बुधवार, २१ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 1



आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा आपण कसा विचार करतोय?
परिस्थिती गंभीर आहेच.
तुमच्या मनात त्याबद्दल काय विचार आहेत?
परिस्थिती चांगली नाही याची जाणीव आहे म्हणून मी आधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेईन आणि मग माझ्या कुटुंबियांची,जवळच्या नातेवाईकांची,मित्रमंडळींची आणि नंतर आपले मदतीचे हे वर्तुळ कितीही वाढू शकेल.
हा झाला एक दृष्टिकोन

आणि दिवसेंदिवस सगळं मोठं कठीण होत चाललंय,सगळंच out of control जातंय, काहीच समजेनासं झालंय, सरकार,डॉक्टर,लोकं कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाहीये,खऱ्या केसेस किती आणि काय कसं कळणार? हे सगळं कारस्थान आहे, यात नक्कीच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. हॉस्पिटल मध्ये गेलेले चांगले चांगले लोकं मरतायेत.. काही खरं नाही. नकोसं झालंय सगळं..
हा झाला दुसरा दृष्टिकोन.

पहिल्या दृष्टिकोनात परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं आहे तरीही मनात आशा आहे. 
भीती असली तरी मार्ग निघेल याची खात्री आहे.
काळजी घेणे आहे पण अतिरेकी चिंता नाही.
लोकांच्या मृत्यूच्या बातम्या समजल्याने येणारी अस्वस्थता आहे पण या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत याची जाणीव आहे. 
स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करता येईल याचे पर्याय शोधण्याची इच्छा आहे.
म्हणून अशा लोकांना या परिस्थितीत सुद्धा मार्ग दिसतात. आपल्या आजूबाजूच्या वाईट घटनांमध्ये यांना चांगलं काहीतरी उठून दिसतं. अगदीच काही नाही तरी स्वतःपुरते योग्य पर्याय आपोआप मनात पहिल्यांदा येतात जसे
माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने मी आणि इतर सुरक्षित राहणार यातली जबाबदारी समजलेले लोक उगीचच घराबाहेर पडणार नाहीत. योग्य पद्धतीने मास्क वापरतील, उगीचच येताजाता परिस्थिती किती वाईट आहे या चर्चेत स्वतःची भर घालणार नाहीत. आपल्याकडून होणारी योग्य मदत करण्यासाठी तत्पर असतील.
या घरातल्या सगळ्यांच्या विशेषतः मुलांच्या  मनावर तुलनेने कमी ताण असेल.
एकत्र मिळालेल्या वेळात अभ्यास,काम,करमणूक यांचं नियोजन रोजच्या रोज केलं जाईल.
काळजी घेऊनही संकट आलंच तर त्यावर योग्य ती कृती करण्याचे भान जागृत असेल.

दुसऱ्या दृष्टिकोनाच्या लोकांना वाईट बातम्या अजून जास्त घाबरवतील,स्वतःला किंवा जवळच्या लोकांना नक्की काहीतरी होईल या भीतीचे दडपण मनावर असेल. कुठेही काहीही खुट्ट वाजलेलं यांना आधी समजेल कारण बातम्या आणि चर्चा ऐकल्या तरच आपल्याला सावध राहता येईल असे त्यांना वाटेल. कोणतंही काम करतांना आधी मनात येणारा विचार हा असेल. इंजेक्शन ची कमी,ऑक्सिजन नाही,हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशावेळी मला काही होऊ नये म्हणून दिवसरात्र दडपण मनावर असेल. काढे,वाफ आणि जिथून कोठून माहिती मिळेल ते सगळे उपाय न चुकता पार पाडले जात असतील आणि अतिकाळजी घेऊनही चुकून काही झालं तर अनेकांना फोनाफोनी करतील,ओळखीचे डॉक्टर्सना शक्यतो admit करण्यासाठी गळ घालतील आणि घरीच राहून बरा होईल असं सांगितलं तरी यांचा जीव थाऱ्यावर नसेल. तर काही आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही होऊ नये म्हणून नेमक्या वेळेवर योग्य उपाययोजना करायचं टाळतील.

आपली मानसिकता कोणत्या प्रकारात मोडते?
आत्ताच्या काळात कोणत्या दृष्टीकोनाची मदत होणार आहे हे बघितले तर त्यादृष्टिने मदत होण्यासाठी अजून काय काय करता येईल?
मार्ग काढूया
सोबत राहूया..
© डॉ अंजली औटी.

# मानसआरोग्य डायरी 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा