शनिवार, २१ मार्च, २०२०

पैशाची जादू...





"सोड ना, तुला कधीच कळणार नाही" अचानक तो म्हणाला आणि त्या दोघांनी विषय बदलला. मैत्रिणीच्या नवीन जॉबबद्दल बोलत होते दोघं. कधीकधी भाषा,बोलणं,आवाज,टोन सगळं योग्य असूनही संवाद अशक्य होतो,जणू त्यासाठी ऐकणाऱ्याचे कान बंदच झालेले असतात.
"मस्तपैकी रोज नवीन हॉटेल्स, फूडजॉइन्ट्समध्ये जायचं, पदार्थ टेस्ट करायचे आणि त्यावर रिव्ह्यू देणारा व्हिडीओ शूट करून कंपनीमार्फत तो यूट्यूबवर अपलोड करायचा" यावर दुसऱ्याचं म्हणणं होतं, "पण यात पैसे कितीसे मिळणार? इतकं शिकल्यावर हा कसला जॉब?"
"अरे पण ती किती एन्जॉय करतेय"
"माझ्यामते टाईमपास आहे नुसता, पैसे कमवायचे दिवस वाया कशीकाय घालवतेय?"
"अरे,शेवटी पैसे कशासाठी मिळवायचे? काम करण्यातला आनंद महत्त्वाचा की पैसे?"
दुसऱ्याला मात्र त्याचं बोलणं पटत नव्हतं, शेवटी विषय थांबला.
पैसे कमावणं महत्त्वाचंच पण त्याशिवायही पहिल्यासाठी जगण्याचा केंद्रबिंदू आनंद,समाधान. तर दुसऱ्यासाठी केंद्रबिंदूच पैसा, आर्थिक समृद्धी. मग आनंद आपोआपच मिळतो.
यातल्या कोणाचं बरोबर? हा प्रश्नच इथे गैरलागू. कारण दोघेही आपापल्या दृष्टीने बरोबर. दोघेही आपापल्या भूमिकांमधून एकाच परिस्थितीचा विचार करतायेत. आयुष्यातली आपली निवड करतायेत.

यात समस्या तेव्हा तयार होते ज्यावेळी स्वतःला किंवा दुसऱ्याला आपली निवड त्रासदायक व्हायला लागते. अर्णवला पैसे चोरायची सवय लागली होती. मागितले तर घरातून त्याला मिळणार होते, मग तो चोरतो का? काही मानसिक आजार तर नाही ना याची खात्री करून झाली. असे काहीही नव्हते,मग काय कारण, ते शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. लक्षात आले की त्याच्यासाठी ते केवळ एक थ्रील होते! न मागता मिळणाऱ्या गोष्टींनी त्याला आयुष्य मिळमिळीत वाटत होते. मग कधीतरी गंमत म्हणून केलेली गोष्टच नंतर सवयीत बदलली. पैशांपेक्षाही ते मिळवण्याचा मार्ग मनाला झिंग देई. म्हणून दरवेळी मोठे धाडस. हे दुष्टचक्र त्याला कुठल्या दिशेने नेत होतं त्याला समजतही नव्हतं.
मनोहरकडे वडिलोपार्जित श्रीमंती. तिचा गर्व वागण्या-बोलण्यात. त्यापुढे सगळं तुच्छ. पैसे फेकले की वाट्टेल ते मिळतं या विश्वासावर जगत राहिले आणि जवळच्या नात्यांचा वेळोवेळी अपमान,पाणउतारा करत गेले. जवळची लोकंही आपोआप पांगली. अंगात रग होती तोपर्यंत ऐश केली पण हातपाय थकत गेले तसं एकटेपण आलं. शेवटीशेवटी तर विस्मृतीची व्याधी जडली आणि स्वतःची ओळखही विसरले. आपल्याकडे किती पैसे,कुठे ठेवले आहेत कशाचाच पत्ता नाही. एकट्यानेच मरण आलं तेही आजूबाजूच्या लोकांना आठ दिवसांनी समजलं. जवळ पैसे तर उरले पण माणसं?

आपला मुलगा अत्यंत आक्रमक,उद्धट आहे,घरीदारी भांडणं,मारामाऱ्या करतो म्हणून त्याला घेऊन आलेल्या तरुणाचे वडील सांगत होते, “आजवर मी त्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही. चांगल्या इंग्रजी शाळेतील शिक्षण, मॅनेजमेंट कोट्यातून इंजिनिअरिंगची अॅडमिशन. मोटारसायकल,पॉकेटमनी. मी एकवेळ कर्ज काढेन,शेती विकेल पण मला वाटतं “मी जशा अभावात जगलो तसं आयुष्य माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये” ही वडिलांची प्रेमाची भाषा. आपल्याला न मिळालेलं मुलाला मिळावे. पण त्यांना अपेक्षित ते न घडता मुलागा वेगळेच वागतोय, कारण त्याला खात्री आहे, आपण कसेही वागलो तरी पैशाने आपल्याला सांभाळून घेणारे वडील खंबीर आहेत. त्यांचे काबाडकष्ट,तडजोडी याकडे दुर्लक्ष करून तो स्वतःचा आनंद शोधतोय. त्यांची ‘समस्या’ त्यांच्या  ‘विचारांमध्ये’ तर नाही?
                                           


वर उल्लेखलेल्या सगळ्यांची कौटुंबिक,सामाजिक परिस्थिती वेगवेगळी आहे. वय,विचारसरणी आणि निर्णयप्रक्रिया वेगवेगळी आहे. पण संघर्ष तोच आहे, पैशांमधून मिळणारा आनंद? की त्यापलीकडे असलेला आनंद? कोणत्या दिशेने शोध घ्यायचा,याचा निर्णय प्रत्येकाचा वेगळा. कुटुंबासहित आनंदाने जगण्यासाठी लागणारं पैसा हे एक साधन आहे आणि आयुष्याचे साध्य असलेला खरा ‘आनंद’ उपभोगायला काहीच लागत नाही, हे समजण्यासाठी आधी आपल्याला जाणीवेने जगणं तर शक्य आहे?
एकदा पालकत्त्वावरच्या एका कार्यशाळेत कुटुंब, एकमेकांमधली नाती या मुद्द्यावर चर्चा सुरू असतांना "माणूस म्हणून आपल्या जगण्याचा आधार काय असतो? तुम्हाला काय वाटतं?"
या प्रश्नाला अनेकांनी ‘पैसे’किंवा ‘आर्थिक स्थैर्य’असं उत्तर दिलं. आजच्या  काळाचा विचार केला तर मला हे प्रातिनिधिक वाटतं. पैसे हे केवळ आपण स्वयंपूर्ण असण्याशीच निगडित नाहीत तर समाजात आत्मविश्वासाने जगण्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे सर्वमान्य आहे पण जगण्याचा आधार तोच एकमेव वाटावा इतपत?  माणूस म्हणून आपल्या एकमेकांशी असलेल्या नात्यात याचं स्थान कुठे आहे? जवळच्या नात्यांवरदेखील या दृष्टिकोनाचा प्रभाव असावा इतकं प्रभावी ते आहे का? नात्यांमध्ये एकमेकांबद्दल जाणवणारी भावना सगळ्यात प्रभावी असते की व्यवहार?
आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातून काय पोहोचतंय आपल्याला? आपण काय घेतो? अजून संस्कारक्षम असलेली आपली मुलं काय घेत आहेत? सजग, सावध असायला नको?
आजूबाजूला असलेल्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे इतरांचे वागणे, बोलणे, सवयींमधल्या वेगळ्या गोष्टीं, विरोधाभास याकडे मुलांचं कुतूहल वळतं. येणाऱ्या कोणत्याही अनुभवाचा अर्थ त्यावेळी जरी पूर्णपणे समजला नाही तरी त्या अनुभवात जाणवणारी भावना मुलांच्या मनात घर करते, त्यातून त्यांची स्वतःची, इतरांबद्दलची समज,वेगवेगळ्या धारणा तयार व्हायला लागतात.
आजूबाजूला असलेल्या लोकांचं एकमेकांशी, पैशांशी असलेलं नातं विश्वासाचं आहे की अभावाचं आहे,असुरक्षिततेचं आहे की भीतीचं आहे, तिरस्काराचं आहे की उदासीनतेचं आहे यातून त्यांचाही पैशांकडे बघण्याचा दृष्टीकोन घडत जातो. ही एक चौकट असते,अनुभवांनी दृढ होत जाणारी. विचार,भावना आणि वागण्यावर प्रभाव टाकणारी. निर्णयप्रक्रियेला आकार देणारी. याच टप्प्यावर कधीतरी पैशांशी प्रत्यक्ष पहिली ओळख होते.आईच्या कडेवर बसलेल्या लहान मुलांच्या हातात पाहुण्यांनी पैसे दिले तर तुम्ही कधी बघितलंय त्यांनी ते फाडून टाकले आहेत? ते महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या डोळ्यातली चमकच सांगते. पैसे जमा करणं,मोजणं आणि मन:पूर्वक जपणं यातून त्याचंही पैशांशी नातं जुळायला सुरवात होते. घरात पुरेसे पैसे असतील आणि नसतील तर त्यातून येणारे अनुभव त्यांना शिकवत जातात. पैसे वापरून आनंद मिळतो, अनेक गोष्टी सोप्या होतात यातून पैशांची सांगड आनंदाशी,सुखाशी आहे यासारखे समज तयार व्हायला लागतात. कुटुंबातल्या वातावरणातून मिळालेली मूल एकतर स्वीकारणार किंवा नाकारणार. जास्तीतजास्त पैसा मिळवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे हे जसे एखाद्याच्या मनावर बिंबते तशी त्याबाबतीतली तटस्थता,उदासीनताही मनात रुजू शकते.
मोठ्यांच्या वागण्याच्या प्रकाशात मूल स्वतःच्या मनाशी नकळत अंदाज,आडाखे बांधत जाते. कुटुंबाचा उंबरठा ओलांडून मुलं ज्यावेळी परिसराशी आणि समाजाशी जोडली जातात त्यावेळी हा परीघ आपोआप विस्तारत जातो कारण जवळ भरपूर पैसा असूनही गरजेसाठीसुद्धा खर्च करायला राजी नसलेली माणसे आजूबाजूला असतात  तशी जवळ पैसे नसतांनाही कर्ज काढून मौजमजा करणारेही अनेक असतात. स्वतःकडे जे असेल ते  मन:पूर्वक देऊन दुसऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे लोक असतात तर केवळ स्वतःपुरतं बघणारेही असतात. श्रीमंतीचे प्रदर्शन करणारीही, सगळं असूनही माझ्याकडे काहीही नाही,दाखवणारी, एकमेकांना फसवणारी, हिसकावून घेणारी,उधळी,काटकसरी, कद्रू,कंजूस, हिशेबी,व्यवहारी,दानशूर अशा अनेक शब्दांनी ज्यांचे वर्णन केले जाते अशी सगळी माणसे आपल्या आजूबाजूला असतात. भावना बाजूला ठेऊन निर्ममपणे व्यवहार बघणारी, आई-वडिलांना निराधार सोडून पैशांअभावी हाल सोसायला लावणारी, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती विचारांची माणसे असतात. विचारांच्यामागे असलेल्या त्यांच्या मनातल्या धारणा त्यांना विशिष्ट भूमिका घ्यायला भाग पडतात. एकमेकांशी असलेल्या संबंधांवर प्रभाव असलेला घटक आहे पैसा. एकमेकांमधला ‘विश्वास’ आणि ‘प्रेम’ठरवणारा घटक आहे ‘पैसा’.
केवळ योग्य, अयोग्य या साच्यात न बसवता आपलं त्याच्याशी जोडलं गेलेलं नातं शोधायला हवं. कारण पैसा तटस्थ आहे, त्याचे मूल्य आपल्या ठरवण्यावर अवलंबून आहे. त्याआधी माझं इतरांशी आणि खुद्द माझ्याशीही असलेलं नातं काय आहे, हेदेखील त्या प्रकाशात तपासून बघायला हवंय. शोधायचंय? मग छातीवर हात ठेऊन सांगा, गूगलपे वरून १० रुपये कॅशबॅक आली की खुश व्हायला होतं? आणि ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ आल्यावरहसू नका, फक्त सांगा आपण त्याच्या ताब्यात आहोत? की तो आपल्यापैसा आपली पकड घेतो,जगण्याची दिशा ठरवतो की आपले जगणे सुसह्य व्हावे यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे आपण तो वापरू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरात आहे तुमच्या मनातलं खरं उत्तर. 
कारण सगळ्यात शेवटी हेच खरंय की आपण पैशांसाठी नाही तर पैसा आपल्यासाठी आहे. पैशांबरोबरच्या व्यवहारातून माणसाचं मन दिसतं. पारदर्शक, स्वच्छ, आर्थिक, मानसिक, वैचारिक  व्यवहार असलेल्या माणसांचे जगणेदेखील तसेच असल्याची उदाहरणे आपण आजूबाजूला अनुभवतो. विवेकी विचारांनी श्रीमंत असलेली कुटुंबे आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटकाचा योग्यविचार आणि संतुलित विनियोग करून स्वतःचे आणि इतरांचेही आयुष्य सुंदर,आनंदी बनवू शकतात.
आपल्यालाही बघायला हवे, आयुष्य सहज, सुंदर करणारी ही जादू आपल्याला जमलीये का ते?

© डॉ अंजली औटी

   (फोटो आंतरजालावरून साभार )




( मन:पूर्वक आभार दै. महाराष्ट्र टाइम्स "मैफल पुरवणी")










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा