शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

जगणं आनंदाचं!

“पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी शब्द ठरवला, दिव्यांग म्हणे!
कोणतं असं दिव्य अंग मिळालं आहे आम्हाला?

हा शब्द वापरण्या आधी आमच्या सारख्या कोणा व्यक्तीला विचारलं गेलं होतं?
आम्ही अपंग आहोत आणि आहोतच.
असे शब्द वापरून आमच्या शरीरातली कमतरता भरून निघणार नाही.
आपल्या देशात अजूनही आम्हाला दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करता यावेत म्हणून सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.

सार्वजनिक जागांवर तरी किमान आमचे जाणे-येणे सुलभ व्हावे, पण नाही.
बँका, ATMs, हॉस्पिटल्स, वेगवेगळी सरकारी,खाजगी ऑफिसेस, गार्डन्स, हॉटेल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह इतकंच काय रस्त्यातली स्वच्छतागृहे सुद्धा आमचा विचार करून बांधली गेलेली नाहीत.

रस्त्यावरून स्वतंत्रपणे फिरणे आम्हाला शक्य नाही.
पावलोपावली आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहून जगायचं..
आणि मग कुठले दिव्यांग?   

त्यापेक्षा ‘अपंग’ म्हणा, निदान लोकांच्या ओळखीचा तरी शब्द आहे!”
असे परखडपणे आपले मत मांडणारी “भावना” एक मनस्वी आणि स्वाभिमानी, सर्वार्थाने सुंदर व्यक्तिमत्व आहे.

२२ वर्षांची नुकतीच इंजिनिअर झालेली, एका छोट्या बाळाची आई असलेली ही तरुणी आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी बाहेर पडते. आणि दुपारी बाराच्या सुमारास शहरबस ची वाट बघणाऱ्या आणि बसथांब्यावर उभ्या असलेल्या तिला, तिच्या काही लक्षात येण्याआधीच भरघाव वेगात आलेली बस, थांब्यावर थांबण्याऐवजी जोरदार धक्का देते.

एक अपघात.. तो घडतो, त्यात तिची काहीही चूक नसतांना.
अपघातानंतर दहा दिवसांनी सर्वार्थाने भानावर येते, त्यावेळी तिला सगळ्यात पहिली जाणीव होते की आपल्या दोन्ही पायात संवेदना नाहीत. मज्जारज्जूला कधीही भरून न येणारी इजा पोहोचली आहे आणि कायमस्वरूपी अपंगत्व हे आता इथून पुढच्या आयुष्याचं सत्य आहे..

आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल प्रत्येकासाठी तर आपलं स्वतःचं अस्तित्व.
आणि तरीही आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो ते.
तरीही कधी कधी अनपेक्षितपणे असे काही क्षण येतात आपल्या आयुष्यात की आपलं आयुष्य बदलवून टाकतात.
आणि हा बदल आपली इच्छा असो वा नसो स्वीकारावा हा लागतोच.

अपंगत्व मनाने स्वीकारण्यासाठी वेळ लागतो..भावना सांगते, कारण ती एक कैद असते.
आपण आपलेच कैदी असतो, ना एका अंगावर वळता येत,ना उठून बसता येत..चालणं,फिरणं तर अशक्यच. संकट संपूर्ण घेरून असतं आपल्याला आणि आपण जखमी, एकाकी, हतबल होऊन जातो त्या क्षणी.

आपल्या नेहमीच्या सहज वाटणाऱ्या क्रिया ज्या इतक्या दिवस आपण सहजतेने करत आलेलो असतो त्या आता कधीच करणं शक्य होणार नसतं...
आणि मनाला हे काही केल्या पटत नसतं.
उलटसुलट विचारांचा गोंधळ मनात असतो. जखमी शरीराच्या कैदेत एक अस्वस्थ आणि त्याहून जखमी मन असतं.

एक अपघात, आपली आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची सगळी स्वप्नं धुळीला मिळवतो.
फक्त एक आयुष्य बदलतं,असं नाही...तर कुटुंबातील जवळच्या सगळ्या जिवलगांची आयुष्य अचानक बदलतात. त्यांनाही हे अनपेक्षित असतं..कुठून कसं सावरायचं कळत नाही.
आपली व्यक्ती जीवंत आहे आणि आपल्यात आहे हाच विचार फक्त बळ देतो त्यांना.
करण्यासारखं काहीच नसतं आणि तरीही श्वास सुरु असतात.
मरणप्राय म्हणजे नेमकं काय हे या हरवलेल्या संवेदना सांगत असतात मनाला.
मन झगडत असतं, काहीही स्वीकारायला तयार नसतं.
आपल्या जवळच्या व्यक्तींना आपली घालमेल समजत असते आणि त्यांची मनस्थिती पण थोडीफार तशीच असते. सगळे एकमेकांना फक्त घट्ट धरून असतात.

आपण आपल्या या मानसिक अवस्थेत स्वतःलाही नको असतो अशा वेळी आपल्याला आणि घरातल्या लोकांना भेटायला अनेकजण येत असतात.
येणारा प्रत्येकजण आपलेपणानेच येत असतो, त्यांचे हेतू प्रामाणिक असतात.
पण आपला हेतू कसा पोहोचवायचा याची साक्षरता त्यांच्यात नसते म्हणून त्या काळात जे काही संवाद आपल्या समोर घडतात त्याने सहनशक्तीचा अंत होण्याची वेळ येते.

“अरेरे..अजून पूर्ण आयुष्य जायचंय!”.... “आता कसं होणार पुढे हीचं”

“आता या छोट्या बाळाचं कसं होणार?”  

“आता अविनाशचं काय?” ..... “दुसरं लग्न करतील का ते आता?”

असं बोलायचं असतं का पेशंट समोर?
प्रत्यक्ष विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या मागेसुद्धा अनेक प्रश्न दडलेले असतात, ते समोर विचारण्याची हिंमत नसते म्हणून..पण डोळ्यातून विचारलेच जातात एकमेकांना.

हे सगळं भावना आज पोटतिडकीने आणि प्रामाणिक, परखडपणे बोलते, कारण तिला वाटत असतं असे प्रसंग ज्याच्यावर येतात त्या व्यक्तीला आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना त्यावेळी काय वाटत असते याचा अंदाज निदान आत्ता हे वाचून तरी इतर लोकांना यावा आणि अशा परिस्थितीत बोलण्याचे, वागण्याचे भान त्यांना यावे. मला अशा गोष्टींचा सामना करावा लागला पण निदान या परिस्थितीत असलेल्या इतर कोणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझी मदत होऊ शकेल.

“त्या काळात माझ्या अंगावर उलटा अडकवलेला एक पांढरा शर्ट असे कारण पाठीला कापडाचा स्पर्श देखील मला सहन होत नसे, माझ्या नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण गेलेलं,म्हणून त्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी म्हणून आणि इतर कुठलीही अजून मेडिकल गुंतागुंत होऊ नये म्हणून माझ्या अंगावर पोटापासून एक पांघरून टाकून बाकी भाग केवळ झाकलेला असे...येणारे सहृद “नेमकं झालंय तरी काय हिच्या पायांना” ह्या उत्सुकतेने अंगावरच्या त्या पांघरुणाला डायरेक्ट हात घालत. घरातल्या लोकांना त्यांच्या या कुतुहलाला आवर घालण्यासाठी लक्ष ठेऊन बसावे लागे.
काही लोक तरीही आपला हट्ट न सोडता स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याची आपली उत्सुकता पूर्ण करत असत.”

कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे पण कशाचं आणि कोणत्या मर्यादेपर्यंत याची जाणीव असायला नको?
आपल्या कुतूहलासाठी आपण कोणाची व्यक्तिगत स्पेस ओलांडतो आहोत याचे माणूस पातळीवर भान नसण्याइतके काही लोक असंवेदनशील वागतात.

त्याचं प्रबोधन कोणी कसं करायचं?

परिस्थितीची जाणीव झाली त्या दिवसापासून भावनाचं परावलंबी आयुष्य सुरु झालं. स्वाभिमानी मन वेळोवेळी जखमी झालं.
लोकांची उत्सुकता ओसरली आणि त्यांच्यासाठी नेहमीचं झालं की त्याचं येणं कमी कमी होत जातं आणि खरे सखे-सोबती केवळ आपल्या सोबत उरतात, ज्यांना काय झालं यापेक्षा कसं सावरायचं यात रस असतो.

हळव्या आवाजात भावना आणखी एक अनुभव सांगते,
“अशाच एका संध्याकाळच्या कातर वेळी,निराशेच्या क्षणी मनात कालवाकालव होत असतांना अविनाश, माझ्या बेड जवळ बसले आणि त्यांनी हार्मोनियमच्या साथीने एक अभंग गायला सुरुवात केली..
"आवडीने भावे हरीनाम घेशी..तुझी चिंता त्यासी सर्व आहे..!”

अभंगाचे बोल आणि अविनाशच्या मधुर आश्वासक आवाजातील शब्द मनाच्या गाभाऱ्यात खोलवर उतरले आणि हळूहळू मनाचा गाभारा स्निग्ध प्रकाशाने भरून गेला.
अंधार संपत होता आणि मनात एक नवी ज्योत प्रकाशमान होत होती.”
जागृतीचा तो क्षण तिच्या मनात आजही ताजा आहे. प्रसंगातून सावरण्याची ती सुरुवात आजही ताजी आहे तिच्या मनात.  
                 


अविनाश तिच्या संपूर्ण आयुष्याचा आधार आहेत. खरा जोडीदार कसा असावा आणि साथ कशी द्यावी हे याचं त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे.
आज ती ४७ वर्षांची आहे त्यावेळेस पासून ते आजपर्यंत तिचं आयुष्य हा तिचा प्रवास सकारात्मक आयुष्याचा वस्तूपाठ आहे.

अपघातानंतरची अनेक वर्षे स्वतःला सावरण्यात आणि स्वतःपुरते स्वावलंबी होण्यात गेली.
त्यावेळी बाळाची आणि घराची जबाबदारी प्रामुख्याने तिच्या सासूबाईंनी घेतली.
भावनाच्यादेखील आई झाल्या त्या, आज तितक्याच खंबीरपणे भावना त्यांच्यासोबत आहे. भावनाचे आई-वडील, काही जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी या त्यावेळी तिचा मोठा मानसिक आधार होता.

त्या काळात मदतीला आलेल्या प्रत्येकाचे स्मरण आणि जाणीव तिला आहे.
या प्रवासात तिला येणाऱ्या अनुभवातून तिला आज प्रामाणिकपणे वाटतं हे की आपल्या समाजामध्ये अपंगत्वा बाबत साक्षरता येणं खरंच खूप गरजेचं आहे!
कारण अनेक बाबतीत आपण फक्त शिकलेले आहोत,सुशिक्षित..साक्षर नाही.
आपल्या समाजात अपंगत्वाबद्दल पुरेसा सजग दृष्टीकोन नाही.

शरीराने अपंग व्यक्तीबद्दल आपल्याला कीव वाटते, अनाठायी सहानुभूती वाटते..
आणि अशा प्रकारे समाजातल्या दहा पैकी आठ व्यक्ती मानसिक, वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या अपंग आहेत.
आणि आपल्या या दरिद्रीपणाची त्यांना जाणीव देखील नाही! आणि लाजही.

आपल्याला शिकण्याची गरज आहे. सजग,साक्षर होण्याची गरज आहे.

आयुष्यातला प्रत्येक वाईट अनुभव मला थेट येईल असे नाही, यायलादेखील नको.
पण मग दुसऱ्याच्या अनुभवातून शहाणपण शिकण्याचे भान मला यायला हवे.
आपल्या आयुष्यात फक्त आनंदाचे  आणि सुखाचे  हवासे वाटणारे अनुभवच सगळ्यांना हवे असतात.
त्यातून जगण्यातलं शहाणपण मिळण्याची काहीच शक्यता नसली तरी.
लोकं सुखाच्या क्षणांचा हव्यास करतात.
आणि नकोसे वाटायला लावणारे क्षण टाळण्याकडे,लपवण्याकडे लोकांचा कल आपोआप जातो.
पण खरेतर हे असे नकोसे वाटणारे क्षण आपले असो किंवा इतर कोणी अनुभवलेले सहसंवेदनेची भावना मनात रुजलेली असेल ना तर असे क्षण आपल्याही मनाला आतून लख्ख उजळून टाकणारे असतात.
जगण्यातली समज घडवणारे आणि माणुसकीला स्पर्श करणारे असतात.

भावना,                 


आपल्या वाट्याला जे काही आलं ते तिने आपलसं केलं..असं सत्य आपलसं करून घेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.
तिच्या ‘कमी’ ला तिने आपली ताकद बनवलं.
प्रत्येक व्यक्ती लौकिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर गेला कीच केवळ त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजायचं असं थोडीच आहे?
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यासाठी जे करता येईल ते तिने आपल्या आयुष्यात केलंच.

प्रत्येकाला नेत्रदीपक यश आणि सार्वजनिक पुरस्कार मिळत नसतात.
पण म्हणून काही त्यांच्या आयुष्याची लढाई ही खरी लढाई नसते असं थोडीच आहे?
भावना एक सुजाण, कमालीचं साधं, रसिक आणि कलात्मक आणि तरीही कणखर व्यक्तिमत्व आहे.

आपल्या मुलीला चांगली व्यक्ती आणि उत्कृष्ठ डॉक्टर बनवण्याचं श्रेय तिचं आहे. अनेकांचं सामाजिक मातृत्व देखील ती साधेपणाने निभावते आहे.

ती अतिशय प्रेमळ आणि खंबीर बायको आहे.
आवडती सून आहे, नातेवाईकांमध्ये लोकप्रिय आहे.
मित्र-मैत्रिणीच्या हक्काचा विसावा आहे.
आणि समाजातल्या अनेक तिच्यासारख्या लोकांची मार्गदर्शक,मैत्रीण ती आहे.
त्यांच्यासाठी सतत लहानमोठे उपक्रम करण्यात ती मग्न असते.

आम्ही आमच्या सोयी आणि सुविधेनुसार आम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी येतील असे काही तांत्रिक आणि सोपे बदल केलेले असतात. ते समजून घेऊन कुटुंबात आणि समाजात आमचे वावरणे सहज व्हावे अशी आणि इतकीच मदत आम्हाला हवी असते, यापेक्षा सहानुभूती म्हणून कोणी अधिक मदत करण्याची गरज नाही, हे ती आवर्जून सांगते. 

अपंग व्यक्तींनी देखील जबाबदार व्यक्तीसारखे आणि स्व-सन्मानाने वागायला हवे, अपंग असणे ही केवळ शरीराची स्थिती आहे मनाची नाही. आपल्याला नको त्या सोयी-सुविधांचा लाभ मिळण्याची अपेक्षा करू नये आणि त्यामुळे अशा व्यक्तींच्या सोबत असणाऱ्यांनी देखील त्यांना अति लाडावून ठेऊ नये असे तिला प्रामाणिकपणे वाटते. त्यासाठी ती आवर्जून जाहीरपणे आपली मते मांडते.

अनेक सामाजिक कामात सहभागी होते आणि अत्यंत मनापासून आयुष्य जगते आहे.

तिचा सहवास सगळ्यांना हवाहवासा वाटतो.
तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी देऊन जातो.
आपापल्या कुवतीप्रमाणे ज्याने त्याने त्यातून घ्यावं.

आयुष्यात काय घडावं हे आपल्या हातात नसतं, आपल्या हातात असतो तो आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन. एक कुटुंब एकत्र बळ एकवटून उभं राहिलं तर कितीही मोठं संकट कोणाही सदस्यावर येऊ दे..मिळून मार्ग शोधला जातो. एक शक्ती जाते पण दुसऱ्या अनेक सोबत करतात आणि प्रवास आनंदाचा होतो.

प्रवास कष्टाचा असेल तर मिळणारे समाधान मनात तृप्त भाव जागवणारे असते.  

  

११ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. मला तर वाटतं प्रसन्न, की अपंग व्यक्तीचं मन इतर कोणाही व्यक्तीपेक्षा जास्त निकोप आणि संवेदनशील असतं.
      बोलून दाखवण्याचा पर्याय हा अगदी शेवटचा पर्याय असतो बऱ्याचदा..

      हटवा
  2. Khup chan me maza experience share karto ek divas me bhaji aanayla jat hoto tevha ek 2 wheeler rider majhya javal aala aani 5 Rupees offer kele fir Tea , me nakarle tevha to mhanala i thought another way mhanje wheel chair var phakta buggers astat mhanun this tendency should be changed

    उत्तर द्याहटवा
  3. Me majha experience share karto me ek polio patient person based in Pune kahi mahinya purvi ek scooter rider ne mala Rs 5 deu kele for Tea , me nahi mhantlo tar to mala mhanala sorry Wheel Chair var baslele beggars astat aase vatle this human psychology should be changed to see towards Physical Handicap Persons

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरंय..लोकांची मानसिकता बदलण्यासाठी गरज पडेल तिथे खंबीर भूमिका घेऊन सन्मान जपायला हवा.
      एखाद्याबद्दल असा विचार मनात येणं हे खरं 'अपंगत्व' आहे.

      हटवा
  4. "The only thing certain in life is change." असे उद्गार वाचणे, म्हणणे सोपे आहे. पण जेव्हा असा बदल जीवनात घडतो, त्या वेळी वेगवेगळ्या phases मधून ती व्यक्ती आणि तिच्या जवळचे लोक जातात, वेगवेगळ्या भावना मनात अनुभवतात, विचारांचे ताफे अनेक दिशां मधे धावू लागतात आणि ह्या गोष्टींचा वागण्या, बोलण्या वर आणि स्वतःकडे, इतरांकडे आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोणावर वर ही परिणाम होतो. हा प्रवास सहज, सरळ नाही. परिस्थिती चा सामना करत असताना सामना करावा लागतो स्वतः च्या विचार-भाव विश्वाचा. रोजच्या सौंसारातल्या, व्यवसायातल्या, पालकतवाच्या जवाबदाऱ्या सांभाळताना आयुष्याची वर्ष पटापट निघून जातात. जेव्हा अशी घटना घडते, जिच्या मुळे सावरण्याच्या काळात ही दगदग जेव्हा तात्पुरती मंदावते, तेव्हा भेट होते, सामना करावा लागतो स्वतःच्या विचार-भाव विश्वाशी. जीवनात सगळं सुरळीत चालू असताना आपल्याच स्वभावाची अर्धवट ओळख आपल्याला असते. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या स्वभावातल्या इतर पेहलूनची आपल्याला ओळख होऊ लागते. मनाची नकारात्मक ते सकारात्मक ह्या टोकांमधल्या झुलण्याचे साक्षी माणूस बनतो. धीर ठेवणे, श्रद्धा ठेवणे, परिस्थिती चा सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकार करणे, आपल्या हातात असलेल्या गोष्टी सातत्याने करत राहिल्याने भावना हा प्रवास gracefully करत आहे.

    ह्या काळात जवळच्या व्यक्तींच्या वागण्या मुळे कधी मनाचं खच्चीकरण होतं तर कधी मनाला बळ मिळतं. समोर असलेल्या जवाबदार्या पार पाडत असताना, आपल्या सारख्या इतर लोकांना स्वतःच्या उदाहरणाने प्रेरणा व मार्गदर्शन करत असताना जेवणात समाधान व अर्थ मिळतं.

    Caregivers साठी पण ही लंबी लढाई क्षीणकारक असते. त्यांना ही साथ देत असताना, स्वतः ला ही सांभाळाणे जरुरी आहे. त्या साठी ग्रस्त व्यक्तींसाठी बरोबर नातेवाईकांसाठी ही support system आवश्यक आहे. ह्या साठी Self help groups ची खूप मदत होते.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या स्वतःच्या क्षमतांची आणि आपल्या जवळच्या लोकांच्या नात्याची खरी ओळख होते आपल्याला.
      आपलं आयुष्य नेहमी सुरळीत पार पडेल असं गृहीत धरतात लोकं, म्हणून सहजपणे असंवेदनशील वागू शकतात.
      भावनासाठी आज देखील हा प्रवास सोपा नाही. पण मग मनात जे आहे ते बोलायला तर हवंच.
      सहसंवेदना आपोआप नाही समजली तरी व्यक्त करण्यातून एकमेकांच्या मनापर्यंत जरूर पोहोचते.
      प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!

      हटवा
  5. या विषयात काम करणाऱ्या संस्थांचा आग्रह होता दिव्यांग शब्दा साठी असो. त्यामुळे बरेच जण वाचगील

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कापिलजी,
      तुमच्याही लक्षात येईल की हा शब्द खरोखरच योग्य नाही.मलाही भावनाचा दृष्टीकोन पटतो कारण खरंच नुसता शब्द वापरून काय होणार? त्यांची दैनंदिन परिस्थिती सुलभ होण्याच्या दृष्टीने सामाजिक पातळीवर प्रयत्न होत नाहीत.

      हटवा
  6. Apratim lihilay ani khara ahe ki apalya samajat saksharata ani susanskrutata yancha arthaarthi sambandh nahi.khup jagrukta ani sanvedanshilata yayla havi ahe. Pan Bhavana taiinaa hats off...ani tyanchi olakh karun dilyabaddal tai tuze khup khup abhinandan. -sonali

    उत्तर द्याहटवा
  7. Apratim...ani khup khara...I totally agree ..hats off to Bhavana tai... Ani asa kankhar vyakimatvachi olakh karun dilyabaddal tai tuze khup abhinandan ani abhar....sanga kase jagayche khanhat khanhat ki ganne mhanat....

    उत्तर द्याहटवा