रविवार, १६ जून, २०२४

'नीट'नेटक्याचेच वावडे



समाजातल्या एखाद्या प्रश्नाची थेट झळ बसत नाही तोपर्यंत अनेकांची भूमिका फक्त बघ्याची असते. त्यामध्ये आपले किंवा जवळच्या कोणाचे अहित असेल तर मात्र त्या प्रश्नाची तीव्रता जोरदार जाणवते. यावर्षी  'नीट' या मेडिकल प्रवेशपरीक्षेच्या निकालातल्या गोंधळाने  विद्यार्थी,पालक वर्गात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही भारतातील प्रथितयश संस्था संपूर्ण भारतातील विविध शाखांच्या, उच्चशिक्षणिक संस्थांच्या, प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रवेशपरीक्षा दरवर्षी घेते. 

या परिक्षेच्या निकालावर देशातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असते. 

अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर निकषांवर NTA चे काम चालते तरीही दरवर्षी या परीक्षा, त्यांचे निकाल यावरून NTA वर एखाद-दुसरी कोर्टकेस दाखल होतेच. पण त्याशिवाय इतर बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारताच्या विविध कॉलेजातील प्रवेशाचे मार्ग सुकर झालेले असतात. 

यावर्षी 'नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट' 'नीट' परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा परिणाम या परीक्षेला बसलेल्या 24 लाख 

विद्यार्थ्यांवर झाला. 

या निकालात एक नाही तर अनेक गोंधळ आहेत. इतकी मोठी सरकारी यंत्रणा पण इतक्या चुका? नेमके कोणाचे काय इंटरेस्ट्स आहेत यात? ज्यांच्या आयुष्याची सुरवात आहे त्या निष्पाप जीवांच्या करिअरशी असा खेळ? आयुष्यभरासाठी काय मूल्य घ्यायचं विद्यार्थ्यांनी यातून ? 

जे घडलं त्यामागच्या अज्ञात कारणांचा शोध सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न आणि अस्वस्थता निर्माण करणारा आहे.


जे घडलं त्यातून समोर आलेलं तथ्य असं-


1) एकूण 720 मार्कंची निगेटिव्ह मार्किंग पद्धती असलेली ही परीक्षापद्धती असते. त्यात पूर्ण 720 पैकी 720 मार्क मिळाले असे विद्यार्थी याआधीच्या इतिहासात दरवर्षी अगदीच एखाद दुसराच असतो.

परंतु यावर्षी एकूण 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स आहेत आणि विशेष म्हणजे ते एकाच सेंटरचे आहेत.


2 )विद्यार्थी आणि पालकांनी घेतलेल्या आक्षेपाला NTA ने ज्या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा मिळाला त्यांना ग्रेस मार्क्स दिले असल्यामुळे असे घडले हे स्पष्टीकरण दिले. विशिष्ट परिस्थितीत ग्रेस मार्क देण्याचा असा कोणताच नियम NTA नियमावलीमध्ये नाही. याआधी असे मार्क्स कोणालाही देण्यात आलेले नाहीत.


3 ) Negative Marking पद्धतीमुळे 718 किंवा 719 असे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळण्याची अजिबात शक्यता नसते. परंतु यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना तसे मार्क्स आहेत. ते बघूनच या प्रकाराकडे लक्ष वेधले.


4) परिक्षेतल्या एका प्रश्नाचे उत्तर जुन्या आणि नवीन NCERT नुसार वेगवेगळे होते आणि हे दोन्ही option उत्तरात असल्यामुळे (हे याआधी या परीक्षेत कधीही घडलेले नव्हते)

ज्यांनी यापैकी एक पर्याय निवडला त्यांना म्हणजे एकूण 44 मुलांना 4 मार्क्स extra मिळाले. 

NTA ने जाहीर केलेली अपेक्षित उत्तरांच्या  OMR sheets मध्ये याचा उल्लेख नव्हता. प्रत्यक्ष मार्कलिस्ट, मेरिटलिस्टमध्ये मात्र थेट असा बदल केला गेला.


5) कोणतीही पूर्वकल्पना नसतांना रिझल्ट 10 दिवस आधी आणि नेमक्या देशातील निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच अचानक जाहीर झाला.


6) एकसारखे मार्क्स असलेल्या मुलांची रँक ठरवताना ज्या मुलांनी परीक्षेचा फॉर्म आधी भरला त्या मुलांची रँक आधी असा नवीनच फॉर्म्युला NTA ने यावर्षी वापरला, जो उघडउघड प्रश्न निर्माण करणारा आहे.


7) दरवर्षी  नीट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी दोन महिन्यांची ठराविक मुदत असते. ह्यावर्षी पहिल्यांदा त्यानंतर अजून दीड महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या साधारण चार लाखांनी वाढली.


8) परीक्षा झाल्यावर काही सेंटर्सना पेपर फुटल्याचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांनी दाखवले. 

एकूणच हा सगळा घडलेला प्रकार अत्यंत संदिग्ध आहे. 650 च्या वर मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या रँक 35 ते 40 हजारांच्यावर गेल्या आहेत. वर्षानुवर्षे इतकी मेहनत करून ज्या ध्येयाचे स्वप्न बघितले ते ध्येय मिळेलच याची खात्री आज मुलांना नाही. आर्थिकदृष्ट्या प्रायव्हेट कॉलेजेसची फी न परवडणाऱ्या मुलांचा जीव काळजीने दडपून गेलाय.

विद्यार्थ्यांच्या सात्विक संतापाला, हतबलतेला, निराशेला अनाठायी कसं म्हणायचं? त्यांच्या मनातल्या अनिश्चिततेला, प्रश्नांना काय उत्तरं आहेत? त्यात एका मुलीने या कारणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी आली. या मृत्यूला जबाबदार कोण?

या जगभरात नावाजलेल्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अखिल भारतीय संस्था-कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी अगदी आठवीपासून तयारी,मेहनत करत असतात. 

परीक्षेतल्या विषयांच्या सखोल तयारीसाठी लागणारे सातत्य,कष्ट यातून त्यांच्या ज्ञानाचा आवाका वाढत असतो. अकरावी,बारावी या महत्त्वाच्या वर्षात विषयांबरोबरच या प्रवेशपरीक्षेचे तंत्र समजून घेणेही महत्त्वाचे असते. कारण त्यांचा अभ्यास आणि ज्ञान यांची कसोटी या परीक्षेतील प्रश्नांद्वारे ठरून त्यांना हव्या असलेल्या जगाचे दार उघडणार असते. 

परीक्षेतल्या प्रश्नांच्या उत्तराचे दिलेले चारीही पर्याय उत्तराच्या जवळ जाणारेच भासतात. पण विद्यार्थ्यांची विषयाची समज जितकी परिपक्व तितकी विद्यार्थी अचूक पर्याय कमीत कमी वेळेत निवडण्याची शक्यता जास्त. वेळ आणि ज्ञान यांची जुगलबंदी असते. असे कौशल्य आत्मसात करण्यासाठीदेखील अखंड सराव लागतो. 

भारतीय शिक्षणपद्धतीतून बाहेर पडलेले असे गुणवंत आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून ज्ञान-विज्ञानाच्या नवनवीन क्षितिजांचा वेध घेत आहेत. तरीही अनेकदा या प्रवेशपरीक्षांच्या बहूपर्यायी स्वरूपावर टीका केली जाते. या परीक्षा म्हणजे केवळ ठराविक मार्गाने यश मिळवण्याचे तांत्रिक कौशल्य अशी हेटाळणीही होते. असा समज व्हायला खरेतर अनियंत्रित फोफावलेले खाजगी शैक्षणिक कारखाने आणि पालकांच्या आपल्या पाल्यांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहेत. कारण सगळ्याच मुलांची आवड,कल, इतके कष्ट करण्याची तयारी, इच्छा,असेलच असे नाही. बहुसंख्य मुलं अकरावी,बारावी या दोन वर्षात या परीक्षेची तयारी करतात तेव्हा ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही पातळ्यांवर आपले 100 टक्के देण्यात त्यांची दमछाक होणे स्वाभाविक आहे. तयारीसाठी लागणारा पूर्ण वेळ आणि योग्य रिसोर्सेस त्यांना उपलब्ध असतीलच असे नाही. यात विद्यार्थ्यांचा दोष नसतो. विद्यार्थ्यांना आपापल्या तयारीप्रमाणे यश मिळते. 

पण कोणासाठीच हा प्रवास अजिबात सोपा नाही. 

अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी हजारो खाजगी कॉलेजेस,संस्थाही भारतात आहेत.

सहज लक्षात येईल की प्रचंड अर्थकारण आणि राजकीय इच्छाशक्ती यांचा मिलाफ असलेले हे क्षेत्र आहे. अनेकांचे संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर हितसंबंध गुंतलेले असतात. गुणवंतांचे भविष्य ठरवणाऱ्या अशा परीक्षापद्धती वेठीला धरून कोणाचे व्यक्तिगत स्वार्थ पुरवले जात असतील, संपूर्ण व्यवस्था आपल्या सोयीप्रमाणे वाकवली किंवा बदलवली जात असेल तर तो दोष आपल्याच समाजातल्या काही आपमतलबी वृत्तींचा नाही का?

शेवटी सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ती आपल्याच देशाचे भविष्य असलेली पुढची तरुण पिढी, म्हणजेच लाखो विद्यार्थी.

NTA सारख्या मोठ्या सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता नसावी यात विद्यार्थ्यांचा काय दोष? 

कोणतीही संस्था म्हणजे शेवटी काय असते? प्रक्रिया राबवणारी माणसेच ना? 

प्रत्यक्ष संबंध नसला तरी समाज म्हणून आपणही या घटनेचा निषेध करायलाच हवा कारण उद्याच्या संपूर्ण समाजाचे आरोग्य ज्यांच्यावर अवलंबून असणार आहे त्या भावी डॉक्टरांना आपण हे काय देतोय?

भविष्य ज्यावर अवलंबून आहे त्या सगळ्या व्यवस्था,संस्था ‘पारदर्शक’ असाव्यात ही मागणी अवास्तव नक्कीच नाही.

IIT/JEE दुहेरी स्तरातल्या

परीक्षांचे नियोजन  NTA दरवर्षी यशस्वीपणे करतेच. या परीक्षेपेक्षा मेडिकल नीट परीक्षेला तिप्पट संख्येने दरवर्षी विद्यार्थी बसतात. असे असूनही वैद्यकीय शाखांच्या प्रवेशांसाठी अशी एकमेव 'नीट' परीक्षा का?

IIT/JEE सारखी नीट परीक्षाही दुहेरी स्तरात घेतली तर अधिक सोपी प्रक्रिया होऊ शकणार नाही का?

पहिल्या स्तरात अलोपॅथी शिवाय इतर वैद्यकीय शाखांचे प्रवेश होऊ शकतील. 

आणि Advance Neet Exam या दुसऱ्या स्तरातील काठिण्य पातळीद्वारे अलोपॅथी कॉलेजेसचे प्रवेश होतील. यासारखेच इतरही अनेक पर्याय, बदल प्रक्रिया राबविणाऱ्या कोणाला सुचलेच नसतील असे कसे होईल?

पण वर्षानुवर्षे राबवत असलेल्या प्रक्रियेतल्या त्रुटी लक्षात आल्या किंवा अगदी कोर्टानेही लक्षात आणून दिल्या तरी प्रत्यक्षात बदल मात्र घडत नाही, कोर्टाच्या दुसऱ्याच केसमधल्या निकालातली एखादी सोयीची जागा पळवाट म्हणून मात्र अचूक निवडली जाते. प्रश्नांवर तात्पुरती उत्तरे शोधली जातात.

यावेळी गोंधळ मोठा झाला म्हणून गाजावाजाही झाला.

आता पुन्हा पळवाटा शोधल्या जातील, की यातून मार्ग निघेल 

माहीत नाही. पण जो निघेल त्यात विद्यार्थ्यांचा विचार आधी केला जावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा असे काही घडणार नाही याची खात्री त्यांना मिळावी.

लक्षात ठेवा, आपल्या जगण्यातून उद्याच्या भविष्यावर कोणता ठसा

उमटतो आहे त्यावरून

उद्याच्या इतिहासात आपलीही नोंद असेल. ती ‘विध्वंसक’ असेल की ‘विधायक’ काय असायला आवडेल आपल्याला?

(इंडियन मेडिकल असोसिएशन,नाशिकच्या सहकार्याने)

डॉ अंजली औटी

mindmatteraa@gmail.com