गुरुवार, ३० जुलै, २०१५

कबीर समजून घेताना...

कबीर, हिंदी संत साहित्यातील फार मोठे नाव.

साधी सरळ शब्दरचना. पटकन अर्थ समजेल,मनाला पटेल आणि थेट हृदयाला जाऊन भिडेल असे ओघवते शब्द..बोलीभाषेतले..लोकभाषेतले. 
संत कबिरांची कविता मध्ययुगीन हिंदी कवितेचा एक महान अविष्कार आहे.त्याकाळात आणि आजही जात, धर्म, प्रदेश, वर्ग या सीमारेषा सहज ओलांडून त्यांचे  शब्द भारतभर जाऊन पोहोचलेले आहेत आणि लोकांनी आपलेसे मानले आहेत. आजही त्यांच्या रचना आणि त्याद्वारे त्यांनी सांगितलेले विचार कालबाह्य झालेले 
नाहीत.

कबीराचा काळ आहे साधारणपणे विक्रम संवत १४५५ ते १५७५. भारतीय कवितेच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून मध्ययुगीन कालखंड. त्याआधीची कविता ही प्राचीन भारतीय कविता. ही उत्तर भारतातून आलेली कविता होती असे इतिहास सांगतो. मध्ययुगात मात्र भारतभर या कवितेची पाळेमुळे पसरलेली दिसून येतात. मध्ययुगीन भारतीय कविता हा प्राचीन भारतीय कवितेनंतरचा कवितेचा फार मोठा कालखंड. प्राचीन कवितेने भारतीय तत्वज्ञान सांगितले तर मध्ययुगीन भारतीय कविता ही संत कवींची भक्ती कविता होती. तिने तत्वज्ञानाचा अर्थ लोकांना लोकांच्या भाषेत समजावून सांगितला. 
भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमधून अनेक संतकवींनी काव्यनिर्मिती केली. हे कवी संत बहुजन समाजातून आले आणि त्यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करत आजवर पोथ्या पुराणात बंदिस्त असलेले ज्ञान लोकभाषेतून सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणातून कवितेतून मांडले. या रचना घराघरात जाऊन पोहोचल्या आणि देशभर एक व्यापक भक्ती चळवळच उभी राहिली. लोकभाषेतून व्यक्त होणारी ही लोककविता सर्वसामान्य माणसाला आपलीशी वाटली. लोकांशी संवाद साधून लोकांमध्ये फिरणारे आणि लोकांना सहजसाध्या सोप्या शब्दात ईश्वराचे रहस्य उलगडून सांगणारे हे संत लोकांना आपल्यातीलच एक वाटले. 
पोथ्यांमधून बंदिस्त असलेले आणि ठराविक वर्गाच्या मालकीचे ज्ञान तोपर्यंत सर्वसामान्यांपासून दूरच होते आणि निरर्थक कर्मकांडात समाज अडकून पडलेला होता. संतकवींनी धर्माचे हे जोखड बाजूला सारून धर्माचा नवा अर्थ समाजाला उलगडून दाखवला. आपले वागणे आणि आपले विचार यातून त्यांनी शुद्ध नैतिकतेचा आदर्श समाजापुढे उभा केला. त्यांच्यातील या पारदर्शक वृत्तीमुळेच त्यांची कविता आणि त्यातून त्यांनी केलेला उपदेश लोकांनी आपलासा केला. सत्य, अहिंसा आणि शांती याबरोबरच समतेचा आणि बंधुभावाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत मध्ययुगीन संतकवितेने भक्तीचळवळीचे व्यापक रूप घेतले. 

भारताच्या कानाकोपऱ्यात खोलवर रुजलेल्या आणि वाढलेल्या या कवितेचा एक समृद्ध वारसाच आपल्याला लाभलेला आहे. संत कवी बसवेश्वर, त्यांच्या समकालीन अक्कमहादेवी, सोळाव्या शतकातील पुरंदरदास,कनकदास, सिद्धेश्वर,संतकवी रामानंद, तुलसीदास,रोहिदास, कबीर, मीराबाई, सूरदास,ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,रामदास,जनाबाई यासारख्या अनेक संत कवींच्या रचनांनी पंजाबपासून केरळपर्यंत आणि राजस्थान पासून बंगालपर्यंत विविध प्रदेशांचे संस्कार होत विविध भाषांचे शब्द सामावून घेत भारतीय कविता विस्तारत गेली. हिंदी संतकविता,कन्नड संतकविता, सूफी संतकविता, मराठी संतकविता..अशा अनेक अंगांनी समृद्ध होत गेली.

अनोखा अंदाज,पारदर्शक ढंग आणि परखड अविष्कार त्यामुळे कबीराच्या कवितांचे योगदान संत कवितांमध्ये अनन्यसाधारण आहे. कबिरांच्या कविता हे केवळ त्यांचे काव्य नाही तर त्यांचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे. ईश्वर ही अनुभूतीची गोष्ट आहे. तो कोणत्याही पोथ्या-पुराणात बांधलेला नाही यावर त्यांचा विश्वास होता. ठराविक वर्गाची मक्तेदारी बनलेले कप्पेबंद आध्यात्मिक तत्वज्ञान माणसामाणसांत अनेक दृश्य-अदृश्य भिंती निर्माण करते हे त्यांनी बघितले.  
कबीराच्या जन्माविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात पण कबीर नीरु अली आणि नीमा या मुसलमान विणकर,जुलाहा जमातीच्या जोडप्याने लहानाचा मोठा केलेला मुलगा. आपल्या गुरुकडून त्यांना हिंदू धर्माची ओळख झाली. त्यांच्या कवितेवर हिंदू प्राचीन तत्व कवितेचा आणि इस्लामी परंपरेतील सूफी कवितेचा प्रभाव जाणवतो. त्या काळातील समाज हिंदू धर्मातील कर्मकांड, परंपरा, जातपात,चालीरिती, उच्च-नीचता आणि मुस्लीम शासनकर्त्यांची धार्मिक सक्ती यामध्ये त्रासला गेला होता. तोपर्यंत भारतातील जातीव्यवस्था अपरिवर्तनीय आहे अशा विश्वासावर संपूर्ण समाजव्यवस्था आधारलेली होती. अचानक झालेल्या मुस्लीम आक्रमणाने समाजात अराजक निर्माण झाले. हे ताण-तणाव ओळखून त्यातून सर्व जनतेला बाहेर काढणे आवश्यक होते. 

त्या काळातील संतांच्या रचनांमधून समाज प्रबोधन याहेतूने झालेले दिसून येते. कबिरांच्य कवितेतही हे विशेष ठळकपणे व्यक्त झालेले दिसतात. कबीराच्या स्वभावातला उत्कटपणा आणि जिज्ञासू वृत्ती यातून त्यांचा आध्यात्मिक प्रवास समृद्ध होत गेला. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचे झोकून देणे आहे. ती तीव्रता आणि उत्कटता हा त्यांच्या काव्याचाही ठळक विशेष आहे.अध्यात्माच्या शोधात त्यांनी खूप भटकंती केली. या दरम्यान अनेक मतांचा आणि सिद्धांतांचा त्यांनी  अभ्यास केला. कबीर रुढ अर्थाने शिक्षित नव्हते पण त्यांचे शब्द म्हणजे त्यांच्या प्रवासातील रोकठोक अनुभव आहेत.
‘मसि कागद छुयो नहीं,कलम गही नहीं हाथ
चारिउ जग की महातम,मुखही जनाई बात’
असा कबीर म्हणूनच लोकांना आपल्यातीलच एक वाटतो. व्यवसायानेही सामान्य विणकर. आपल्या झीनी-झीनी बीनी चदरिया..या रचनेत आपल्या कामातून अवघड तत्वज्ञान ते लोकांना सहजपणे सांगतात. हठयोगातील मर्म कबीरांनी लोकांच्या शब्दात बांधलय..

झीनी-झीनी बीनी चदरिया
काहे कै ताना, काहै कै भरनी, कौन तार से बीनी चदरिया।
इंगला पिंगला ताना भरनी, सुखमन तार से बीनी चदरिया॥
आठ कँवल दल चरखा डोलै, पाँच तत्त गुन तीनी चदरिया।
साँई को सियत मास दस लागै, ठोक-ठोक कै बीनी चदरिया॥
सो चादर सुर नर मुनि ओढ़ी, ओढ़ी कै मैली कीनी चदरिया।
दास कबीरजतन से ओढ़ी, ज्यों की त्यों धरि दीनी चदरिया॥

कबीर म्हणतात,

माहित नाही परमेश्वराने असा कोणता धागा आणि कोणती वीण वापरून हे शरीररूपी वस्त्र विणले आहे..सुषुम्नेने नियंत्रण करणाऱ्या तारेने इडा-पिंगला या संवर्धक आणि संरक्षक धाग्यांचे ताण आपल्या शरीरभर पेलले आहेत. पृथ्वी,जल,वायू,उर्जा आणि आकाश ही निसर्गातील पाच तत्त्वे मिळून आणि सत्व, राज आणि तम या तीन गुणांनी युक्त आपल्या शरीरातील अष्टकमळदलांचा चरखा लीलया सांभाळला आहे. दहा महिन्याच्या आत ईश्वर ही चादर संपूर्णपणे काळजीपूर्वक बनवतो...आणि आपल्या सुपूर्द करतो आणि आपण ती किती निष्काळजीपणे मळवून टाकतो!

कबीरांनी हे भजन स्वत: गायले...गावोगाव फिरून सांगितले आणि समोर जमलेल्या निरक्षर सामान्य लोकांना कबीर खरोखरच  आपल्यातलाच एक वाटला.

‘पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय’ या त्यांच्या सांगण्यामुळे लोकांच्या मनावरचे पारंपारिकतेचे दडपण काहीसे दूर झाले.

भजो रे भैया राम गोविंद हरी।
राम गोविंद हरी भजो रे भैया राम गोविंद हरी॥
जप तप साधन नहिं कछु लागत खरचत नहिं गठरी॥
संतत संपत सुख के कारन जासे भूल परी॥
भजो रे भैया राम गोविंद हरी।

कबीराने सांगितलेल्या गोष्टी स्वत: अनुभवलेल्या होत्या. त्यामुळे त्यातील सत्यता लोकांच्या मनाला भिडली. (भाग १)
-अनन्या.