शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

फिरुनी नवी जन्मेन मी!


शौनक डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्ये एका बाजूला, कोपऱ्यात बसलेल्या त्याच्याकडे आजूबाजूने अखंड वाहणाऱ्या गर्दीचं अजिबात लक्ष नव्हतं. थंडीचे दिवस आणि खालची थंडगार फरशी. त्याला फक्त इतकं समजलं होतं की थोड्यावेळात ती अॅम्ब्युलन्स येणार. त्याच्या आईला बसवलं जाणारं हार्ट कदाचित त्यातून येईल.. उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या गेटमधून कोणालाच आत सोडत नव्हते. मान वाकडी करून कळ लागली.
गेल्या महिनाभर त्याचं इवलंसं मन हवालदिल झालं होतं. आई हॉस्पिटलमध्ये. ती आपल्याला सोडून निघून तर जाणार नाही ना, या विचारांनी त्याला झोप पण नीट लागत नसे. देव असलाच तर त्याने ऐकायला पाहिजे म्हणून तो सतत एक प्रार्थना म्हणे..आईनेच शिकवली होती त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी त्याने मामाला विचारलं होतं की आईला झालंय काय? त्यावेळी त्याने सगळं सांगितलं त्याला. जितकं समजेल तितकं त्याने लक्षात ठेवलं होतं. जीवाचा कान करून ऐकलेल्या मोठ्यांच्या गप्पांमधून ‘आईचं मोठं ऑपरेशन झाल्यावर ती मग कायमची बरी होणार आहे हे वाक्य ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. कोणी आईला भेटू देत नव्हते त्याला. आपली कोणाला अडचण होऊ नये असा तो एका कोपऱ्यात गुपचूप बसून रहात असे. त्याला तिथे थांबायला कोणी अडवू नये याची काळजी कशी घ्यायची हे त्याने लवकरच शिकून घेतले होते.
अॅम्ब्युलन्स आली. लोकांच्या गर्दीत त्याला काहीही दिसलं नाही. थोड्यावेळाने ती निघून गेली तरी शौनक जागचा हलला नाही. सकाळपासून त्याने काहीही खाल्लेले नव्हते. भूक लागली होती पण आता त्याला कशाचीच पर्वा वाटत नव्हती. रात्रीपर्यंत थांबून मामा त्याला घरी सोडायला निघाला. “आईचं ऑपरेशन नीट झालं,लवकरच तुला तिला लांबून बघता येईल” मामा म्हणाला पण जोपर्यंत तिला बघत नाही तोपर्यंत शौनकचा विश्वास कोणाच्याच सांगण्यावर बसणार नव्हता. “मामा,आईला दुसऱ्या कोणाचं तरी हार्ट बसवलं, मग तिचं कुठे गेलं?”
“तिचं काढून तर दुसरं बसवलं” तरीही त्याच्या मनात अनंत प्रश्न होते.
“मग आई मला विसरून तर जाणार नाही ना?” त्याने त्याला  सगळ्यात जास्त छळणारा प्रश्न विचारला..
“ नाही रे ते मेंदूचं काम असतं..!” मामा म्हणाला आणि शौनकला हायसं वाटलं. त्यावेळी असेल तो अकरा-बारा वर्षांचा.
आज एखाद्या पिक्चरसारखं त्याला सगळं आठवलं. काळानं जणू आपलं एक आवर्तन पूर्ण केलं होतं. आजही तो पुन्हा तशाच एका भव्य हॉस्पिटलच्या आवारात होता. पोटात तीच कालवाकालव होत होती. मनात असंख्य प्रश्न होते पण यावेळी निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर आली होती. सगळ्यांच्या नजर त्याच्यावर होत्या आणि त्याच्या नजरेसमोर मात्र जसाच्या तसा होता भूतकाळात त्याने अनुभवलेला तो प्रसंग...
आज अनुभव परिपक्व आहेत. मन महत्वाच्या,सूक्ष्म गोष्टींचा अंदाज लावू शकते आहे,पण भावना सांभाळणं मात्र आजही तितकंच कठीण झालं आहे. कारण..कारण आज माझी मृणा..,माझ्या काळजाचा तुकडा त्या जागेवर आहे.  मिटलेल्या डोळ्यांसमोर सारखी तिची हसरी,खेळकर मूर्ती येते आहे. तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये चैतन्याचं,आनंदाचं कारंजं उसळत असायचं कायम. प्रत्येक गोष्टीत तिचा उत्साह नुसता उतू जायचा.. बोलका स्वभाव,त्यामुळे घरी-दारी सगळीकडेच लाडकी, हवीहवीशी असलेली मृणा.
पण त्या काळाकुट्ट दिवशी सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं..  मागून येणाऱ्या ट्रकने तिच्या गाडीला जोरात धडक दिली. मृण्मयी इतक्या जोरात फेकली गेली ती खाली जमिनीवर पडली ते शुद्ध हरपूनच. कोणीतरी ताबडतोब तिला हॉस्पिटलला नेले..आम्हाला फोन आला.. आम्ही जीवाच्या आकांताने धावलो. त्या ट्रकवाल्याला लोकांनी थांबवले होते आणि भरपूर चोप दिला होता..त्याला म्हणे ही रस्त्यात दिसलीच नव्हती..आता काय आणि कसे याला काही अर्थ उरला नव्हता..पुढे काय इतकेच फक्त महत्वाचे उरले होते.
अठरा तास झाले आमचं बाळ मृत्यूशी झुंज देते होते. अजूनही शुद्ध नव्हती.
नातेवाईक,मित्र धावत आले. मृण्मयीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झालेला. संकेत बेंगलोरला एका सेमिनारसाठी गेलेला होता. लगेचच्या फ्लाईटने तो पुण्यात पोहोचला. मृण्मयीला अशा अवस्थेत बघून त्याला स्वतःला सावरणे जमेना..नेमके काय झालेय..तिला कुठे लागले आहे याचे काही रिपोर्ट येणे अजून बाकी होते. शरीरावर अनेक ठिकाणी लागल्याचे दिसत होते.. हाताचे,पायाचे हाड फ्रॅक्चर झालेले होते. बघवत नव्हते काहीच..मन एक क्षण देखील शांत नव्हते..
अनेक तपासण्या केल्या गेल्या. एकमेकांना धीर देत, अस्वस्थ मनस्थितीत सगळ्यांचे डोळे फक्त रिपोर्टकडे लागलेले होते. जीव मृण्मयीकडे एकवटला होता....
आणि अखेर डॉक्टरांनी सांगितले की मृण्मयी जवळजवळ या जगातून गेलेलीच आहे...सपोर्ट सिस्टीम काढून घेतली तर तिला तिचा स्वतंत्र श्वास घेणे शक्य होणार नाही आणि सगळे संपेल..
ते काय सांगतायेत हे शब्द फक्त डोक्यात शिरत होते पण ते समजत नव्हते कोणालाच..एक शून्य अवस्था...नि:शब्द..बधीर  जीवघेणी अस्वस्थता..एकमेकांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते इतकी शांतता. माझ्या पायातलं त्राण निघून गेलं..सगळं संपलं होतं..एक हसतं-खेळतं अस्तित्व..जगणं सुरु होण्याआधीच..संपून गेलं.आता पुढचा निर्णय घ्यायचा होता..आणि तो होता चालू असलेली सगळी ट्रीटमेंट थांबवण्याचा.
मृण्मयीच्या शरीरातले सगळे महत्वाचे बाकी अवयव शाबूत होते..त्यांना कुठेही काहीही धक्का बसलेला नव्हता..तरुण वय आणि ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट..तिचे जास्तीतजास्त अवयव दुसऱ्या कोणा गरजू व्यक्तीच्या उपयोगात येऊ शकतील..त्यांना जीवनदान मिळू शकेल..
एकदा कॉलेजमध्ये ‘मरणोत्तर देहदान’ विषयावर एक वादविवाद स्पर्धा होती..त्यावेळी आजीचा अनुभव शौनकने तिला सांगितला होता. आपण सगळेच हा फॉर्म नक्की भरू,असे मृण्मयी म्हणाली सुद्धा होती..अजून काही दिवसातच या गोष्टीवर खरोखरच विचार करावा लागणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.
नियतीचे संकेत कोणाला कधी कळले नाही तरी सूत्रबद्ध असावेत कदाचित.
डॉक्टरांनी आणखी माहिती देऊन लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी अशाच कोणीतरी घेतलेल्या निर्णयामुळे माझी आई मला परत मिळाली होती. पुढे आई तिचे संपूर्ण आयुष्य आनंदात, निरोगी जगली.
त्या आनंदाच्या, कृतार्थतेच्या, समाधानाच्या क्षणांचे दान कोणा गरजू व्यक्तींच्या ओंजळीत घालण्याची वेळ आली होती. माझ्या मृणाच्या इच्छेचा आदर वाटला मला. हात थरथरत होते, डोळ्यांना अक्षरं दिसत नव्हती तरीही मी नेटाने सही केली.



हॉस्पिटलमधून परत घरी येतांना पावलं जड झालेली होती..कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सगळं संपल्याची एक हताश जाणीव सरसरत मेंदूपर्यंत गेली..त्याचवेळी  मृणाचा हसरा चेहरा नजरेसमोर फ्लॅश झाला. स्व:ताला सावरले, सावरणे भाग होते.
दु:ख खूप मोठे आहे पण हवालदिल व्हायला नको. माझी लेक जवळच्या, ओळखीच्या, सगळ्यांसाठी एक आदर्श घालून गेली आहे. त्या तिच्या भावनांचा सन्मान मला करायला हवा. मला खात्री होती माझी मृणा अत्यंत समाधानाने पुढच्या प्रवासाला गेली आहे.
आज कोणाच्यातरी शरीरात तिच्या हृदयाने चैतन्याची फुंकर घातली असेल, कोणाच्यातरी डोळ्यांना तिच्यामुळे दृष्टीचे अनोखे सुख मिळेल, कोणाच्यातरी कानांना सृष्टीचे, अगम्य बोल ऐकू येऊ शकतील, कोणाची तरी त्वचा सुखाच्या संवेदनांनी झंकारून उठेल, कोणाचेतरी श्वास पुन्हा सुरु झाले असतील आणि परमेश्वराला अखंड साकडे घातलेल्या कोणा चिमण्या जीवाच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे हसू असेल..त्याला सुरक्षित वाटत असेल. नाती,आयुष्य परिपूर्ण झाली असतील. जीवनाचा आनंददायी स्पर्श सगळ्यांना सुखावत असेल.
माझ्या मृणाच्या शरीराचा प्रत्येक कण कोणाच्यातरी उपयोगात आला असेल.. दुर्दैवाने तिला स्वतःचं आयुष्य नाही पूर्ण करता आलं पण  तिच्या शरीराने ही अपूर्णता किती पटीने भरून काढली. किती जगलो, ही आयुष्याची लांबी महत्वाची नसतेच मुळी.
माझी ओंजळ रिकामी नाही..रात्र जरूर आहे, पण काळीकुट्ट घाबरवणारी मुळीच नाही. कारण कृतार्थ समाधानाचे लखलखते चांदणे आज आमच्या सोबतीला आहे. आणि स्वयंप्रकाशाच्या तेजाने उजळून निघालेली माझी मृणा आज त्या उंचीवर आहे.
या लखलखीत भावनेचा स्पर्श झालेल्या शौनकने आज आपलं आयुष्य ‘मरणोत्तर देहदान’ या विषयाच्या जागृतीसाठी समर्पित केलं आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामागे त्याच्या आयुष्याचा अनुभव आहे. ऐकणाऱ्याच्या हृदयात दृढ निश्चयाची एक आश्वासक ज्योत प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य त्यात नक्की आहे.
आयुष्यात वेळ,काळ,परिस्थिती कोणालाही सांगून येत नाही. ती कोणावर कधीही, कोणत्याही रुपात येऊ शकते.
माणुसकीच्या या सद्भावनेचा आपण सगळेच सन्मान करूया..आज मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करूया!

© डॉ. अंजली/अनन्या औटी.
mindmatteraa@gmail.com

(फोटो सौजन्य: गुगल)

     




  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा