शनिवार, १ मे, २०२१

आभासी दुनियेतल्या वास्तव भावना



आभासी दुनियेतल्या वास्तव भावना

फेसबुकवर तावातावाने एकमेकींशी भांडणाऱ्या त्या दोन स्त्रियांच्या भांडणात हळूहळू इतर अनेकांची गर्दी वाढली. काही हिचे समर्थक,काही तिचे. विषय काही फार मोठा नव्हता. कोणीतरी लिहिलेला मूळ लेख तर बाजूलाच राहिला आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये भलत्या दोघींचीच जुंपली. बरं दोघीही आपापल्या क्षेत्रातल्या चांगल्या हुशार बायका. कोणीतरी मध्यस्थी करून शेवटी तो वाद मिटवला पण त्यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. सतत एकमेकींच्या विचारांवर, मतांवर केलेली कुरघोडी. काहींनी दुर्लक्ष केले,काहींनी मजा घेतली,काहींनी खिल्लीपण उडवली. पण त्या दोघी? त्यांची खुमखुमी कशानेच कमी झाली नाही. आता तर लोकांना सवय झाल्यासारखं झालंय.
हे सगळं आठवायचं कारण परवा एका श्रध्दांजलीच्या कॉमेंटमध्ये वाचलेली एक कॉमेंट.
या बाईंनी म्हणे जी स्त्री गेली तिला काही वर्षांपूर्वी झालेल्या भांडणांमुळे फेसबुकवर ब्लॉक केलं होतं. आज तिला त्याचा पश्चाताप होत होता जो ती जाहीरपणे सांगून स्वतःला तिची अपराधी वगैरे समजत होती. तिला श्रद्धांजली वाहता वाहता आता पब्लिक हिचीही खऱ्या खऱ्या आपुलकीने समजूत काढत होतं.
अंतरजालावरचं हे जग मायावी,भासमान आणि खोटं आहे असं कोणी कितीही म्हणो, इथे वावरणाऱ्या अनेकांच्या मनात दाटून येणाऱ्या वेगवेगळ्या भावनाही आभासी आहेत असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. यात स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी पुरुषही काही मागे नाहीत.
विद्वान आणि शहाणीसुरती लोकं कसं काय गुंततात यात इतकं? आभासी विश्वातला मानसिक ताण असह्य होऊन मदत घ्यावी लागल्याची उदाहरणे अनेक आहेत.
खरे आयुष्य आणि आभासी विश्वातील स्वतःची प्रयत्नांनी उभी केलेली प्रतिमा यांच्यात अनेकांच्या बाबतीत अंतर्विरोध असू शकतो. 
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनातला सतत चाललेला सेल्फटॉक. प्रतिक्रिया कधी उघड तर कधी दडपलेली,दबलेली.

प्रत्यक्ष जगणे जास्त आव्हानांनी भरलेले आहे. त्यासाठी कधी क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यातच दमणूक होते. कुटुंब,नातेवाईक,समाज यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःसाठी काही करायचे राहून जाते.
उत्सुकता आणि विरंगुळा,विसावा म्हणून वापरायला लागलेल्या सोशल मीडियात 'आपण खरेच कसे आहोत' हे इतरांना समजण्याची गरज नसते. आपली मतं आणि आवडीनिवडी सारख्या असलेल्या लोकांशी कुठल्याही मानसिक,भावनिक अपेक्षांशिवाय संवाद साधता येतो याचाच आधी मोठा रिलीफ वाटतो.  
प्रत्यक्ष आयुष्यातल्या व्यक्तींशी समोरासमोर सुसंवाद साधण्यापेक्षा ज्यांना आपण पूर्णपणे माहीत नाही अशा व्यक्तींशी संवाद साधणे आवडायला लागते.
अनेकांना लोकांच्या जजमेंट्सची, त्यांच्या टीकेची भीती मनात असते. त्यामानाने सोशलमीडियात चांगुलपणा टिकवून राहणे आणि वेगवेगळ्या लोकांशी मैत्री करणे सोपे जाते. माहितीही खूप मिळते आणि करमणूकही भरपूर होते.
हळूहळू रोजच्या संबंधांमधून आभासी विश्वातही समविचारी लोकांचे निरनिराळे गट तयार होतात आणि यात एकमेकांना सावरून घेत,मोठे करत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र मजेत वेळ घालवता येतो. असेही कितीतरी गट इथे वावरत असतात. 
नुसतेच 'हे वाईट', 'ते वाईट' म्हणून चालणार नाहीत,नाहीतर कोल्ह्याला द्राक्ष आंबट,असे होते.  
एकटेपणाचा सोबती म्हणून आभासी विश्वातील मित्रमैत्रिणीचा आधार वाटतो, त्यांच्याशी रोज बोलण्याने समाधान मिळते. त्यातल्या मर्यादा माहीत असूनही काहीजण मिळेल त्यात समाधान शोधतात.
खरोखरच विवेकीपणे उपयोग करून घेतला तर ही वेगवेगळी सोशलमाध्यमे जगण्यातल्या आनंदाच्या आणि सुसंवादाच्या असंख्य शक्यता माणसांपुढे उभ्या करण्याची क्षमता बाळगून आहेत.
त्यातून किती घ्यायचे,काय घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे हे प्रत्येकाने आपल्या गरजेच्या सीमारेषा आखून ठरवावे. ही लक्ष्मणरेषा बुद्धीला जरी लवकर समजली तरी अनेकांकडून आखलेली सीमा कधीतरी ओलांडली जाते कारण त्यांनाही पुढे धावणारा मोहक कांचनमृग दिसत असतो.

मग या आभासी जगात जाणवणाऱ्या भावना खऱ्या कशा? 
तर कांचनमृग जरी मायावी असला तरी त्याचा वाटणारा मोह ही भूल खऱ्या मनाला पडलेली असते. 
त्याला मिळवण्यासाठी केलेली धडपड,आगपाखड खरी असते. 
लोकं विशेषतः काही स्त्रिया यात जास्त अडकतात. त्यांचे स्वतःचे जगण्यातले अपुरेपण, येणाऱ्या अनुभवांबद्दल असमाधान,खदखद,दबलेल्या उर्मी त्यांना त्या दिशेने खेचत नेतात. 
तुलनेचा राक्षस मनावर राज्य करत असतोच.
"भला तेरी सारी मेरी सारीसे सफ़ेद कैसे?"याचा भुंगा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  मग कधीतरी अशी वेळ येते की सोशल माध्यमांवरील या सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वॉलकडे पाठ फिरवून एकमेकींनाच ब्लॉक करतात. इतक्यावरच हे थांबत नाही घडलेल्या गोष्टींबद्दलची जखम त्यांच्या मनात सतत ठसठसत राहू शकते.
आभासी विश्वातले पाच "अ"
म्हणजे अवास्तव विचार,अतिरंजित वर्णन, अविवेकी धारणा, अपूर्ण ज्ञान आणि अंतहीन स्पर्धा आपण ओळखू शकलो तर आपल्याला सीमारेषाही ओळखू येईल. त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला हवा आपला दृष्टिकोन. आपले मूळ हेतू विसरले की माणसं असमाधानाच्या चक्रात अडकतात. बरोबरी करायला जातात. माझ्या फोटोवर,लिहिलेल्या मजकूरावर कमी लाईक्स आणि मी मात्र इतर सगळ्यांची दखल घ्यायची? मनात इर्षा,स्पर्धा निर्माण होते. दुर्लक्ष केल्यासारखे दाखवून लपूनछपून पहारा ठेवणे येते, त्यातून टोमणे मारणे होते,कान भरणे, भरवणे होते. रुसवे-फुगवे होतात. आणि इथल्या मैत्रीत कधी भांडणंदेखील होतात. त्यातून ब्लॉक केले जाते. 
समोरच्याला याचा काहीच पत्ताही नसतो. कारण मुळात इतरांचा तुमच्या काहीही वाटण्याशी संबंधच नसतो. 
या दुहेरी जगण्याचा ताण असह्य होऊन लोकं प्रत्यक्ष आयुष्यात बिथरल्यासारखी वागतात. कशातच चित्त न लागणं,वारंवार मोबाईल तपासून बघणं, उगीचच दडपण जाणवणं, काय खातो-पितो,करतोय याकडे लक्ष नसणं असे त्रास झाले की संपूर्ण घर अस्वस्थ होऊन जातं. कोणत्याच जगाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेली लोकं एकटी,एकाकी होऊन जातात,जगण्याचा आनंद गमावून बसतात.
समस्या प्रत्यक्ष आयुष्यातली असो वा आभासी आयुष्यातली त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत आपण स्वतःशी बोलत असलेली वाक्ये तपासून बघायला हवीत. मनातल्या अविवेकी धारणा आणि दृष्टिकोन तपासून बघायला हवेत. 
प्रत्यक्ष आणि आभासी यांचा अनुभव घेणारे मन पुरेसे सजग असेल तर तारतम्य बाळगून स्वतःच्या आनंदासाठी कधी कशाची निवड करण्याची हे आपले आपण ठरवू शकतो.
जगण्यातल्या रिकाम्या जागा नक्कीच भरायला हव्यात पण मायावी मृगजळामागे धावण्यात नाही तर स्वतःसाठी आनंदाच्या दिशांचा शोध घेण्यासाठी.
© डॉ अंजली औटी.
# महाराष्ट्र टाईम्स 'मैफल' पुरवणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा