सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

हे जीवन सुंदर आहे!




परवा एका आईने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली. माध्यमांमधून अनेकदा अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. असं कसं वागू शकतं कोणी? इतक्या टोकाचा निर्णय? थोड्याफार चर्चा,तर्क-वितर्क होतात आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी त्रास असणार किंवा डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला असणार,असा विचार करून यामुळे आलेली मानसिक अस्वस्थता आपण काहीवेळातच झटकून टाकतो. नकारात्मक गोष्टींचा विचार फारवेळ करायचा नसतो,हे खरे पण जेव्हा आपल्या माहितीतले कोणी आत्महत्येचे पाऊल उचलते तेव्हा त्यातल्या भयानकपणा लख्ख जाणवतो. या व्यक्ती भेटणाऱ्या, ओळखीच्या,आजूबाजूला वावरणाऱ्या असल्या तरी त्यांच्या कोणत्याच वागण्यावरून आपल्याला त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा आधी पत्ता लागलेला नसतो. आत्महत्या करणारी व्यक्ती तर जगातून निघून जाते पण तिच्या जवळच्या लोकांना त्यानंतर अनेक दिवस,वर्ष मानसिक दडपणाखाली काढावी लागतात. कदाचित त्यानंतर आयुष्यभर ‘आपण समजून घ्यायला नेमके कुठे कमी पडलो’हा सल टोचत राहतो.
भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे कारण स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाणही अधिक आहे, मग स्त्री शहरातली असो वा खेड्यातली.  ग्रामीण स्त्रियांसाठी जगण्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अजूनही खूप मोठा आहे,त्यातुलनेत शहरी स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत तरीही केवळ ‘स्त्री’ म्हणून असलेल्या तिच्या समस्या ग्रामीण स्त्रीपेक्षा काही फार वेगळ्या नाहीत. म्हणून लौकिकअर्थाने शिक्षण,नोकरी,पैसे,यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या स्त्रियाही अचानक स्वतःचे आयुष्य अवेळी संपवतात त्यावेळी ती घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित रहात नाही तर त्यामुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघते.
स्त्रिया इतक्या हतबल,निराश आणि टोकाच्या निर्णयापर्यंत का जात असाव्यात? याचे कारण शोधत गेलो तर कितीतरी स्त्रियांच्याबाबतीत पारंपारिक पुरुषी वर्चस्वाच्या अन्यायाची कारणे आजही समोर येतात. सामाजिक परिस्थिती काही सगळ्यांसाठीच बदललेली नाही,घरांमधून मुलींनी शक्यतो सामंजस्य दाखवावे,तडजोड करावी म्हणून दबाव असतो. ‘कोणताही अन्याय कधीच सहन करायचा नाही’ याचेही काहींकडून इतके टोक गाठले जाते की मुली दुराग्रही,हट्टी आणि आक्रमक वागून आपल्याच पायावर धोंडा पडून घेतात.
घरी,दारी नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांची अडवणूक होते. जवळच्या नात्यांमधला विसंवाद,फसवणूक अशा सतत कसल्यातरी तणावाखाली आयुष्य जगल्यामुळे नैराश्य लवकर येते. काहींचा स्वभावच त्यांचा शत्रू होऊन जातो. अनेकींना छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून बसण्याची, घडलेल्या अप्रिय घटनांची वर्षानुवर्ष उजळणी करण्याची सवय असते. अपयश,नकार,अपमान,प्रेमभंग,मानहानी या गोष्टी वारंवार मनात चघळल्या जातात. व्यक्ती,परिस्थितीबद्दलचा राग,हतबलता,नाराजी अनेक वर्ष मनात सांभाळली जाऊन प्रसंगाप्रसंगाने उगाळली जाते. तुलना,स्पर्धा यांनी मन सतत अस्थीर असते. मोठ्यांनी लहानांना काहीही म्हटले तर चालते पण लहानांना जर मोठ्यांचा राग आला तर काय करायचे, याबद्दल कोणी मार्गदर्शन करत नाही. मुळात लहानपणापासून एखाद्या न आवडणाऱ्या प्रसंगी भावना कशा हाताळायच्या,विचार कसा करायला हवा, हे न शिकवता कायम फक्त ‘कसे वागले पाहिजे’ ‘कसे बोलले पाहिजे’ हेच मुलांना शिकवले जाते. म्हणून मनात अनेक गोष्टी अनैसर्गिकपणे साचत जातात. लोक आतल्याआत कुढत  राहतात. जगाच्या मागे राहतात. आत्मविश्वास गमावतात. वेगवेगळ्या आव्हानात्मक परिस्थितीपुढे बऱ्याचशा स्वतःच्या आणि काही इतरांच्याही स्वभावमर्यादेमुळे निराश होत जातात.
जसे शरीराला ताप येणं हा आजार नाही तर केवळ एक लक्षण आहे तसं नैराश्य हा
देखील आजार नाही तर अनेक मानसिक आजारांचे ते केवळ एक लक्षण आहे. म्हणून सतत नाराज, निराश असलेली आपली किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची मनस्थिती दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आपण प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी नैराश्य अनुभवतो. त्यावर आपापल्या पद्धतीने मात करण्याचे उपायसुद्धा शोधतो. पण सगळ्यांनाच त्यातून लवकर बाहेर पडता येत नाही.  
निराश मनस्थितीचा कालावधी आणि तीव्रता इतर अनेक मानसिक आजारांसाठी आमंत्रण ठरते.
कोणी आपल्या मनासारखे वागले नाही तर राग येतो किंवा वाईट वाटते, कारण आपण तसा विचार करण्याची सवय लावून घेतली आहे. सगळे आपल्या मनासारखे झाले पाहिजे याचा आग्रह, अट्टाहास,हट्ट आणि मागण्या,आक्रमकता आणि इच्छा पूर्ण झाली नाही की निराशा या पायऱ्या माणूस कधी चढतो समजत नाही. मग नेहमी सगळे माझ्याशी असे वागतात, कोणालाच माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, मी नकोसा/नकोशी झालेय सगळ्यांना, सगळे स्वार्थी आहेत, जग स्वार्थी आहे,जगण्यातच काही अर्थ नाही, इथपर्यंत विचारांची गाडी पोहोचते.
विचारांच्या गाडीला
प्रयत्नपूर्वक ब्रेक लावायचा असतो हे लक्षात येत नाही. मग घडणाऱ्या लहानसहान घटनाही मनाला त्रास देतात. मनाची जखम वारंवार चिघळते. ती बरी करणे इतर कोणाच्या नाही,तर आपल्याच हातात आहे हे समजून न घेता इतरांना दोष दिला जातो. मन वाहवत जाते. बुद्धी,तर्क काम करत नाही. मनात द्विधा नाट्य रंगते.
सगळं जग आपल्याविरुद्ध गेलेय,आपल्याला कोणीही नाही, आपण एकटे आहोत या कोशात माणूस स्वतःला गुरफटून घेतो. वरवर दैनंदिन कामे यं
त्रासारखी पार पडली जातात. आजूबाजूचे लोक चार-सहा दिवस सहानुभूती दाखवतात,विचारपूस करतात पण ते यांना अपेक्षित असल्याप्रमाणे नसल्याने ही लोकं मनाची दारे घट्ट बंद करून आतल्या आत घूसमटत राहतात. आनंदाचे,उत्साहाचे रंग अनुभवणं थांबवून टाकतात. नात्यांच्या भावनिक चढउतारात स्वतःचं जगणं विसरून जातात.  
आपल्याच विचारांच्या तुरुंगात कैद होतात आणि अक्षरशः सश्रम
भावनिक कारावास भोगतात. आत्महत्येशिवाय परिस्थितीतून सुटका होण्याचा दुसरा कोणताही मार्ग आपल्यासाठी आता उरलेला  नाही याची खात्री होण्यामागे अनेक दिवसांचे विचारांचे, वृत्तींचे, पूर्वग्रहांचे, आणि अनुभवांचे साचलेपण असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त एकट्या पडतात म्हणून आत्महत्या करण्याचे त्यांचे प्रमाण जास्त आहे.
                           


आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अशा मनस्थितीबद्दल वेळीच सावध होणे शक्य आहे का? तर शक्य आहे कारण अशा व्यक्ती काही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून किंवा गप्प बसण्यातूनही त्यांच्या मनस्थितीची पूर्वसूचना देत असतात. आपल्या मरणाचा विचार कोणत्यातरी स्वरुपात व्यक्त करतात, हे वारंवार दिसून आलंय. ते वेळ गेल्यावर समजून घेण्यापेक्षा वेळेत समजणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात नुकसानकारक निर्णय घेतलेले प्रसंग त्यांनी आपल्या याआधीच्या आयुष्यात घेतलेले असतात. त्यासाठी गरज आहे, थोडे डोळे,पुष्कळ कान आणि किंचित मन उघडे ठेवण्याची. या लोकांनी आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये,असं कुंपण बनवण्याआधी सावध होण्याची गरज आहे. आपल्याही मनात कुठेतरी खोलवर असे द्वंद्व नाही ना, हे तपासून घेण्याची आणि त्याचा वेळीच योग्य निचरा होण्याची गरज आहे. हो,कारण याबाबतीत आधी मदत स्वतःची आणि मगच दुसऱ्यांची. प्रत्येकाला डोळसपणे आपल्या स्वतःकडे बघणं जमलं की स्वभावातले नुकसान करणारे टोकदार भाग ओळखता येतात. मनातले विचार कोणत्या भावनांच्या प्रभावाखाली आहेत हे समजून घेणं शक्य होतं. त्या हितकारक आहेत की अहितकारक हे नीट कळते.  
आपलं आयुष्य निर्माण करण्यात आपल्या स्वतःचं कर्तुत्त्व काहीच नसेल तर मग ते संपवण्याचा अधिकारही आपला नाही. भावनेच्या भरात कोणाही व्यक्तीला आपल्यापुढचा प्रश्न अवघड वाटतो, त्या भावना ओळखण्याचा आणि हाताळण्याचा संयम,सहनशीलता अंगात असेल तर कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडण्याची वाट सापडू शकते. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीच्या मनातला भावनांचा गोंधळ शांत करायचा असेल तर त्यांच्या मनामधल्या विचारांचे स्वरूप ओळखता यायला हवे, भावना समजून घेता यायला हव्यात. यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींची,नातेवाईकांची आणि तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे यात कोणताही कमीपणा नाही. योग्यवेळी मागितलेली आणि केलेली मदत एक अनमोल आयुष्य अवेळी संपवण्यापासून वाचवू शकते.
आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे बघितले की सहज लक्षात येईल,अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. पावलोपावली होणाऱ्या अपेक्षाभंगातून समाधानाचे चार क्षण मिळवत असतात. कोणतीही गोष्ट संपवायला एक क्षणही पुरेसा आहे त्यासाठी हिंमत लागत नाही ती लागते टिकवायला, सांभाळायला,जपायला आणि वाढवायला. आणि ती हिंमत जगण्याचे बोट सोडणाऱ्याकडे कधीच नसते. ती असते मदत मागणाऱ्याकडे आणि देणाऱ्याकडेही. त्या मदतीच्या एका क्षणात अनिश्चिततेच्या वादळात फडफडणारी एखाद्या आयुष्याची क्षीण ज्योत सांभाळून ठेवण्याचे बळ नक्की असते. अशी ज्योत जपणारे बळकट मन आणि सहृदय हात होऊया!  
© डॉ अंजली अनन्या  
फोटो सौजन्य गुगल