसारखी ‘खरी माणसे’ जी कधीच दीपस्तंभ झालेली आहेत. अज्ञात दु:खांच्या वादळात निष्पाप माणसांचे माणूसपण हरवून जाऊ नये म्हणून!
© डॉ. अंजली /अनन्या 


 
   



        

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

आम्ही सारे भारतीय...!






बऱ्याच वेळा आपण इतरांना सोईस्कर ठरेल अशाच बेतानं वागत असतो.आपले योग्य-अयोग्य बद्दल असलेले मत,समज, आपल्या धारणा,विश्वास आणि कल्पना ओलांडून आपण ‘लोकांना काय वाटेल’ म्हणून सामाजिक समारंभात सहभागी होत असतो. असं वागण्याची खरंच गरज असते का? की आपण केवळ वेळ साजरी करतो?
बरं, या ‘इतर’ लोकांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी,आपल्या भावविश्वाशी संबंध असतोच,असं नाही. आपल्याला त्यांच्याबद्दल  खूप काही प्रेम वाटत असतं, त्यांच्या कार्यक्रमांविषयी आस्था असते, किंवा त्या समारंभात आपण खूप काही आनंदात असतो,असेही नाही. मग त्यांच्याशी जुळवून घेण्याचा इतका अट्टाहास आपण कशासाठी करतो? आणि वर पुन्हा स्वतःच स्वतःला स्पष्टीकरण देत बसतो? का?
आपल्या आनंदाशी जोडलेले सण,समारंभ,उत्सव साजरे करतांना त्यातले आपल्याला पटेल,रुचेल,पेलवेल आणि परवडेल ते ठामपणे स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास काय हरकत आहे? हास्यास्पद, कालबाह्य सण-समारंभ केवळ दुसऱ्यांसाठी म्हणून साजरे करणे आता सोडून द्यायला हवे.
आनंद असो वा दु:ख, आपल्याला वेळ ‘साजरी’ करण्याची सवय लागलीये. उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला केवळ एक निमित्त हवे!  
आपण उत्सवप्रिय आहोत, मान्य. सगळ्यांनी मिळून एकत्र येणे.मजा,गंमत करणे,एकत्र खाणे-पिणे हे ही समजण्यासारखे. पण त्या पलिकडे जाऊन उत्सव म्हणजे आता केवळ एक ‘फॅड’ झाले आहे, असे नाही वाटत?
आपला आनंद, दु:ख  ‘प्रदर्शनीयच’ असावे का? आणि अशा प्रदर्शनात आपणही केवळ जनरित म्हणून सहभागी व्हावं?  साजरं करण्यात वाईट काही नाहीये, पण ते ज्या पद्धतीने केलं जातंय ते मात्र वाईट आहे.
त्यापेक्षा स्वत:च्या मनाला आवडेल ते करणं..आणि वेळेत ‘नाही’म्हणायला शिकणं..हेदेखील जमायला हवं,नाही का?
एका लग्नाला गेले होते, वातावरणात उत्साह,’उन्माद’ वाटेल या पातळीवर होता. प्रत्येक गोष्टीत वेड्यासारखा खर्च केलेला दिसत होता. लग्नाचा हेतू काय आणि त्यासाठी आपण करतो काय, याचे यजमानांचे आणि पाहुण्यांचे भान सुटलेले दिसत होते. लग्न लागले, डोळे दिपवून टाकणारी आतषबाजी झाली. वातावरणात खमंग अन्नाचा आणि फटाक्यांचा संमिश्र वास भरून राहिला. आजूबाजूला खाण्याचे विविध स्टॉल्स आणि त्यात डोळ्यांना खुणावणारे अगणित पदार्थ दिसत होते. अशा गर्दीत आपल्याला माणसांच्या विविध तऱ्हा,मनोवृत्ती दिसतात. काही लोकं लग्नाला म्हणून येतात की केवळ चवीने खाण्यासाठी,असा प्रश्न पडतो. तिथेही अनेक लोक असे होते की ज्यांना प्रत्येक पदार्थ चाखायचाच होता. रांगा लावून लोकांनी आवर्जून सूप प्यायले. आपापली डिश घेतली आणि जागा मिळेल तसे बसायला सुरवात केली. आता आजूबाजूला अस्ताव्यस्त खाणाऱ्या लोकांची नुसती धांदल.
काही वेळापूर्वी स्वच्छ, सुबक,सुंदर वाटणारी सजावट, व्यवस्था अगदी काही वेळातच अस्ताव्यस्त झाली. लोकांनी खाणे कमी आणि टाकणे,भिरकावणे जास्त अशी परिस्थिती होती. आपल्या पोटाला किती लागते आणि किती ताटात वाढून घ्यावे याचे तारतम्य सुटलेली लोके बघून जेवण्याची इच्छाच गेली.
इतक्यात रांगेत उभ्या असलेल्या एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाला एका माणसाने खसकन ओढून बाजूला केले..इतक्या जोरात की तो मुलगा खाली पडला. त्याच्या हातातली डिश खाली पडली..अन्न विखुरले. इतका त्या माणसाला कशाचा राग आला? तर  झालं होतं असं की, एकदा पळवून लावूनही तो अनाहूत पाहुणा, चांगल्या जेवणाच्या आशेने दुसऱ्या बाजूच्या रांगेत घुसलेला होता..तो काही आमंत्रित लोकांच्या मुलांसारखा दिसत नव्हता म्हणून त्याला बरोबर वेचून बाजूला काढता आला.  
मुलगा अर्थातच शरमला होता. तिथेच काम करणाऱ्या कोणा कर्मचाऱ्याचा तो मुलगा होता. त्यादिवशी वडिलांबरोबर आलेल्या त्याला भूक लागली होती आणि पदार्थांच्या वासाने अस्वस्थ होऊन तो जेवण्याच्या रांगेत गेला होता कोणीतरी त्याला ओळखले आणि त्याला पुन्हा जेवण्याच्या रांगेत उभे केले गेले..पण त्याचे इवलेसे मन आता नाराज झाले असावे. त्याने हळूच रांगेतून काढता पाय घेतला, न जेवताच..आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला.
                 


जेवण झाल्यावर खरकट्या डिश गोळा करण्यासाठी ठेवलेले मोठे मोठे टब वाया गेलेल्या अन्नाने थोड्याच वेळात ओसंडून गेले..लोकांनी कितीतरी अन्न ताटात वाढून घेऊन टाकून दिलेले होते.
किती विरोधाभास आहे, ना आयुष्य?  माणसं सुसंस्कृत आहेत असे का म्हणयचे?
याच कार्यक्रमात आनंद साजरे करणारे अनेक चेहरे होते आणि त्यांना आनंद साजरा करता यावा, त्यामागची मेहनत करणारे देखील अनेक चेहरे होते..दोन्ही चेहऱ्यांच्या मागच्या भावनांमध्ये किती जमीन अस्मानाचे अंतर होते, खरंच!
हे आपण प्रत्येक साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात बघतो. ‘आनंद’ जरूर साजरा करावा पण तो करतांना त्यासाठी कष्ट घेणाऱ्या लोकांकडे आपण किमान “माणूस’ म्हणून तरी बघतो का याचा विचार देखील जरूर करावा.
जग बदलले,पिढ्या बदलल्या पण अजूनही श्रम आणि पैसा आणि सत्ता यांचे गणित व्यस्तच आहे की...आणि गरीब हा केवळ आर्थिक परिस्थितीने गरीब असतो..त्याला जात-पात,धर्म आणि इतर रंग आपण केवळ आपल्या सोयीसाठी देतो. कारण आपल्याला त्याची गरिबी काहीतरी हेतूने वापरायची असते. कारण आपल्याला मोल आहे ते फक्त पैशाचे!
‘शारीरिक श्रम’ आपल्यासाठी कायम दुय्यम,दुर्लक्षित.
आपला आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतांना प्रत्येकाने हा विचार जरूर करावा की आपला तो आनंद, आपण ‘माणूसपणाच्या पातळीवर’ तरी घेतोय का?
हॉटेलमधले वेटर्स, वॉचमन, ड्रायव्हर, रस्त्यावरचे फेरीवाले,भाजीवाले,छोटे दुकानदार, लहान विक्रेते, रिक्षा आणि इतर वाहनचालक, घरकाम,बागकाम करणारी माणसे..अनेक छोटी मोठी श्रमाची कामे अगदी थोड्या मोबदल्यात करणारी माणसे..आपल्या क्षणभराच्या आनंदासाठी, आपल्याला सुख मिळावे म्हणून दिवसभर राबत असतात.
आपण थोड्या पैशांच्या मोबदल्यात तो आनंद,सुख,आराम, सेवा विकत घेत असतो,इथपर्यंत ठीक आहे..पण मग त्या लोकांशी वागण्याच्या पातळीवर तरी आपण ‘माणूस’म्हणून वागतो का?
त्यांची जाणीव ठेवतो का? त्यांच्या शारीरिक श्रमाबद्दल आपल्याला आदर वाटतो का?  
साजरे करणे म्हणजे आपल्याजवळचे दुसऱ्याला देणे..हे देतांना, आणि ‘आपले-परके’..अशा चौकटी आखतांना आपण सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत वागतो आहोत का?
‘आमंत्रित’ लहान मूल तेवढे प्रतिष्ठित आणि बिनाआमंत्रण आलेले तेवढेच मूल मात्र अप्रतिष्ठित?
परवा एका भाजीवालीने घासाघीस करणाऱ्या एका सद्गृहस्थांना माझ्यासमोर अगदी चपखल उत्तर दिलं..
“भाऊ, तुम्हाला सातवा वेतन आयोग पाहिजे आणि तरीही भाजीचा भाव मात्र जुनाच पाहिजे,नाही का? आम्ही कुठं जायचं मग संप करायला?”
हा प्रश्न व्यवस्थेने ‘माणसातल्या माणुसकीला’ विचारलेला प्रश्न आहे.. आपल्याकडे खरंच आहे का याचे उत्तर?
© डॉ.अंजली/अनन्या
mindmatteraa@gmail.com
(फोटो सौजन्य गुगल)



शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

फिरुनी नवी जन्मेन मी!


शौनक डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्ये एका बाजूला, कोपऱ्यात बसलेल्या त्याच्याकडे आजूबाजूने अखंड वाहणाऱ्या गर्दीचं अजिबात लक्ष नव्हतं. थंडीचे दिवस आणि खालची थंडगार फरशी. त्याला फक्त इतकं समजलं होतं की थोड्यावेळात ती अॅम्ब्युलन्स येणार. त्याच्या आईला बसवलं जाणारं हार्ट कदाचित त्यातून येईल.. उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या गेटमधून कोणालाच आत सोडत नव्हते. मान वाकडी करून कळ लागली.
गेल्या महिनाभर त्याचं इवलंसं मन हवालदिल झालं होतं. आई हॉस्पिटलमध्ये. ती आपल्याला सोडून निघून तर जाणार नाही ना, या विचारांनी त्याला झोप पण नीट लागत नसे. देव असलाच तर त्याने ऐकायला पाहिजे म्हणून तो सतत एक प्रार्थना म्हणे..आईनेच शिकवली होती त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी त्याने मामाला विचारलं होतं की आईला झालंय काय? त्यावेळी त्याने सगळं सांगितलं त्याला. जितकं समजेल तितकं त्याने लक्षात ठेवलं होतं. जीवाचा कान करून ऐकलेल्या मोठ्यांच्या गप्पांमधून ‘आईचं मोठं ऑपरेशन झाल्यावर ती मग कायमची बरी होणार आहे हे वाक्य ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. कोणी आईला भेटू देत नव्हते त्याला. आपली कोणाला अडचण होऊ नये असा तो एका कोपऱ्यात गुपचूप बसून रहात असे. त्याला तिथे थांबायला कोणी अडवू नये याची काळजी कशी घ्यायची हे त्याने लवकरच शिकून घेतले होते.
अॅम्ब्युलन्स आली. लोकांच्या गर्दीत त्याला काहीही दिसलं नाही. थोड्यावेळाने ती निघून गेली तरी शौनक जागचा हलला नाही. सकाळपासून त्याने काहीही खाल्लेले नव्हते. भूक लागली होती पण आता त्याला कशाचीच पर्वा वाटत नव्हती. रात्रीपर्यंत थांबून मामा त्याला घरी सोडायला निघाला. “आईचं ऑपरेशन नीट झालं,लवकरच तुला तिला लांबून बघता येईल” मामा म्हणाला पण जोपर्यंत तिला बघत नाही तोपर्यंत शौनकचा विश्वास कोणाच्याच सांगण्यावर बसणार नव्हता. “मामा,आईला दुसऱ्या कोणाचं तरी हार्ट बसवलं, मग तिचं कुठे गेलं?”
“तिचं काढून तर दुसरं बसवलं” तरीही त्याच्या मनात अनंत प्रश्न होते.
“मग आई मला विसरून तर जाणार नाही ना?” त्याने त्याला  सगळ्यात जास्त छळणारा प्रश्न विचारला..
“ नाही रे ते मेंदूचं काम असतं..!” मामा म्हणाला आणि शौनकला हायसं वाटलं. त्यावेळी असेल तो अकरा-बारा वर्षांचा.
आज एखाद्या पिक्चरसारखं त्याला सगळं आठवलं. काळानं जणू आपलं एक आवर्तन पूर्ण केलं होतं. आजही तो पुन्हा तशाच एका भव्य हॉस्पिटलच्या आवारात होता. पोटात तीच कालवाकालव होत होती. मनात असंख्य प्रश्न होते पण यावेळी निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर आली होती. सगळ्यांच्या नजर त्याच्यावर होत्या आणि त्याच्या नजरेसमोर मात्र जसाच्या तसा होता भूतकाळात त्याने अनुभवलेला तो प्रसंग...
आज अनुभव परिपक्व आहेत. मन महत्वाच्या,सूक्ष्म गोष्टींचा अंदाज लावू शकते आहे,पण भावना सांभाळणं मात्र आजही तितकंच कठीण झालं आहे. कारण..कारण आज माझी मृणा..,माझ्या काळजाचा तुकडा त्या जागेवर आहे.  मिटलेल्या डोळ्यांसमोर सारखी तिची हसरी,खेळकर मूर्ती येते आहे. तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये चैतन्याचं,आनंदाचं कारंजं उसळत असायचं कायम. प्रत्येक गोष्टीत तिचा उत्साह नुसता उतू जायचा.. बोलका स्वभाव,त्यामुळे घरी-दारी सगळीकडेच लाडकी, हवीहवीशी असलेली मृणा.
पण त्या काळाकुट्ट दिवशी सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं..  मागून येणाऱ्या ट्रकने तिच्या गाडीला जोरात धडक दिली. मृण्मयी इतक्या जोरात फेकली गेली ती खाली जमिनीवर पडली ते शुद्ध हरपूनच. कोणीतरी ताबडतोब तिला हॉस्पिटलला नेले..आम्हाला फोन आला.. आम्ही जीवाच्या आकांताने धावलो. त्या ट्रकवाल्याला लोकांनी थांबवले होते आणि भरपूर चोप दिला होता..त्याला म्हणे ही रस्त्यात दिसलीच नव्हती..आता काय आणि कसे याला काही अर्थ उरला नव्हता..पुढे काय इतकेच फक्त महत्वाचे उरले होते.
अठरा तास झाले आमचं बाळ मृत्यूशी झुंज देते होते. अजूनही शुद्ध नव्हती.
नातेवाईक,मित्र धावत आले. मृण्मयीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झालेला. संकेत बेंगलोरला एका सेमिनारसाठी गेलेला होता. लगेचच्या फ्लाईटने तो पुण्यात पोहोचला. मृण्मयीला अशा अवस्थेत बघून त्याला स्वतःला सावरणे जमेना..नेमके काय झालेय..तिला कुठे लागले आहे याचे काही रिपोर्ट येणे अजून बाकी होते. शरीरावर अनेक ठिकाणी लागल्याचे दिसत होते.. हाताचे,पायाचे हाड फ्रॅक्चर झालेले होते. बघवत नव्हते काहीच..मन एक क्षण देखील शांत नव्हते..
अनेक तपासण्या केल्या गेल्या. एकमेकांना धीर देत, अस्वस्थ मनस्थितीत सगळ्यांचे डोळे फक्त रिपोर्टकडे लागलेले होते. जीव मृण्मयीकडे एकवटला होता....
आणि अखेर डॉक्टरांनी सांगितले की मृण्मयी जवळजवळ या जगातून गेलेलीच आहे...सपोर्ट सिस्टीम काढून घेतली तर तिला तिचा स्वतंत्र श्वास घेणे शक्य होणार नाही आणि सगळे संपेल..
ते काय सांगतायेत हे शब्द फक्त डोक्यात शिरत होते पण ते समजत नव्हते कोणालाच..एक शून्य अवस्था...नि:शब्द..बधीर  जीवघेणी अस्वस्थता..एकमेकांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते इतकी शांतता. माझ्या पायातलं त्राण निघून गेलं..सगळं संपलं होतं..एक हसतं-खेळतं अस्तित्व..जगणं सुरु होण्याआधीच..संपून गेलं.आता पुढचा निर्णय घ्यायचा होता..आणि तो होता चालू असलेली सगळी ट्रीटमेंट थांबवण्याचा.
मृण्मयीच्या शरीरातले सगळे महत्वाचे बाकी अवयव शाबूत होते..त्यांना कुठेही काहीही धक्का बसलेला नव्हता..तरुण वय आणि ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट..तिचे जास्तीतजास्त अवयव दुसऱ्या कोणा गरजू व्यक्तीच्या उपयोगात येऊ शकतील..त्यांना जीवनदान मिळू शकेल..
एकदा कॉलेजमध्ये ‘मरणोत्तर देहदान’ विषयावर एक वादविवाद स्पर्धा होती..त्यावेळी आजीचा अनुभव शौनकने तिला सांगितला होता. आपण सगळेच हा फॉर्म नक्की भरू,असे मृण्मयी म्हणाली सुद्धा होती..अजून काही दिवसातच या गोष्टीवर खरोखरच विचार करावा लागणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.
नियतीचे संकेत कोणाला कधी कळले नाही तरी सूत्रबद्ध असावेत कदाचित.
डॉक्टरांनी आणखी माहिती देऊन लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी अशाच कोणीतरी घेतलेल्या निर्णयामुळे माझी आई मला परत मिळाली होती. पुढे आई तिचे संपूर्ण आयुष्य आनंदात, निरोगी जगली.
त्या आनंदाच्या, कृतार्थतेच्या, समाधानाच्या क्षणांचे दान कोणा गरजू व्यक्तींच्या ओंजळीत घालण्याची वेळ आली होती. माझ्या मृणाच्या इच्छेचा आदर वाटला मला. हात थरथरत होते, डोळ्यांना अक्षरं दिसत नव्हती तरीही मी नेटाने सही केली.



हॉस्पिटलमधून परत घरी येतांना पावलं जड झालेली होती..कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सगळं संपल्याची एक हताश जाणीव सरसरत मेंदूपर्यंत गेली..त्याचवेळी  मृणाचा हसरा चेहरा नजरेसमोर फ्लॅश झाला. स्व:ताला सावरले, सावरणे भाग होते.
दु:ख खूप मोठे आहे पण हवालदिल व्हायला नको. माझी लेक जवळच्या, ओळखीच्या, सगळ्यांसाठी एक आदर्श घालून गेली आहे. त्या तिच्या भावनांचा सन्मान मला करायला हवा. मला खात्री होती माझी मृणा अत्यंत समाधानाने पुढच्या प्रवासाला गेली आहे.
आज कोणाच्यातरी शरीरात तिच्या हृदयाने चैतन्याची फुंकर घातली असेल, कोणाच्यातरी डोळ्यांना तिच्यामुळे दृष्टीचे अनोखे सुख मिळेल, कोणाच्यातरी कानांना सृष्टीचे, अगम्य बोल ऐकू येऊ शकतील, कोणाची तरी त्वचा सुखाच्या संवेदनांनी झंकारून उठेल, कोणाचेतरी श्वास पुन्हा सुरु झाले असतील आणि परमेश्वराला अखंड साकडे घातलेल्या कोणा चिमण्या जीवाच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे हसू असेल..त्याला सुरक्षित वाटत असेल. नाती,आयुष्य परिपूर्ण झाली असतील. जीवनाचा आनंददायी स्पर्श सगळ्यांना सुखावत असेल.
माझ्या मृणाच्या शरीराचा प्रत्येक कण कोणाच्यातरी उपयोगात आला असेल.. दुर्दैवाने तिला स्वतःचं आयुष्य नाही पूर्ण करता आलं पण  तिच्या शरीराने ही अपूर्णता किती पटीने भरून काढली. किती जगलो, ही आयुष्याची लांबी महत्वाची नसतेच मुळी.
माझी ओंजळ रिकामी नाही..रात्र जरूर आहे, पण काळीकुट्ट घाबरवणारी मुळीच नाही. कारण कृतार्थ समाधानाचे लखलखते चांदणे आज आमच्या सोबतीला आहे. आणि स्वयंप्रकाशाच्या तेजाने उजळून निघालेली माझी मृणा आज त्या उंचीवर आहे.
या लखलखीत भावनेचा स्पर्श झालेल्या शौनकने आज आपलं आयुष्य ‘मरणोत्तर देहदान’ या विषयाच्या जागृतीसाठी समर्पित केलं आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामागे त्याच्या आयुष्याचा अनुभव आहे. ऐकणाऱ्याच्या हृदयात दृढ निश्चयाची एक आश्वासक ज्योत प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य त्यात नक्की आहे.
आयुष्यात वेळ,काळ,परिस्थिती कोणालाही सांगून येत नाही. ती कोणावर कधीही, कोणत्याही रुपात येऊ शकते.
माणुसकीच्या या सद्भावनेचा आपण सगळेच सन्मान करूया..आज मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करूया!

© डॉ. अंजली/अनन्या औटी.
mindmatteraa@gmail.com

(फोटो सौजन्य: गुगल)

     




  



मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

प्रेमाचे रंग हजार
                                                   
शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी त्याला वाचवले. जवळजवळ अठरा तासांनी तो शुद्धीवर आला आणि त्याने पुन्हा डोळे उघडले. प्रेमभंगाचे दु:ख सहन न होऊन त्याने निकराचा आत्महत्येचा प्रयत्न केला होता..वय होते केवळ २६.
शुद्धीवर आला पण आता निसर्गाने त्याची चालण्याची क्षमता हिरावून घेतली होती. या अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले होते!
आई,बाबा,त्याच्या दोन्ही बहिणी यांनी दिवसरात्र एक करून त्यानंतर पाच महिने त्याची जीवापाड काळजी घेतली.
शरीराच्या वरवरच्या,खोलवरच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. पण मन?
मन अजूनही अंधारलेल्या खोल दरीत जगण्याचा एकतरी धागा हाती लागतोय का हे शोधण्यासाठी धडपडत होतं.
संवेदनशील तर तो होताच. घरातल्या आणि त्याला भेटायला येणाऱ्या सगळ्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यामागचे प्रश्न त्याला त्यांच्या डोळ्यांमधून अगदी स्पष्ट वाचता येत होते.
त्याच्याशी सतत संपर्क साधून असलेल्या आणि त्याच्यावर नियमित उपचार करणाऱ्या डॉक्टर अस्मिताने त्याला अनेक विषयांवर अत्यंत हळूहळू बोलते केले होते.
संपूर्ण अंधारकोठडीत असलेल्या मनाला हळूहळू पुन्हा नेहमीच्या जगापर्यंत घेऊन येणं वाटतं तितकं सोपं नाही..ना परिस्थितीत अडकलेल्यासाठी आणि ना त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेल्यांसाठी.
एखादी घटना एकदाच घडते. पण तिचे परिणाम संबंधित सगळ्यांच्या आयुष्यावर दूरपर्यंत परिणाम करतात.
काही परिणाम तर संपूर्ण आयुष्य प्रभावित करतात आणि न बदलता येण्यासारखे कदाचित कायमचे होऊन बसतात,
जसे या घटनेनंतर स्वराजचे पाय गेले.
सापशिडीच्या खेळासारखं आयुष्य झालं..उच्च शिक्षण घेऊन, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका नावाजलेल्या कंपनीत नोकरीसाठी निवड झालेला तो..एका अविचाराच्या मानसिक अवस्थेत पुन्हा शून्यापर्यंत, एकदम तळाशी येऊन पोहोचला होता.
एखादी महत्वाची गोष्ट आपण गमावतो ना त्यानंतरच लक्षात येतं, अगदी पूर्णपणे, की त्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व होतं!
पश्चातापाच्या आगीतून होरपळून घ्यावं लागतं स्वत:ला. जे प्रश्न मनाशी बोलायला सुद्धा टाळत असतो त्यांचा सामना करावाच लागतो,मग इच्छा असो किंवा नसो तुमची.
स्वराजलादेखील यातलं काहीही चुकलं नाही. वेळ घेत, त्याच्या कलाकलाने अस्मिताने त्याला एकेक करून सगळ्या नकोशा प्रश्नांचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं.
कॉलेजला असल्यापासून अवंती सोबत होती त्याच्या. पहिल्याच वर्षी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याचं प्रेम आणखी आणखी घट्ट होत गेलं..मिळून कितीतरी स्वप्न बघितली. मनं एकजीव झाली.
त्याला पुढे अजून शिकायचं होतं पण तिला आता कमावण्याचे वेध लागले होते. संपूर्ण कॉलेजमध्ये अगदी शिक्षकांच्यापण लक्षात त्यांची जोडी आली होती. डिग्री पूर्ण झाल्यानंतर अवंतीने लगेच नोकरी करायला सुरवात केली आणि स्वराज आणखी शिकण्यासाठी सिंगापूरला गेला.
या दोन वर्षातच सगळं बदललं. अवंती दूर दूर जायला लागली. स्वराज सैरभैर झाला. त्याने हरतऱ्हेने प्रयत्न करूनही त्याला त्याचं नातं पुन्हा सावरणं शक्य झालं नाही.
एकीकडे लौकिकदृष्ट्या यशाच्या शिखराकडे जाणारा तो मनातून मात्र अधोगतीच्या रस्त्याने चालायला लागला.
चांगली नोकरी मिळवून पुन्हा भारतात परतलेला तो उत्साहात आणि आनंदात तिला भेटायला गेला आणि त्या भेटीतच त्याला अवंतीने झिडकारलं. अपमान आणि संतापाच्या कडेलोटातून त्याने संपूर्ण आंधळेपणाने आत्मघाताचा पर्याय निवडला.
अविचाराचा हाच एक क्षण, ज्यावेळी व्यक्तीमधली बुद्धीमत्ता आणि अंगातलं, अनुभवातलं सगळं शहाणपण माणसाला सोडून जाऊ शकते. संस्कार,शिक्षण आणि यशदेखील मागे खेचू शकत नाहीत. 
त्या क्षणाकडे डॉ. अस्मिताने त्याला नीट बघायला सांगितले. तो “क्षण” ज्याचा सामना करण्याचे टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजायचा पर्याय निवडला.
पण आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा सामना माणसाला कधी न कधी करावाच लागतो. आपले नेमके काय चुकले, आणि का चुकले हे नीट समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुन्हा पुढची वाट चालणे अशक्य होते.
आणि एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर तो आयुष्यात पुन्हा पुन्हा तीच ती चूक सातत्याने करत राहतो.
अवंती भेटण्याच्या आधी त्याच्या आयुष्याचा जो काही रस्ता होता, त्यातले टप्पे होते ते त्याचे आयुष्य सुद्धा अनेक घटनांचे आणि जवळच्या नात्यातील लोकांनी केलेल्या प्रेमाच्या अनेक घटनांनी बनलेले होते.
प्रत्येकाचे त्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान होते,महत्व होते. या सगळ्याचा पुन्हा विचार करावा लागला.
त्याच्या एका निर्णयाने हे सगळे महत्व आणि सगळे प्रेम एका क्षणात मातीमोल ठरवले होते. हे त्यांच्या सगळ्यांवर अन्याय करण्यासारखे होते! एखाद्या व्यक्तीचा फक्त काही वर्षांचा सहवास एखाद्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठा वाटतो, या त्याच्या विचारांचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे अत्यंत गरजेचे होते.
आजही सावरण्याच्या प्रत्येक क्षणात त्याच्या खऱ्या जवळची नाती शब्दही न बोलता त्याच्या मनाची संपूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती.
अवंतीवर केलेलं प्रेम आणि त्याचे इतर आयुष्य...काहीवेळा तुलना अपरिहार्य असते आणि ती केली की एरवी मनाला न समजणारा फरक ती अत्यंत परखडपणे दाखवून देते.
आयुष्य प्रत्येकवेळी सहज,सुंदर नसते..आपण चुकीचे निर्णय घेतले की आपल्याला जागेवर पुन्हा परत आणण्यासाठी ते अशी जोरदार थप्पड मारण्याची क्षमता देखील ठेऊन असते.
आणि मग कुठे तो फरक आपल्याला अगदी स्वच्छ दिसायला,जाणवायला लागतो!....मगच दृष्टिकोन बदलतो!!
प्रेम त्यालाच समजते जो आधी स्वतःवर प्रेम करतो..प्रेमातला हा गुणात्मक फरक जाणवला आणि स्वराज मनातून कमालीचा खजील झाला. अस्मिताने त्याच्या लक्षात आणून दिले की तो स्वतःवर देखील प्रेम करत नव्हता.
अवंती केवळ स्वतःवरच आंधळे प्रेम करत होती म्हणून तिने कोणताही मागचापुढचा विचार न करता नाते संपवण्याचा निर्णय क्रूरपणे स्वराजला ऐकवला. आपण ‘प्रेम’ कसे करतो,’नकार’ कसा देतो हे देखील त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपापल्या व्यक्तिगत मर्यादांनुसार माणसे वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांशी वागू शकतात.
‘अवंतीचे प्रेम म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे’ ‘तिच्याशिवाय मी आयुष्य जगू शकत नाही’ असे विचार करणारा स्वराज स्वतःला अत्यंत कमी समजला होता.
स्वतःची लायकी अवंतीच्या समोर अत्यंत कवडीमोल आहे,असे समजला होता!
तिच्याशिवाय जगणे असह्य होऊन त्याने जवळजवळ स्वतःला संपवले होते..
आणि त्याला अजूनही असे वाटत होते की मी अवंतीवर अत्यंत मनापासून “प्रेम” केले.
पण खरेतर स्वराजला मुळात “प्रेम” म्हणजे काय? याची अजूनही समज अजिबात नव्हती.
“प्रेम” ही केवळ एक भावना आहे! सिनेमात दाखवतात तशी ती एकरंगी, एकसुरी बिलकूल नाही.
“राग” “काळजी””लोभ””वात्सल्य” ”मत्सर””खंत””दु:ख” या मानवी नैसर्गिक भावनेइतकी ती स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे.
अत्यंत राग आला की आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे तो व्यक्त करतो. राग येणे स्वाभाविक पण तो व्यक्त करण्याच्या पद्धती तो अनुभवणाऱ्या माणसांच्या मानसिकतेवर, आयुष्य अनुभवण्याच्या मूळ वृत्तीवर ठरतात.
रागात एखाद्याला, स्वतःला नुकसान पोहोचवणारा राग हा “अनैसर्गिक राग” आहे!
प्रेमदेखील अशीच केवळ एक भावना!
प्रेम व्यक्त करणे प्रेमभावना अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
आत्यंतिक प्रेमासाठी एखादी व्यक्ती स्वतःचे आणि दुसऱ्याचे नुकसान करत असेल तर प्रेम अनुभवण्याची, व्यक्त करण्याची  त्या व्यक्तीची मानसिक क्षमता “रोगट”आहे.
स्वराजचे आणि अवंतीचे स्वतःवरील आणि एकमेकांवरील प्रेमदेखील असेच “रोगट” होते!
पुस्तकी अभ्यासात हुशार असणे वेगळे आणि प्रत्यक्ष जीवन जगतांना लागणारी भावनिक आणि मानसिक साक्षरता सुदृढ होईल असे शिक्षण आज आपल्या मुलांना देण्यात आपण कमी पडतो आहोत या वास्तवाचा हा परिणाम आहे.
स्वराजला पहिल्यांदाच आरोग्यदायी, निरामय “प्रेम” उदाहरणासहित समजले.
अवंतीने “नाही” सांगितल्यानंतर काही काळ वाईट वाटणे, हे स्वाभाविक होते. आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेल्यानंतर स्वाभाविकपणे वाटणारे दु:ख हे नैसर्गिक आहे.
पण ते दु:ख अनुभवतांना आपला वागण्याचा तोल जाणं आणि त्यातून काही स्वतःला आणि इतरांना कमीअधिक नुकसान पोहोचवणारे निर्णय घेणे ही “दु:ख” सहन करण्याची “रोगी” पद्धत झाली.
प्रेमात अचानक कोणी “नाही” म्हणणं ही त्या नाही म्हणणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातला,मानसिकतेला,समजेला अनुसरून असते. ‘नकार’ स्वीकारणे देखील असेच समजेवर अवलंबून असते.
आयुष्य जगतांना कोणतेही नाते परस्परांवर अवलंबून असावे पण संपूर्णपणे ‘परावलंबी’ नसावे.
प्रेमभावना किती व्यापक आहे! प्रेम कोणावरही असू शकते, कशावरही असू शकते. प्रेम करण्याची प्रचंड क्षमता माणसात आहे!
ते केवळ व्यक्तीवरच असते असे नाही तर एखाद्या ध्येयावर असू शकते, स्वप्नावर असू शकते, निसर्गावर असू शकते, प्राण्यांवर असू शकते..पुस्तकांवर असू शकते..कलेवर असू शकते..नुसत्या चांगले जगण्यावर देखील असू शकते.
अशी प्रेमात भारावलेली कितीतरी माणसे आपण आपल्या आजूबाजूला बघतोदेखील. अस्मिताने कितीतरी उदाहरणे दिली.
स्वराजला अस्मिताचे म्हणणे संपूर्णपणे पटले.



“प्रेम” म्हणजे नेमके काय हे आता कुठे समजले पण त्यासाठी किती मोठी किंमत चुकती केली.
आता आपल्याकडे काय नाही यापेक्षा ‘काय आहे’ तिथून आपण आयुष्याची पुन्हा एक नवी सुरवात करू शकतो हे त्याच्या लक्षात आले.
नोकरी अजूनही हातात होती..भविष्यात अनेक ऑपरेशन करून त्याला कदाचित चालता देखील येणार होते. जवळची,खरी जिवलग सगळी नाती त्याच्याजवळ होती..या संकटकाळात टिकून असलेले अनेक मित्र,त्यांची मैत्री देखील त्याच्या सदैव सोबतच होती आणि आता संपूर्णपणे बदलेल्या दृष्टीकोनातून जगता येईल असे आयुष्य देखील त्याच्या जवळ होते..
स्वराजने मन:पूर्वक अस्मिताला नमस्कार केला. त्याचे डोळे पाण्याने तुडुंब भरून आले.
त्याच्या हातावर हलकेसे थोपटून अस्मिताने त्याचा निरोप घेतला. आता तिला खात्री होती शारीरिकदृष्ट्या आज स्वराजच्या पायात शक्ती नसेलही पण त्याच्यात आता खरेखुरे चालण्याचे बळ नक्कीच आले आहे!   
© डॉ. अंजली/अनन्या औटी.
# आरसा
mindmatteraa@gmail.com