रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

‘ध’ चा ‘मा’

                      


आपल्या बाह्य व्यक्तिमत्वावर नाही तर आपल्या आंतरिक व्यक्तिमत्वावर अवलंबून असते आपण किती देखणे आहोत. 

रोजच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगात आपण काय विचार करतो, त्यावर कशी प्रतिक्रिया देतो,आपले वागणे स्वतःशी आणि इतरांशीही कसे आहे. 
एखाद्या अचानक ओढवलेल्या प्रसंगात आपण माणूस म्हणून कसे वागून जातो, यातून आपल्या वृत्ती,प्रवृत्ती,स्वभाव आणि संस्कार दिसून येतात. आपल्या विचारांची दिशा समजते.

परिपूर्ण कोणीच नसतो पण किमान माणूसपणाच्या पातळीवर आपला सहवास इतरांसाठी निकोप, निरोगी आणि
आनंददायी असायला काय हरकत आहे?

आपल्या बाह्य दिसण्याची आपण जितकी काळजी घेतो तितकी काळजी मनात वेळोवेळी उमटत असलेल्या विचारांचे प्रतिबिंब, आपल्या वागण्यातून दिसते आहे याची घेतो का?

गौरीचा आदित्य, लहानपणापासून एक अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मुलगा.
अगदी आखीव,रेखीव पद्धतशीरपणे आणि नियमित अभ्यास करणारा.

त्याला चौथी-पाचवी पासूनच समजायला लागलं की आपल्याला मोठं होऊन नेमकं काय करायचं आहे ते!
काही मुलांची समजच वेगळी असते. आपोआप त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा तो वेगळा उठून दिसत असे.
त्याला एक लहान बहीण, कामानिमित्त कायम फिरतीवर असलेले बाबा आणि घरात आजी आजोबा. 

गौरी आपली बँकेची नोकरी करता करता आदित्यच्या सगळ्या वेळा व्यवस्थित सांभाळून त्याला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पुणे,मुंबई, बंगलोर अशी फिरत असे.
जसा जसा वरच्या वर्गात जायला लागला तसा तसा आदित्य आपल्या हुशारीमुळे विविध स्पर्धा परीक्षांमधून चमकायला लागला.

गौरीच्या घरातल्या सगळ्यांचेच पाय जमिनीवर.
आदित्य खरंच हुशार आहे आणि अभ्यास करणे त्याला मनापासून आवडते म्हणून आपण फक्त त्याच्या सोबत आहोत हे घरातल्या सगळ्यांना माहीत होते.

त्याच्या वयाची इतर मुले आणि त्यांचे पालक मार्कांसाठी आणि एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी वाटेल त्या क्लुप्त्या शोधत असत तिथे आदित्य शांतपणे त्याला आवडणाऱ्या इतर गोष्टी, त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी मिळालेला मोकळा वेळ वापरत असे.

आपण आय. आय. टी. प्रवेश परिक्षा द्यायची हे त्याने सहावी, सातवीत असतांनाच ठरवले होते.
दहावीपर्यंत आदित्यला शाळेव्यतिरिक्त वेगळा कोचिंग क्लास कधीच लागला नाही.
पण त्यानंतर या प्रवेश परिक्षेसाठी तयारी करायची असेल तर त्यादृष्टीने लागणाऱ्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी म्हणून आदित्यने मुंबईतील सर्वोकृष्ट क्लास चा पर्याय निवडला.

तो एकटाच मुंबईत मावशीकडे राहण्यासाठी गेला.
गौरी आणि बाबांनी आपल्या नोकरीतून जमेल तसा वेळ काढून आदित्यला वेळोवेळी मानसिक आणि भावनिक आधार दिला.

भारतातल्या नावाजलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शिकण्यासाठी म्हणून ही प्रवेश परिक्षा असते.
पण औरंगाबाद सारख्या, तुलनेने खेड्यातून मुंबईतल्या मोठ्या शैक्षणिक तळ्यात गेलेल्या आदित्य आणि त्याच्या आईवडिलांना इथल्या जीवघेण्या स्पर्धात्मक वातावरणाचा अंदाज जरा उशिरा आला.

तोपर्यंत आपण कोणाचे काही वाकडे केले नाही तर कोणी आपले वाकडे का आणि कशासाठी करेल असाच भाबडा त्यांचा जगावरचा विश्वास होता.

पण स्पर्धेत आपलं मूल ज्या मुलांच्या बरोबरीचे त्या सगळ्यांचे आणि त्यांच्या हितचिंतकांचे आपोआपच आपण शत्रू होतो हे लक्षात येण्यासाठी त्यांना मुंबईतल्या शैक्षणिक राजकारणाचे बरेच अनुभव घ्यावे लागले.

तरीही आपण आपली चांगली वृत्ती का सोडायची अशी शिकवण आदित्यला घरातून, म्हणून आपल्या अभ्यासाच्या वेळा सांभाळून तो इतर मित्रांची अभ्यासात मदत करत असे.

तो इतका हुशार आणि एकपाठी होता की त्याच्या क्लासमधूनच काय त्यावर्षी या परीक्षेची तयारी करणाऱ्या भारतभरातील संपूर्ण मुलांमधून तो पहिल्या शंभर मुलांमध्ये होता.
क्लास मध्ये अर्थातच त्याच्याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष होते. तोही आपला जास्तीतजास्त वेळ क्लास मध्ये घालवत असे.

अभ्यासात थोडी वेगळ्या पद्धतीची गणितं सोडवणं आणि त्याच्यापेक्षा लहान वर्गातल्या मुलांच्या शंकांचं निरसन करणं इतका विरंगुळा त्याला पुरत असे.
परिक्षा महिन्याभरावर आली तशी गौरी पण त्याच्या सोबत राहण्यासाठी म्हणून रजा काढून मुंबईला गेली.

तोपर्यंत आपण भले आणि आपलं काम भले या विचाराने आदित्य राहत असे.
तरीही तो मनात कुठेतरी अस्वस्थ आहे हे गौरीच्या लक्षात आले.
काहीतरी बिनसले आहे पण कुठे, हे काही तिच्या लक्षात येईना.
घरात तर सगळे व्यवस्थित होते. आणि एक दिवस अचानक तिला उलगडा झाला 
त्या दिवशी फिजिक्स ऑलिम्पियाड परीक्षेचा पेपर होता. आदित्यचा सगळ्यात आवडता पेपर.पेपर संपला आणि आदित्य बाहेर आला तो त्याचा चेहरा पडलेला, डोळे पाण्याने भरून आलेले.
गौरीने त्यावेळी त्याला काहीच विचारले नाही. असेच घरी जायला नको हे तिच्या लक्षात आले.
तिने एका हॉटेलजवळ रिक्षा थांबवली. आदित्यचा आवडता मसाला डोसा मागवला आणि इतर गप्पा मारता मारता हळूच त्याला विचारलं की काही सांगायचं आहे का तुला?
घरी मावशीसमोर त्याला आपल्याशी बोलता येत नसेल हा तिचा अंदाज खरा ठरला.
पेपर त्याच्या अपेक्षेप्रमाणे गेला नव्हता आणि त्याचं कारण अवघड होता असं नव्हतं तर प्रश्न सोडवण्याचा त्याचा स्पीड कमी पडला हे होतं.

होतं असं कधी कधी, तू फार विचार करू नकोस..प्रयत्न करूनही प्रत्येकवेळी यश मिळतंच असं नाही,
गौरीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण स्पीड कमी पडण्याचं कारण पेपर मध्ये नसून आदित्यचं मन विचलित झालं होतं हे त्याने सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटले.
गेले काही दिवस त्याला चोरून पोर्न फिल्म्स बघण्याची सवय लागली होती.
क्लास शेजारच्या गल्लीतल्या दुकानात अशा फिल्म्स बघायला मिळतात हा शोध त्याच्या बरोबरीच्या मित्रांनी लावला होता.
चार-पाच दिवसांत त्याला तिथे नेणारे मित्र तर सटकले पण हा इतर मुलांबरोबर जातच राहिला.
आपल्या अभ्यासावर याचा परिणाम होणार नाही अशी त्यावेळी त्याला खात्री वाटलेली होती.
पण आज पेपर सोडवतांना मनात तसे विचार आले त्यावेळी आपण चुकलो हे त्याच्या लक्षात आले.

क्लासमध्ये पेपर बद्दल चर्चा झाली. आदित्यला पेपर चांगला गेला नाही सगळ्यांना समजले.
त्याच्या बरोबरच्या मित्रांना अर्थात पेपर चांगला गेला होता.
ज्या मुलांनी त्याला तिथे नेलं होतं त्यांचा हेतू साध्य झाला होता. मुंबईतल्या मुलांच्या वागण्याचा फटका त्याला बसला होता.

या संपूर्ण प्रसंगात आदित्यने आपली जबाबदारी स्वीकारली आणि इतर कोणालाही दोष न देता आपण सावध राहून आपला रस्ता कसा सोडायचा नाही हे त्याला समजलं.
आई-बाबा सोबत होतेच. त्यांनीदेखील या विषयात सगळी परिस्थिती संयमाने आणि त्याच्यावर विश्वास ठेवत हताळली.

त्याचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं पण मागे बघत बसायला उसंत नव्हती. त्यानंतर त्याने संपूर्ण अभ्यास घरून केला.
बोर्डाची परिक्षा छानच झाली आणि प्रवेश परीक्षेचा पहिला टप्पा पण अपेक्षेप्रमाणे चांगला पूर्ण झाला.

आता अजून काही दिवसांत ती परिक्षा ज्याची तो वाट बघत होता.
अभ्यास व्यवस्थित होता आणि इतर गोष्टीपण सुस्थितीत होत्या.
त्या परीक्षेचा त्याचा आणि त्याच्या ग्रुप मधल्या त्याच्या मित्रांचा नंबर दादरला एका शाळेत आला. आई आणि  बाबा दोघेही त्याच्यासोबत होते. पहिल्या पेपर नंतर तासाभराने दुसरं पेपर होता.

पहिल्या पेपरला आदित्य आत गेला आणि थोड्यावेळाने तिच्या बहिणीचा रडतरडत फोन आला, तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे, त्यांना खूप लागलंय आणि दादरमधल्याच एका हॉस्पिटल मध्ये नेलंय.

गौरी आणि तिचा नवरा आदित्यच्या मित्राच्या आईवडिलांना झाला प्रकार सांगून तिथून निघाले.
आदित्य पेपर मधून यायच्या आत परत येतो असे म्हणाली त्यांना गौरी.

पण नंतर ती धावतपळत पुन्हा येईपर्यंत आदित्य दुसरा पेपर देण्यासाठी परत हॉल मध्ये गेलेला देखील होता.
त्याच्या मित्राच्या पालकांनी तिला सांगितले की आदित्यला त्यांनी व्यवस्थित काही न कळू देता दुसऱ्या पेपरसाठी पाठवलं आहे.

ते तीन तास कसे गेले तिचे तिला माहीत. नेमक्या महत्वाच्या वेळेला संकट आलं याची चुटपूट मनाला लागून राहिली तिच्या.
बहिणीच्या नवऱ्याला बरंच लागलं होतं म्हणून ती एकटीच आदित्यला घ्यायला आली होती. आता मन शांत ठेवण्यापेक्षा आणि प्रार्थना करण्यापलिकडे काय होतं तिच्या हातात.

आदित्य पेपरमधून वेळेआधीच बाहेर आला. आणि गौरीला बघून रडायलाच लागला.
बाबा कसे आहेत आणि कुठे आहेत हा त्याचा पहिला प्रश्न होता.

बाबा?...गौरी गोंधळली.

आणि मग आदित्यने जे सांगितले ते ऐकून तुम्हीच सांगा काय तिने काय प्रतिक्रिया द्यावी ते.

आदित्यला त्याच्या मित्राच्या आईने तुझ्या बाबांचा अपघात झालाय म्हणून आई त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे, असे सांगितले.

अर्थात आदित्यला ती परिक्षा पुढच्या वर्षी पुन्हा द्यावी लागली.
वेळ आपल्या वेगाने पुढे सरकला.

संकट बरोबर वेळेला आलं आणि निघून पण गेलं.
                        


पण निसर्गनिर्मित संकटापेक्षा माणूस निर्मित संकटाने जास्त नुकसान झालं.
या प्रसंगातून अनुभवाला आलेली मानवी वृत्ती किती भयानक आहे याचा सगळ्यांना धक्का बसला.

लोकांनी चर्चा केली काही दिवस आणि विसरले सुद्धा.
आदित्य वर्षभर उशिरा आय आय टी दिल्ली ला गेला.

पण ज्या आईने ज्या कोणत्या कारणासाठी ‘ध चा मा’ केला होता तिने काय मिळवलं?
दिसायला सुंदर असलेली ती एक आई ‘आधुनिक आनंदीबाई’चीच वंशज म्हणावी लागेल!






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा