बुधवार, २८ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 5

अनेक लोकांना ज्यावेळी आपल्या घरात सुरक्षित राहायला मिळतंय त्यावेळी देशभरातील अनेक डॉक्टर्स,सिस्टर्स,इतर मेडिकल स्टाफ,औषध विक्रेते आणि संपूर्ण मेडिकल विश्वाशी निगडित असलेले सगळे लोक गेले वर्षभरापेक्षा जास्त काळापासून किती मानसिक ताणातून जात आहेत आपल्याला कल्पना नाही.
केवळ काही तासांची शारीरिक विश्रांती,अपूर्ण झोप,खाण्याच्या अनियमित वेळा आणि हात,मेंदू यांना अखंड फक्त काम आणि कामच.
हॉस्पिटल्स क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. संपूर्ण यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. 
त्यात ओळखीचे,नातेवाईक,मित्रमंडळी यांचे सतत फोनवर फोन. कोणाला बेड हवाय,कोणाला सल्ला हवाय,कोणाला ऑक्सिजन हवाय,कोणाला vaccine हवीय.
रोज येणारे शंभरच्या वर कॉल्स. प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा,मागणी. 
ती पूर्ण करता आली तर ठीक, नाही आली तर मनाला टोचणी.
कुटुंबातल्या माणसांसाठी वेळ नाही.
त्यांना आपल्यामुळे काही होणार नाही ना याची काळजी सतत मनात. मुलांना कुठे आहे vaccine चं संरक्षण?
घरी ना कोणाशी मनमोकळ्या गप्पा,ना एकत्र जेवण. घरी जायलाच रात्रीचे 11 वाजून जातायेत. 
तोपर्यंत सगळे झोपलेले, कसेबसे दोन घास खाऊन पडत नाही तोवर कोणी सिरीयस झाल्याचा किंवा गेल्याचा फोन. 
डोळ्याला डोळा लागणार कसा? झोप पूर्ण होत नाही,पुरेशी विश्रांती नाही. थोडावेळ स्वतःसाठी हवा आहे पण फोन बंद ठेवता येत नाही.
मनावर सगळ्याचा ताण येतोय.
शेवटी माणसंच आहेत ना ही सगळी मंडळी?
हॉस्पिटलपर्यंत आलेले बरेचसे पेशंट सिरीयस होऊनच आलेले असतात. 
कधीकधी इच्छा असूनही त्यांना आत पण घेता येत नाही. खूप प्रयत्न करून,काळजी घेऊनही डोळ्यादेखत पेशंट जातो आहे, तरुण लोकांनाही वाचवता येत नाहीये. त्यांनी थोडं वेळेत यायला हवं होतं, सगळ्याचा खूप त्रास होतो, दाखवता येत नाही, त्यावेळी कितीही वेळ मारून नेली तरी नातेवाईकांचा आक्रोश बघून त्यांच्या जागी आपल्या माणसांचे चेहेरे दिसायला लागतात.
त्यांनाही हताश,निराश वाटतंय.
आजूबाजूचं मृत्यूचं थैमान बघून प्रश्न पडले आहेत. खरंच कधी थांबणार आहे हे सगळं?
की अजून एखादी लाट येणार आहे?
थांबणार आहे की नाही?
अनिश्चिततेचं भय त्यांनाही वाटतंय. 
पण सांगणार कोणाला?
बोलणार कोणाशी?
माणसांच्या भावभावना आणि मर्यादा त्यांनाही आहेत हे लक्षात आहे ना आपल्या?
त्यांच्यासाठी थाळ्या बडवून त्यांना काहीही मदत होणार नाहीये. 
नुसतीच कोरडी कृतज्ञता पण नको.
त्यांना मदत करण्यासाठी आपण फक्त तीन गोष्टी कटाक्षाने करू शकतो.
सगळ्यात पहिली योग्य पद्धतीने घातलेला मास्क. मास्क वापरण्याच्या लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या लाटेनंतर नावाला मास्क वापरणारे,गळ्यात बांधून फिरणारे,योग्य पद्धतीने मास्क न वापरणारे, मास्कच न वापरणारे लोक आपण बघितले. 
घरात,गाडीत मास्क काढून टाकला की तो कुठे ठेवतोय,त्याला कुठे हात लावतोय मग तेच हात नाकाला,तोंडाला लावतोय या गोष्टीही लोकांकडून नकळतच होतात.
घरातली वयस्कर मंडळी आणि लहान मुलं सगळ्यांची नजर चुकवून मास्क काढतात. 
गाडीत,विमानात अंधार झाला की मास्क काढून बसलेले लोक आहेत.
याचा अर्थ मास्क लावणे का गरजेचे आहे हे अजूनही समजलेलं नाही की आपल्याला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत, हा समज आहे? म्हणजे नेमकं अज्ञान आहे की बेपर्वाई?
Social distancing करणारेही तसेच. पूर्ण काम होइपर्यंत लांबच बसलो होतो. फक्त नंतर एकत्र चहा प्यायला,नाष्टा केला. नाहीतर खूप दिवसांनी भेटलो म्ह्णून मग सेल्फी काढले. 
फक्त तितक्याच वेळ मास्क काढला..
बाकी कधीच काढत नाही,असे म्हणणारे लोक बघितले.
करोनाची लाट वाढण्यासाठी पुन्हापुन्हा येण्यासाठी आपला तर हातभार लागत नाहीये ना?
दुखणे अंगावर काढण्याची आपल्याला जुनी सवय आहे. आपल्याला होणारा त्रास आपोआप काही वेळानंतर कमी होईल असा समज मनात बाळगून खूप लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

करोनाची टेस्ट positive आल्यावर तात्काळ औषधे घेतली तर आजार वाढण्याची शक्यता कमीतकमी आहे. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट vaccination बद्दल.
स्वतःला जास्तीतजास्त सुरक्षित करण्याचा तो एकमेव उपाय आहे. त्याने करोना झाला तरी त्याचा होणार त्रास खूप प्रमाणात कमी होतो हे लक्षात आलेले आहे. 
अजूनही काही लोक लस घ्यायला घाबरतात आणि टाळत आहेत. सर्वांनी लस घेतली तर लवकरात लवकर हे सगळं संपू शकेल.

मेडिकलविश्वाबाबतीत काही तक्रारी आणि काही ठिकाणी आर्थिक लुटालूट हे प्रकार खूप वाढले आहेत,हे मान्य. ही सामाजिक कीड या क्षेत्रातही वाढते आहेच.
पण त्या मोजक्या लोकांसाठी प्रामाणिकपणे आणि अथकपणे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना सरसकट संशयाच्या नजरेने जोखणे योग्य नव्हे. 
आज ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत,हे ही सत्य आहे.
आपण आपली जबाबदारी ओळखून वागावे,इतकीच त्यांची इतर समाजाकडून अपेक्षा आहे. 
खरेतर ते त्यांच्यासाठी नाही,आपल्याला आपल्याच भल्याकरता करायचे आहे. 
कृतज्ञतेची ही छोटीशी पावतीच आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा