शनिवार, २८ मार्च, २०२०

लैंगिक भूमिकेचा स्वीकार


त्यापेक्षा धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं..काय पाप केलं म्हणून हे सगळं आपल्या वाट्याला. आता कसं तोंड दाखवायचं कोणाला? आणि सांगायचं काय?” ही होती शुभदाची पहिली प्रतिक्रिया ज्यावेळी तिला नीराविषयी समजलं. बसलेल्या मानसिक धक्क्याने आत्तापर्यंत जपलेलं,सावरलेलं तिचं त्रिकोणी जग कोलमडून पडलं होतं. हातापायातलं त्राणच निघून गेलं.
झालं असं की त्यांच्या मुलीने नीराने, जी परदेशातील शिक्षण संपवून तिथेच एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती. तिने आपल्या बाबांना अगदी स्पष्टपणे कसलीही सारवासारव न करता आपण सेक्शुअली इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत आणि गेल्या सहा महिन्यांपासून सुझानसोबत एकत्र रहात आहोत हे फोनवर सांगितलं. तिच्या या सांगण्याचा त्यांना धक्का बसलाच नाही, असे नाही. पण त्यांनी त्यावेळी आलेली सगळी अस्वस्थता अत्यंत संयमाने हाताळली. आपल्या आधी कसं काहीच लक्षात आलं नाही याचा त्यांना खेद वाटला. त्यांचे सगळे कुटुंब,नातेवाईक आणि मित्रपरिवार अत्यंत सुशिक्षीत, सुसंस्कृत, पुरोगामी, मोकळ्या विचारसरणीचे होते. पण असे एखादे जगावेगळे पाऊल प्रत्यक्ष उचलण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याही मनावर विलक्षण ताण आलाच. शुभदापासून हे लपवणं शक्यच नव्हतं. नाहीतर नीरा स्वतः आईशी बोलायला तयार होती. पण तिला सांगण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली. त्याआधी नीराचं म्हणणं हे परदेशातलं केवळ एक फॅडतर नाहीये ना, आपल्या भावनिक-मानसिक गरजा भागवण्याचा तिने शोधलेला केवळ एक मार्ग तर नाहीये ना याची त्यांनी खात्री करून घेतली.
                                        


मोठं होतांना समज येऊ लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची नीराला होत गेलेली जाणीव, त्यानंतर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि मागच्या पाच वर्षात सुझानसोबत आपल्या विचारांमध्ये आणि समजूतींमध्ये आलेली स्पष्टता,त्यातून झालेले बदल,स्वीकाराची प्रक्रिया, असा सगळा प्रवास नीराने बाबांना विनासंकोच,अगदी मोकळेपणानं सांगितला. एकमेकींसोबत आयुष्य सुखाने घालवू शकतो ही खात्री झाल्यावर आता दोघीही आपल्या नात्याचा कायदेशीर स्वीकार करायला तयार होत्या. सुझानच्या घरच्यांची याला परवानगी होती. आता प्रश्न होता नीराच्या घरी सगळं सांगण्याचा.   
शुभदाचा अंदाज घेऊन बाबांनी तिला याबद्दल सांगितले तर खरे पण त्यानंतर तिची जी काही प्रतिक्रिया झाली त्यातून गेल्या तीन महिन्यांपासून दोघेही वेगवेगळ्या मानसिक दबावाखाली जगत होते.     कासावीस मनाने शुभदाने स्वतः ही गोष्ट आपल्या जीवलग मैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितली. कोणीतरी तर आपल्या मुलीला त्यापासून परावृत्त करण्याचा उपाय सांगेल. पण त्यांच्यासाठीही हे काहीतरी अघटितच होतं. तोपर्यंत असं वाटत होतं की असं काही फक्त सिनेमात दाखवतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही घडत असेल कोणाच्या तरी ते जग काही आपलं नाही. अतिश्रीमंतांचे असतात हे सगळे चोचले. आपल्यासारख्यांच्या घरांमध्ये आजपर्यंततरी ऐकलं नाही असं काही. त्यांनाही शुभदासारखाच धक्का बसला,पण या क्षणी मात्र स्वतःला सावरून सगळ्यांनी शुभादाचेच सांत्वन करायला सुरवात केली. कितीही हुशार असली म्हणून काय झालं, नीराला बारावीनंतर लगेच परदेशात शिकायला पाठवलं तेच चुकलं. त्याचाच हा परिणाम.उच्च शिक्षणाचे फायदे असतात तसे तोटेसुद्धा. ताबडतोब भारतात बोलावून तिचं लग्न लावून द्यायला पाहिजे, मदत राहिली बाजूला पण असल्या  बडबडीचा उबग येऊन शुभदा एकदम जी गप्प झाली ती आपल्या रूममधून बाहेरदेखील पडेनाशी झाली. एरवी शांत आणि संयमी असणाऱ्या शुभदाची आता बाबांना काळजी वाटायला लागली. मनातला गोंधळ आणि कालवाकालव थोडी शांत झाली की ती आपोआप सुसंगत विचार करायला लागेल आणि मग हळूहळू तिला बोलतं करता येईल असा विश्वास आणि अनुभवही त्यांना होता.झालंही तसंच. काही दिवसांनी शुभदा थोडी स्थीर झाल्यासारखी वाटली आणि मग बाबांनी मदत घेतली. मित्र आणि नातेवाईक सोडून त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करू शकणाऱ्या मानसतज्ञांची.
आपलं मूल हे कितीही आपलं असलं तरी त्याचं आयुष्य आपल्याला नाही तर त्याचं त्यांनाच जगायचं असतं हे आपल्या आयुष्यात पालकांना कधीतरी मान्य करावंच लागतं. त्यांचा रस्ताही वेगळा असतो आणि त्यावरचा प्रवासही. आपल्यापैकी प्रत्येकजण जसा वेगळा असतो तशाच प्रत्येकाच्या गरजादेखील वेगळ्या असतात. त्या गरजा भागवण्याचे पर्याय,मार्ग माणसे शोधतात. माणसांच्या आर्थिक,सामाजिक गरजा जशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असतात तशाच वैचारिक,भावनिक आणि शारीरिक गरजादेखील. समाज पातळीवर सर्वांना सुस्थितीत राहण्यासाठी सोय म्हणून आपणच काही नियम बनवतो. काही परिस्थितींमध्ये त्यात बदलदेखील केला जातो.  कोणाशी लग्न करायचं,करायचं की नाही? असे निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत असले तरी त्याला सामाजिक पैलूही असतो. कारण आपला समाज आपल्याच आजूबाजूला असलेले लोक असतात आणि आपल्या निर्णयांचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. असे असले तरी प्रत्येकाचे आयुष्य हा त्याचा खूपच व्यक्तिगत प्रश्न आहे. जगतांना आपण इतरांना त्रास होणार नाही अशी कोणती जीवनशैली स्वीकारायची हे ठरवण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे. कारण आपण लोकशाही एक मूल्य म्हणून स्वीकारलेले आहे. कोणत्या व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवायचे हा निर्णय दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर सहमतीने आणि स्वीकाराने असेल तर त्याला इतर कोणाच्याही मान्यतेची गरज नसते.
समलिंगीसंबंध भारतासह जगभरातील अनेक देशांनी कायदेशीर मानलेले आहेत. यामागे लोकशाहीतले व्यक्तिस्वातंत्र्य हेच मूल्य प्रामुख्याने जपलेले आहे. म्हणजे ‘समाजमान्यता’ हा मुद्दा तसा गौण आहे. शुभदासारखी व्यक्ती घाबरते कशाला तर शक्यतो परंपरांनी घालून दिलेले नियम आणि चौकटी मोडायला. कारण त्यामागे असुरक्षितता येते. कधी ती थेट सामाजिक स्वीकाराची असते तर कधी इतर चारचौघींसारखे आपल्या मुलीचे जग का नाही,याबद्दल असते. त्यात अनिश्चित भविष्याची अकारण चिंता सामावलेली असते. माणसांना चाकोरीत जगणे का आवडते? कारण ते सगळ्यात जास्त सुरक्षित असते म्हणून. त्यात संघर्ष नसतो. चाकोरी तोडण्यातून निर्माण झालेली जगण्याची आव्हाने,संघर्ष आपल्या मुलीला झेपतील का याचीही काळजी आईला वाटू शकते.
पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून आजपर्यंत निभावत आणि मान्य असलेल्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाचा एक माणूस म्हणून विचार करणे आपल्या सगळ्यांसाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यापलीकडेही माणसात काही क्षमता असतात त्यांचा स्वीकार व्हायला हवा. शुभादालाही आपल्या वाटण्याचा खोलवर विचार हळूहळू करावा लागला. त्यानंतर स्वीकाराच्या दिशेने प्रवास सुरु झाला. निर्माण झालेली परिस्थिती काही आपल्या हातात नाही. नीराच्या या निर्णयामुळे ‘आई’म्हणून तिच्यावर संस्कार करायला ‘मी कुठे चुकले का’ हा विचार संपूर्णपणे वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाणारा आणि नुकसान करणारही आहे, हे तिच्या लक्षात आले. त्यापेक्षा तिला असे आकर्षण नैसर्गिकपणे असू शकते हे मान्य करून  केवळ ‘समाज काय म्हणेल’ आणि ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करणे आणि तिच्या मनातल्या इच्छा दडपून,तिच्यावर भावनिक दबाव टाकणे हा तर तिच्यावर अन्याय आहे. आपला नैसर्गिक कल समजण्याइतकी आणि आयुष्याचे निर्णय घेण्याइतकी ती सक्षम,स्वतंत्र आहे, हे तिनेही मान्य केले.
समलैंगिकतेच्या संदर्भात हेदेखील वास्तव आहे की आपला नैसर्गिक कल नीट समजण्याआधीच काही कारणांमुळे अनेकांच्या लैंगिक जाणीवांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. त्यात समवयीन लोकांच्या सवयी,माध्यमांमधून दाखवलेल्या अतिरंजित गोष्टी, यौनशोषणासारख्या अपप्रवृत्तीचा लहान वयात आलेला अनुभव असे अनेक घटक असू शकतात. गोंधळलेल्या अशा तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शनातून आपल्या लैंगिक गरजांची ओळख करून घेता येऊ शकते. म्हणजे त्यांना दुहेरी लैंगीकता स्वीकारण्याची गरज उरणार नाही. त्यातून जर ते खरोखरच समलिंगी आहेत हे लक्षात आले तर संपूर्ण कुटुंबाचे या प्रश्नावर गंभीरपणे वैचारिक मंथन गरजेचे आहे. कारण त्यावर भलतेच उपाय केले गेले तर होणारे दुष्परिणाम फक्त त्या एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर होऊ शकतात. शिवाय बळजबरीने त्यांचे इतर कोणाशी लग्न लावून देणे म्हणजे तर ते अनेक संभाव्य संकटाना आमंत्रण असते.
समलिंगीसंबंधाना कायद्याची मान्यता असली तरी तशी समाजाची संपूर्ण मान्यता अजूनही नाही. म्हणून यासंदर्भात निर्माण झालेले पेच शिक्षण,समजूतदारपणा आणि सहकाराच्या मार्गे विवेकाच्या प्रकाशात सोडवायला हवेत. भिन्नता स्वीकारात जशी आहे तशी नकारातसुद्धा आहेच. ज्यांच्या लोकांपासून,घरांपासून हा मार्ग दूर आहे त्यांनी या मार्गाचा संपूर्णपणे निषेध करण्याची एकांगी भूमिका घेण्याचीही गरज नाही.
समलिंगी लोकांनीही आपली लैंगिक गरज नीट समजून घेऊन, आपल्या भूमिका आग्रही,आक्रमकपणे न मांडता ही गोष्ट खाजगी,संपूर्णपणे वैयक्तिक आहे हे लक्षात घेतले तर कदाचित संघर्षाशिवाय त्यांच्या  वेगळेपणाचा स्वीकार करणे इतरांना शक्य होईल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
समाज म्हणून जगण्याच्या अशा वेगळ्या वाटांच्या शक्यता असू शकतात, हे आता आपल्याही लक्षात येत आहे. आपल्या आजूबाजूला असलेली नवीन पिढी अनेक पातळ्यांवर बदलणारे वास्तव जगते आहे, जशी शुभदाची नीरा जगाच्या पातळीवर आपली स्वतंत्र ओळख रुजवते आहे. हा होणारा बदल फक्त त्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे असा समंजस विचार करणे हा आपल्याही प्रगल्भ होण्याचा प्रवास आहे.            
© डॉ अंजली औटी
  
(महारष्ट्र टाइम्स, 'मैफल पुरवणी")






  






                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा