शुक्रवार, १ जून, २०१८

‘प्रेमा’च्या गावा जावे!


                                                              

आपल्याला येणारा कोणताही अनुभव हा फक्त एकअनुभव असतो. तोचांगला किंवावाईट हे आपण ठरवतो,आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवतो.

अशाच एका अनुभवाची एक गोष्ट सांगणार आहे.
दिव्या सुंदर,सुशिक्षित एका प्रतिष्ठित घरातली मुलगी, एकुलती एक. शिक्षण पूर्ण होता होता एका आपल्यापेक्षा वेगळ्या धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडली.
दोन वर्ष एकमेकांबरोबर घालवल्यावर ज्यावेळी तिच्या लग्नाबद्दल स्थळं बघायला घरातल्या लोकांनी सुरुवात केली त्यावेळी तिने आपल्या मित्राला याबद्दल सांगितले,त्याने फारसे मनावर घेतले नाही.
त्यानंतर लगेचच तिला बघायला आलेल्या मुलाने तिला पसंत केले..घरच्या सगळ्यांना देखील तो मुलगा पसंत होता..आता प्रश्न फक्त तिच्या पसंतीचा होता. एकमेकांबरोबर बोलण्यासाठी आणि ठरवण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी त्यांना एकांत दिला.
त्यावेळी तिने त्या मुलाला ती त्याच्याबरोबर लग्न करू शकत नाही हे कारणासहित सांगितले आणिआता मला तू नकार देअसा प्रस्ताव त्याच्यासमोर मांडला. त्याला अर्थातच तिच्या म्हणण्याचा धक्का बसला. पण त्याने तिने सांगितले तसे त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगितले. सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. पण विषय तात्पुरता तरी संपला.
ही घटना तिने आपल्या मित्राला सांगितली. आणि आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे असेही सांगितले.
पळून जाऊन लग्न करणे,दोघांनाही मान्य नव्हते. आपल्या प्रेमाबद्दल घरातल्यांना सांगून त्यांच्या संमतीने लग्न करणे यावर दोघे ठाम होते.
दरम्यान ज्या मुलाने तिला नकार दिला होता त्याने आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला का नाही म्हणावे लागले, ही सत्य परिस्थिती सांगितली.
त्या मुलाच्या आईला अत्यंत राग येऊन तिने मुलीकडच्या लोकांना फोन करून आमच्या मुलामुळे नाही तर तुमच्या मुलीमुळे नकार द्यावा लागला, याचे खरे कारण सांगितले.
मुलीच्या घरात तर वादळ आले. वादळातल्या पहिल्या सगळ्या प्रतिक्रिया ओसरल्यानंतर काही महिन्यांनी दिव्याने आपलं म्हणणं घरातल्या लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला.पण तिचे म्हणणे घरात कोणालाही मान्य झाले नाही.
दरम्यान तिचे ज्याच्यावर प्रेम होते त्या मुलाने पण आपल्या घरातल्या लोकांना तिच्याबद्दल सांगितले.
त्यांनी तर इतका प्रखर विरोध केला की तडकाफडकी त्याला नोकरीतून बदली घेऊन दूरच्या शहरात जायला भाग पाडले.
आपल्या घरातल्या लोकांचा इतका प्रखर विरोध बघून त्याने प्रेमातून माघार घेतली. आणि नोकरीसाठी निघून गेला.
आपली असमर्थता तिच्यापर्यंत पोहोचवणे त्याला शक्य झाले नाही.
दिव्या सैरभैर झाली. परिस्थितीचा स्वीकार करणे तिला जमेना. या सगळ्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून तिने आपल्या स्वतःवर आणि घरातल्या लोकांवर सूड घायला सुरवात केली.

                                                   


दिवसेंदिवस तिचे मानसिक संतुलन बिघडायला लागले. सगळ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ.
हा प्रसंग घडून दोन वर्ष झाली तरी तिचा परिस्थितीला असलेला विरोध कमी झाला नाही. आता घरातले लोक काळजीत पडले. त्यांना वाटले होते की काळ हे सगळ्यात मोठे औषध आहे. हळूहळू ती आपले नॉर्मल आयुष्य सुरु करेल.
पण तिच्यासाठी जणू काळ अस्तित्वातच नव्हता. ती त्याच प्रसंगापाशी हटून बसली होती.
तिच्या हट्टाचे रुपांतर एव्हाना दुराग्रहात झाले होते. वयाची पंचविशी उलटत आली होती.
इतके मोठे शिक्षण असून ना नोकरी आणि ना  लग्न..इतकी मोठी मुलगी अस्वस्थ म्हणून सारे घर-दार अस्वस्थ होते.
एकीकडे ती आणि दुसरीकडे समाज अशा कोंडीत घरातले सापडले.
तिच्यावर बळजबरी केली आणि ती जीवाचे बरं वाईट करून बसली तर?
आजही मी त्याला विसरणार नाही, लग्न केले तर त्याच्याशी नाहीतर मी अशीच जगेन जशी आत्ता जगते आहे. मी कोणाचेच काहीही ऐकणार नाही... यावर ठाम आहे. तिला अजूनही तो मुलगा परत येईल असा विश्वास वाटतो आहे.
परिस्थितीचा तिने स्वीकार करावा आणि तिचे आयुष्य पुन्हा वाहते व्हावे यासाठी तिच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने समुपदेशनाचे अनेक प्रयत्न केले जात आहेत.
मात्र नाव दिव्या असलेली ही तरुण मुलगी आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादातून आपले आयुष्य अंधारलेल्या वाटेवरून चालते आहे. या घटनेच्या परिणामातून घरातला प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमधून जात आहे.
ही गोष्ट आपल्यापैकी कोणाच्याही घरात घडू शकते.
कोणाबद्दलप्रेम वाटणे हा काही गुन्हा नाही. आपल्या सगळ्यांनाच आनंददायक अनुभव हवेसे वाटतात.
पण भावनाविवश होऊन प्रेमासाठी जीव कासावीस होणे हे मात्र मानसिक दुबळेपणाचे लक्षण आहे.
प्रेमाबद्दल फार चुकीच्या कल्पना आपल्या मनात असतात आणि चित्रपटात बघून त्या फिल्मी, भाबड्या देखील असतात.  
खरंतर प्रेम हा आयुष्याचा केवळ एक असा पैलू आहे ज्यामुळे आयुष्य सुंदर होऊ शकते.
राग, आनंद, सहकार्य,मैत्री यासारखीप्रेम ही केवळ एक भावना आहे.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असलेली अत्यंत मुलभूत आणि महत्वाची भावना. वेगवेगळ्या रुपात आपण सगळेच ती अनुभवतो.

पण कोणत्याही नात्यात तिचा अतिरेक झाला तर इतर भावनांसारखा या भावनेचा देखील त्रास होतो.
अति प्रेम श्वास गुदमरायला लावते. एकमेकांच्या प्रेमात असणे हे एकमेकांची वाढ करणारे आणि नैसर्गिकरित्या फुलवणारे नाते असते. पण लोकं प्रेमात नुसते असत नाहीत तर चारी मुंड्या चीत सपशेलपडतात
असेपडणेम्हणजे प्रेमाचेगुलाम होणे.
प्रेमात भक्तीभाव असणे ठीक आहे पण त्यासाठी स्वतःची भावनिक आणि मानसिक वाट लावणे ही फार मोठी किंमत चुकवणे आहे.
काही कारणाने प्रेमात अपयश आले तर अशा व्यक्ती स्वतःला दोष देत बसतात. रडक्या आणि दुराग्रही, हट्टी बनतात.
ही विचारांची अपरिपक्वता आहे. प्रेमाच्या गावाला जरूर जावे..पण नीट पत्ता विचारून!
पुढच्या भागात निरोगी प्रेमा विषयी.
तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सोपं, सहज जगा!
© डॉ. अंजली/ अनन्या.
# आरसा
(फोटो सौजन्य: गूगल)




1 टिप्पणी: