गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी पान 2


मनाला सतत चांगल्या मोडवर कसं ठेवायचं?
मन आहे..त्यात वाईट विचार येणं natural नाही का? उलट आधी वाईटच विचार येतात. 
सगळ्यात जास्त बिघडवून,लाडावून आपण आपल्या मनाला ठेवतो.
काय हरकत आहे विचारांना थोडी शिस्त लावायला?
आजपर्यंत नाही लावली,ठीक आहे. आज, अगदी आत्तापासून सुरवात करूया.
कसं शिकायचं?...अनुभवांकडून.
वाईट विचार सतत मनात येत असतील तर आपल्याला कसं वाटतं?
मन नाराज असतं,भीती वाटत असते, जीव घाबरा होतो,धडधडायला लागतं, मनात आणखी विचार येतात. काय करावं समजत नाही. आजूबाजूने सतत काहीतरी वाईटच कानावर येतंय,कुठेच आशा दिसत नाहीये..
विचारांचा हा रस्ता आपण पकडला आहे हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी स्वतःला थांबवायचं.
कसं? आपल्याला सवयीचं आहे ते..
प्रत्यक्षात रस्त्यावर चालतांना अचानक खड्डा दिसला तर आपण काय करतो?
आपल्याकडून तो चुकवायचा जास्तीतजास्त प्रयत्न करतोच ना? की मुद्दाम त्यातून जातो?
नाही ना? 
कारण आपण पडतो,लागतं, खरचटतं, खड्ड्यात पाणी असेल तर आपले कपडे खराब होतात, हे अनुभवलेले असते आपण. आपण तर गाडीसुद्धा त्यापासून वाचवतो.
ते शिकण्यासाठी आपल्याला किती अनुभवांची गरज लागते? 
एका अनुभवातून गेलेलं पुरतं, हो ना?
तरीही नकळत किंवा नाईलाजाने अचानक पुन्हा खड्ड्यातून गेलो की आपण काय करतो? 
सावध होतो,नीट चालतो आणि पुढचे अनेक खड्डे चुकवतो.
अगदी तसंच मनाच्या बाबतीत पण सतत येणाऱ्या अनुभवांकडून शिकायचं आहे.
मनात स्वाभाविकपणे वाईट विचार आधी आले तरी त्यात अडकायचं नाही..
सावध व्हायचं..थांबायचं..मागच्या अनुभवात आपल्याला असं करणं जमलं नाही मग त्याचा परिणाम मन उदास,अस्वस्थ होण्यात झाला होता, हे बोलायचं आहे स्वतःशी. 
हे विचारांना शिस्त लावणं आहे, सातत्याने केलं तर जमणार देखील आहे.
आजूबाजूला वाईट गोष्टी घडत आहेत हे खरं आहे. त्या घडण्यात आपण जबाबदार असू नये हे मात्र आपण अगदी कटाक्षाने पाळायचं आहे.
प्रत्येकाने आपलं घर, जवळची माणसं सुरक्षित राहतील हा विचार आधी करायचा आहे.
समाजासाठी आपला खारीचा वाटा तो आहे, असं समजा.
आजपासून प्रयत्न करूया?
विचारांना शिस्त लावूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 2

(Photo: Internet)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा