सोमवार, १८ जून, २०१८

हिरा है!...सदा के लिये!


खरंतर तिला लव्हमॅरेज करायचं होतं पण तिला तशी संधीच नाही मिळाली.
आणि शर्वरीचं लग्न ठरलं..मुलगा एकदम तिच्या मनासारखा.
 सगळं मनासारखं जुळून आलं म्हणून मग लगेच साखरपुडा पण झाला दोघांचा.
शर्वरी पुण्यात नोकरी करत होती आणि अभिजित मुंबईत.
दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले एकमेकांशी.
शर्वरी एकदम बडबडी, दिलखुलास..भरभरून बोले. बोलतच राही.
स्वतःबद्दल, मैत्रिणींबद्दल, ऑफिसबद्दल, घरातल्या कितीतरी गोष्टी..तिच्या आवडी-निवडी..बोलायला विषयांची काही कमी नाही..अगदी संपूर्ण तपशील सांगे,जराही काही सुटणार नाही वर्णनातून.
शनिवारी, रविवारी प्रत्यक्ष भेटल्यावरदेखील तेच.
अभिजित एकदम शांत, काहीसा अबोलच होता स्वभावाने..तो सावकाश बोले..पण ते ऐकायला तिला धीर उरत नसे..
मग त्याचं बोलणं अर्धवट तोडून ती बोलत राही शिवाय त्याचं बोलणं फार काही महत्वाचं वाटत नसे तिला..त्याला आणखी काही बोलण्याचा अवधी देतच नसे ती....
अभिजित ने एक दोनदा विषय बदलण्याचा, तिला थांबवण्याचा प्रयत्न करून बघितला..पण तिचा उत्साहच इतका असे की त्या भरात तिला तो नेमके काय म्हणाला हे पण समजत नसे.
साखरपुडा होऊन दोन महिने झाले आणि लग्नाला अजून काही महिने होते.
आणि एक दिवस अभिजितच्या बाबांनी शर्वरीच्या बाबांना फोन करून सांगितले की “काही कारणाने आपण या लग्नाबाबतीत  पुढे जाऊ शकत नाही..अभिजीतची तशी इच्छा आहे.”
दोन्ही घरातल्या लोकांना या निर्णयाचा धक्काच बसला. सगळ्यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने शांतपणे सांगितले..”शर्वरी वाईट नाही..एक अत्यंत चांगली मुलगी आहे पण आमच्या दोघांचे स्वभाव अत्यंत वेगवेगळे आहेत. एकमेकांपासून अगदीच भिन्न..आणि इतक्या अखंड बोलणाऱ्या बायकोबरोबर मी आयुष्यभर  राहू शकणार नाही..मला माझी मर्यादा माहीत आहे. तुम्ही साखरपुड्याला घाई केली.. आता  तरी माझं ऐका..आम्ही लग्न करून एकमेकांसोबत सुखी होणार नाही”
अत्यंत सभ्यपणे आणि संयमाने त्याने झालेल्या मनस्तापाबद्दल सगळ्यांची माफी मागितली.
एकदा त्याच्या मनात असे आल्यावर मग आता काही कारणाने त्याला लग्न करायला भाग पाडले तर दोघेही सुखी राहू शकणार नाही, हे सगळ्यांच्या लक्षात आले.
माझ्यासारख्या मुलीला एखादा मुलगा ‘नाही’म्हणू शकतो, हा शर्वरीसाठी मात्र मोठा धक्का होता..
दिसायला सुंदर, इतकी चांगली नोकरी, चांगला स्वभाव...आणि मला नाही म्हणाला? हिम्मतच कशी त्याची?
संतापाला सीमा राहिली नाही तिच्या, एकदम अपमान वाटला तिला तिचा हा.
काही दिवस या संतापात गेले. घरातल्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी तो विषय एकदम बंद करून टाकला.
एक दिवस दुसऱ्याच कशावरून तरी आई तिला म्हणाली की “नेहमी तुझंच ऐकायचं इतरांनी ..दुसऱ्याचं पण काही म्हणणं आहे याचा नको विचार करायला?”
या वाक्याने शर्वरीचा बांध फुटला.. खूप रडली..
या मधल्या काळात ती पूर्णपणे बदलून गेली होती. उत्साहाचा धबधबा असलेली आणि अखंड बडबड करणारी शर्वरी एकदम  शांत होऊन गेली.
मनाच्या या शांत अवस्थेत तिला विचार करायला वेळ मिळाला,आपल्या वागण्याचा.स्वभावातल्या कमतरता समजल्या.
तिच्या स्वभावात आणखी पण एक भाग होता, संकटकाळात टिकून राहण्याची जिद्द.
आपल्यात असलेल्या थोड्या बेपर्वा, अहंकारी वृत्तीची देखील ओळख तिला झाली.
या सगळ्या प्रसंगात आपण स्वतःशी काय बोलतो आहोत (self talk) हे तिने नीट तपासले, आलेला ताण तिला न्यूनगंडाकडे घेऊन चालला आहे हे तिच्या लक्षात आले.
घडलेली घटना फक्त एक घटना आहे आपले संपूर्ण आयुष्य नाही हे समजून घेऊन शर्वरी हळूहळू सावरली.
आता तिच्या स्वभावात दुसऱ्याचे म्हणणे पण ऐकून घेण्याचा संयम आला.
बोलण्या इतकेच दुसऱ्याचे ऐकून घेणे पण महत्वाचे असते, हे समजले.
अति उत्साहाला आवर घालणे जमले. एक शहाणी समजूत अंगात आली.
एखादी घटना घडते त्यावेळी आपल्याला ती कितीही वाईट वाटली तरी थोडे मनाने स्थिरावल्यावर घडलेल्या घटनेच्या काही वेगळ्या बाजूदेखील आपल्या लक्षात येतात. आपल्यासाठी योग्य असे त्यातून नक्की शोधता येते.
आयुष्यात सगळेच आपल्या मनासारखे घडत नाही, हे एक मोठे सत्य शर्वरीला उघड्या डोळ्यांनी आणि मनाने स्वीकारावे लागले.
आपल्या आयुष्यात वाईट घडले तर माणूस सगळ्यात आधी दुसऱ्याला दोष देतो, मग परिस्थितीला दोष देतो, मग नशिबाला आणि सगळ्यात शेवटी स्वतःला दोष देतो..
असे काहीही करण्याची गरज नसते.
माणसाचे मन सुदृढ आणि निरोगी असेल तर ते काही काळाने आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवांचा पुन्हा विचार करून त्यातून योग्य ते शिकते आणि मार्ग काढते,इतके ते लवचिक असते.
आपल्या भूमिका आणि दृष्टीकोन ही नाण्याची फक्त एक बाजू असते.

                     
                          


आनंदी,उत्साही असणे हा शर्वरीचा मूळ स्वभाव, असा स्वभाव असणे मुळीच वाईट नव्हते पण त्यापायी दुसऱ्याचे व्यक्तिमत्व पार झाकोळून टाकता सुद्धा कामा नये..
कोणत्याही जवळच्या नात्यात दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव जसा आहे तसा स्वीकारता येणे पण गरजेचे असते, हे जगण्याचे मर्म या घटनेतून शिकून शर्वरीने पुन्हा नव्याने सुरवात करायचे ठरवले.
आज शर्वरीला वाटतेय..की जे झाले ते किती चांगले झाले!!..हिरा तर मी होतेच पण या प्रसंगामुळे आजवर मलाच अनोळखी असलेले माझे वेगवेगळे पैलू मला समजले !
आणि या सगळ्याचे श्रेय खरेतर अभिजीतलाच द्यायला हवेत!..नाहीतर माझ्यातल्या या शर्वरीची ओळख मला आयुष्यभर झाली नसती कदाचित.
मग शर्वरीने अभिजीतला मेसेज लिहिला...”जे घडलं त्यात आपल्या दोघांची चूक अशी काहीही नाही. मला समजलं, माझ्याकडे सगळं काही असलं तरी नेमकं तुला जे हवं आहे ते माझ्याकडे त्या वेळी नव्हतं..पण त्यामुळे मला मात्र खूप काही शिकायला मिळालं..मनापासून थॅक्स अभिजित! भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!!”
हिरा आता संपूर्ण तेजाने आणि सगळ्या पैलूंनी लखलखत होता!!!   
© डॉ. अंजली/अनन्या.
आरसा
mindmatteraa@gmail.com

(फोटो सौजन्य गूगल)




गुरुवार, १४ जून, २०१८

भिंगाचे बिंग!


                                                           भिंगाचे बिंग!

मुग्धा कंटाळली होती.आयुष्यालाच..तिला वाटे काहीच कसे माझ्या मनाप्रमाणे होत नाही?
असे काय घडले होते की तिने संपूर्ण आयुष्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे?
तसं बघायला गेलं तर तिचं आयुष्य इतर चारचौघीं सारखंच होतं.
चौकोनी,सुरक्षित कुटुंबाची चौकट भोवती. चांगल्या पगाराची नोकरी हातात. तब्येतपण ठणठणीत..
मग कंटाळा येण्यासारखे काय होते? तर तिच्या जवळच्या लोकांच्या मते तिला 'सुख' दुखत होते!!
ती समाधानी नव्हती. दिसायला गोड चेहऱ्यावर सदा सर्वकाळ चिंता वसत असे..आणि ती नेमकी कशाबद्दल तर तिच्याकडे त्यासाठी एक नाही तर दहा कारणे असत.
'
आज दिवसभर लाईट गेले' ही गोष्ट तिच्यासाठी जणू आता तिला महिनाभर बिना लाईटचे काढावे लागणार आहेत की काय ..इतकी मोठी असे!
तिच्याशी संबंधित असलेल्या मोजक्या व्यक्ती सोडल्या तर तिचे कोणाशीही जमत नसे. सगळे लोकं अत्यंत स्वार्थी असतात आणि आपले काम संपले की पुन्हा आपल्याकडे ढुंकूनदेखील बघत नाहीत याबद्दल तिला इतकी खात्री होती की ती लोकांशी वागतांना सतत सावध असे. नाहीतर पावलोपावली आपल्याला कोणी फसवेल आणि आपले प्रचंड नुकसान होईल,असे वाटे तिला.
लोकं किती फालतू गप्पा मारत,बारीकसारीक जोक ऐकवत हसू शकतात याचं वैषम्य वाटे तिला.
एखादा जोक झाला तर यात काय हसायचं? असं वाटून तिच्या चेहऱ्यावरची रेष पण बदलत नसे.
अशी सदासर्वकाळ 'याक्कू क्रूरसिंग' अंगात घुसलेली व्यक्ती आपल्या सहवासात कोणाला आवडेल?
मग बहुतेक वेळा लोक तिला टाळत.कोणालाच तिचा सहवास मनापासून आवडत नसे.घरातल्या लोकांचा तर नाईलाज असे..
आणि एखाद्याला सतत समजून सांगायला मर्यादा असते..त्यापेक्षा समोरची व्यक्ती बदलत नाही असे लक्षात आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करणे हा सगळ्यांचाच त्रास कमी करणारा पर्याय अशावेळी शक्यतो इतरांकडून निवडला जातो.
आपल्याच वागण्याने मुग्धा आयुष्यात एकटी पडली होती.
नकार, नकोसेपण, नाखुषी आणि नाराजी अशी '' ची नकारघंटा तिचं आणि घरातल्या इतरांचेही आयुष्य नकारात्मक बनवत होती.
कोणताही मोठा शारीरिक आणि मानसिक आजार नसतांना तिच्या शरीराचे आणि मनाचे स्वास्थ पार बिघडले होते.
तिच्याशी बोलतांना सगळ्यात प्रथम जाणवले ते हे की मुग्धा आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या वागण्याकडे 'Magnifying Len's' मधून बघत होती.
त्यामुळे साधे असणारे प्रसंग तिला कितीतरी पट मोठे 'दिसत' होते.
आपल्याला गाडीच्या बाजूला असलेल्या आरशात मागची गाडी जशी आपल्याला खूप जवळ दिसते..तसे!
त्यामुळे घडणाऱ्या प्रसंगांना आणि त्यातल्या व्यक्तींसाठी ती वापरत असलेले शब्द देखील 'प्रचंड त्रास' 'सहन करणे अशक्य' 'खूप खूप मनस्ताप,' 'दडपण वाढले' 'जगापासून दूर जायला पाहिजे' असे होते!
एखादी मुंगी जरी आपण जाड भिंगातून बघितली तर ती मुंगळ्या एवढी मोठी दिसणार आहेच.
'
मला त्रास होतो' आणि 'मलाप्रचंडत्रास होतो आहे' या दोन वाक्यांमध्ये फक्त 'तीव्रतेचा'फरक नाही तीव्रता 'जाणवण्याचा' मोठा फरक आहे!   
                                



आयुष्यात कधीतरी आपल्याला आवडणार नाही असे प्रसंग घडतात. त्यांचा त्रास देखील होतो. 'मला कुठल्याही गोष्टीचा त्रासच होऊ नये' हेदेखील वास्तवाला धरून नाही.
एखादा त्रास हा फक्त 'त्रास' असतो..तो 'थोडा', 'प्रचंड', 'सह्य', 'असह्य', 'अशक्य', 'शक्य' 'सहनशक्तीच्या बाहेर', 'सहन करण्याजोगा'....हे सगळे त्या परिस्थितीवर नाही,तर परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते.
आपण आपल्याला जाणवणाऱ्या भावना कोणत्या शब्दात स्वतःशी बोलतो किंवा इतरांजवळ व्यक्त करतो..तुम्ही देखील विचार करून बघा. 😊
म्हणून काही व्यक्ती कितीही मोठ्या संकटाला हसतखेळत सामोऱ्या जातांना आपण बघतो आणि काही व्यक्ती थोड्या त्रासाला देखील सगळं गाव गोळा करतांना बघतो.
आपल्या कितीही प्रेमाची आणि जवळची व्यक्ती असेल तर तिलाही तिच्या वागण्याकडे असे सतत भिंगातून बघितलेले आणि टीका करत बोललेले आवडणार नाही.
लहान मुलांनादेखील कायम अक्कल शिकवलेले आवडत नाही. ते लगेच उलटं बोलून दाखवतात, हा अनुभव नवीन नाही.
मुग्धाला आलेल्या काही अनुभवांवरून तिने 'सगळेलोक सारखेच..आणिस्वार्थी' असतात हा काढलेला निष्कर्ष केवळ आततायी आहे आणि जवळच्या लोकांवर अन्याय करणारा देखील.
असं दार घट्ट बंद करून घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणं माणसाला एकटेपणाकडे घेऊन जातं.
आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाची आणि मनोवृत्तीची माणसे असतात. सगळ्यांचेच स्वभाव आणि व्यक्तिमत्व आपल्याला आवडेल असे नसते..
काही व्यक्तीस्वार्थीवागतील तर काहीमदतदेखील करतील. या मदत करणाऱ्या व्यक्तींना मात्र हक्काने गृहीत धरायचं आणि एखादा आपल्याशी स्वार्थीपणे वागला तर त्या अनुभवावरून सगळ्या जगाला नावं ठेवायची ..हे गुलाबाच्या फुलाकडे लक्ष जाण्याआधी, त्याचा वास,रंग बघण्याआधी केवळ त्याला किती काटे आहेत याकडे लक्ष जाणं आहे!
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात रोज एक गोष्ट नव्याने घडते.
प्रत्येकासाठी रोजचा नवा दिवस एक सुंदर गिफ्ट बनून येतो..कोणालाही माहीत नसते त्यातले क्षण कसे उलगडणार आहेत..त्यात आपल्यासाठी काय कायखजिनाआहे!
रोज रात्री झोपतो त्यावेळी आपण स्वतःला संपूर्ण विसरून गेलेलो असतो..आपल्या भूमिका, नाती, इतकेच काय आपले नाव आणि अस्तित्व देखील जाणवत नाही आपल्याला. ‘गाढ झोपहे खरोखर एक वरदान आहे आपल्यासाठी.
आणि आपण असे करंटे की रोज भूतकाळातले भावनिक ओझे हट्टाने मनावर घेऊन नव्या दिवसाचे स्वागत करतो.
मुग्धा हेच तर करत होती..संपूर्ण काळ्या जाड भिंगाच्या चष्म्यातून जगाकडे बघत होती म्हणून या चष्म्यातून तिला येणारा नवीन रंगीत दिसतच नव्हता..त्यातला काळा रंग फक्त उठून दिसे.
शिवाय ती तो चष्मा हट्टाने आणि दुराग्रहाने आपल्या जवळ घट्ट बाळगून होती..त्या तुरुंगात तिने स्वतःला अडकवून घेतले होते आणि मग कंटाळा आला तरी तोच नैसर्गिक आहे असे समजून ती तेचते आयुष्य जगत होती.
महाभारतातल्या कर्णाने देखील आपली कवच कुंडलं क्षणार्धात दान केली पण मुग्धाला या आपल्या कवच कुंडलांपासून मुक्त होण्यासाठी फार प्रयास लागले.
पण ज्या क्षणी तिने ते खरोखर बाजूला केले त्या क्षणी तिला आपल्या आजूबाजूचे हेच जग आणि स्वतःचे आयुष्यदेखील किती रंगीबेरंगी आहे हे तिला समजले.
तिच्या कपाळावर मुक्काम ठोकून असलेली आठी पहिल्यांदाच स्वच्छ मोकळी झालेली सगळ्यांना जाणवली..
किती छोटीशी गोष्ट असते आणि त्यात आपण आपल्या आयुष्याचे किती दिवस वाया घालवतो..असे आता तिला वाटते..
कारावासातून मुग्धा तर मुक्त झाली...
आपले काय?
जरूर विचार करा..
आणि भिंगाचा जाड काळा चष्मा आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांवर कधीतरी लावला जात असेल तर तो बाजूला करून स्वच्छ, उघड्या जाणिवेने अनुभवांना सामोरे जा!
आयुष्य,आपलं जगणं खरंच खूप सुंदर आहे!!
©
डॉ. अंजली/अनन्या.
#
आरसा
mindmatteraa@gmail.com
(
फोटो सौजन्य: गूगल)