रविवार, २५ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 3



मनात भीती असते,मला करोना झाला तर? 
माझ्यामुळे माझ्या घरातल्या कोणाला झाला आणि त्यांना काही झालं तर? त्यांच्या मृत्यूचे भय. माझे आईवडील,भाऊ बहीण, मुलं जे लांब राहतात त्यांना काही झालं तर?
माझ्या नोकरी,व्यवसाय याबद्दलच्या आर्थिक चिंता. 
याबद्दलची सत्यता, वस्तुस्थिती यावर संयमाने विचार न करताच आपली स्ट्रेसलेव्हल वाढत नाहीये ना?
आपल्या ओळखीचे,शेजारी,जवळचे रोज कोणीतरी संकटात असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. वारंवार बोलून ताण आणखी वाढतोय.
बोलणारा कदाचित मन हलकं करत असतो पण ऐकणारा? आपण नुसते ऐकत नाही. बातम्या सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आपल्या सवयीनुसार ऐकलेले amplified करतात. 
आपल्या शत्रूवरदेखील वाईट वेळ येऊ नये अशी सदिच्छा बाळगणारे आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत अशी अनेक दिवाचित्रे,शक्यता आपल्या नकळत मनातल्या मनात रंगवत असतात.
आज करोनाची भीती असेल पण करोना नव्हता तेव्हा काळजी,चिंता आणि समस्या नव्हत्याच का? 
चिंता करण्याची आपल्या मनाला सवय तर नाही? एकदा तपासायला हवंय.
घरातून कोणी बाहेर निघालं, तर त्याचा accident तर होणार नाही? पहिल्यांदा हा विचार मनात येणारे अनेकजण आहेत. 
आपल्या जवळच्या लोकांबाबाबत इतका वाईट मनात येतो याचा अपराधभाव खूप जास्त असतो.
त्यातून भानावर येणे काहींना जमते. काही त्यात अडकतात, त्यात मानसिक व्याधींचे मूळ असू शकते. विचार असह्य होतात,सतत मनात येतात त्यावर मात करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात.
त्यांचा उपयोग होण्यापेक्षा आणखी त्रास होऊ शकतो. अतिविचार टाळता येणे शक्य आहे,त्यासाठी मदत उपलब्ध असते. गरज असते वेळेत आपल्याला होणारा त्रास लक्षात येण्याची.
मानसिक अस्वस्थतेबद्दल कोणाजवळ विश्वासाने बोलता येईल,त्यावर चर्चा करता येईल असे वातावरण घरात, समाजात मिळायला हवे.
आपले हसे होईल म्ह्णून या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. 
लहान मुलांच्या मनात अशा असुरक्षितता,भीती खूप जास्त असतात. त्या व्यक्तदेखील होत असतात. अनेकदा घरातले मोठे" शुभ बोल रे नाऱ्या" म्ह्णून त्याला फटकरतात. 
आपल्या आजूबाजूला असलेलं कोणी असं काही व्यक्त करत असेल तर सावध असा. 
ती संवादाची संधी आहे. त्यांची कारणे ऐका, समजून घ्या. त्यांना विश्वास द्या, सांगा की
आपल्या मनात येणाऱ्या सगळ्याच विचारांवर विश्वास ठेवण्याची गरज नसते. त्यात कचरा भरपूर असतो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असते.
आपल्या मनातले असे विचार ताबडतोब खरे होतील याची शक्यता शून्य असते.
शक्यता केवळ आपल्या डोक्याचे खोबरे होण्याचीच जास्त असते. विनाकारण ताण वाढतो.
आजच्या वातावरणात नकारात्मक विचार जास्त प्रमाणात मनात येतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. 
तात्पुरता विचार झटकला जातो, थोडावेळ चांगला जातो आणि पुन्हा कशावरून तरी त्याच विचारांची साखळी मनात पुढे सुरू होते. दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी वापरण्याचा खूप वेळ याच विचारात जातो. 
परिणाम? 
असुरक्षितता,भीती,मूड नसणे, दडपण.
दिवसातला किती वेळ?
शरीराने काम करत असते मन चोवीस तास यात अडकू शकते. 
एक मिनिट थांबा..
जरा स्वतःला तपासा.
आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या सगळ्या
वाईट घटना आठवा. 
अगदी जाणीवपूर्वक आठवा. 
यात अपयश असेल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल,प्रेमभंग असेल,नोकरी जाणे असेल,अपघात असेल..

प्रत्यक्ष प्रसंग घडत असतांना असलेली आपली मनस्थिती, वागणे आठवा.

लक्षात येईल की त्यातल्या बहुतेक वेळा आपण अत्यंत धीराने आणि संयमाने वागलेलो आहोत. वेळेवर अगदी योग्य निर्णय घेतलेले आहेत. कितीही वाईट वाटलं,दुःख झालं तरीही त्यावर मात केलेली आहे. 
काही काळानंतर त्यातूनही बाहेर पडलोय ते काहीतरी शिकूनच.
हे अगदी खरंय की कोणावरच वाईट वेळ येऊ नये पण आली तर?
आजही बघा ना जरा आजूबाजूला..
प्रत्यक्षात वाईट अनुभवातून जाणाऱ्या, झगडणाऱ्या लोकांकडे बघा.
कदाचित तुमच्या जवळचं कोणी त्यात असेल.
आत्ता या क्षणी त्यांच्या आणि तुमच्या मनात फक्त आणि फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं याचाच विचार नाही?
शारीरिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी मनाची सगळी शक्ती एकवटलेली नाही?
आपण आपले अगदी 100 टक्के देतोय.

हा आपल्यापैकी बहुतेकांचा अनुभव आहे की प्रत्यक्षात ज्यावेळी आपण संकटात सापडतो त्यावेळी बाकीचं सगळं विसरून सर्वशक्तीनिशी आपण त्यावर मात करतोच करतो.
हातपाय गाळून बसत नाही आणि त्यापासून पळूनही जात नाही.
स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा.
त्याच्यात परिस्थितीवर मात करण्याच्या सगळ्या क्षमता आहेत. 
माणूस तेव्हाच विचारांनी,भावनांनी मजबूत होतो ज्यावेळी तो जास्तीतजास्त कठीण काळावर,दुःखावर मात करतो. त्यातून बाहेर पडतो.
आपल्या प्रत्येकाने आयुष्यात संकटांचा अनुभव घेतलेला आहे.
मग जर सामना करण्याची शक्ती आपल्यात असेल तर आत्ता नुसत्याच
त्रासदायक विचारांनी ताण का वाढवायचा?
प्रत्यक्षात वेळ आली तर बघू पण आता व्यर्थ चिंतेची भर खरंच नको.
मनाला खात्री देऊया?  
त्याआधी अशी वेळ आपल्या कोणावरच येऊच नये म्हणून आज अधिक जबाबदारीने वागूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 3


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा